राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले असून पार्श्वभूमीवर ११ एप्रिल रोजी नागपूर येथील मुख्यमंत्र्याच्या घरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वडनगर येथील घरावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.

यावेळी आमदार कडू म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले असून सरकार आल्यापासून फक्त घोषणा देण्याचे काम करण्यात आले आहे. ज्या शेतकरी राजाच्या जीवावर हे सरकार आले त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे असे ते म्हणाले.

या सरकारने मालास भाव दयावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारासी लागू कराव्या, कर्ज माफी त्वरित करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास ५० ते ६० हजार शेतकरी सहभागी होणार आहे. ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत काँग्रेस ने शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा काम केले. तेच काम भाजप करीत आहे. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. कुठे गेले अच्छे दिन असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. यावेळी रघुनाथ पाटील हे देखील उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ योग्य वेळ आल्यावर जाहीर केले जाईल असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या विधानाचा खरपूस समाचार घेत आमदार बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ मुख्यमंत्री मुहूर्त पाहून करणार का? अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.