काही दिवसांअगोदर अभिनेत्री कंगना रणौत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं आहे. ‘‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, असं कंगना रणौत म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. आता कंगनाच्या या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने, नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलतान गोखलेंनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुकही केलं आणि शिवसेना भाजपा एकत्र आली तर बरं होईल, असंही बोलून दाखवलं.

कंगना रणौतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विक्रम गोखले म्हणाले, “खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा हा अवमान नाही का? असं प्रश्न विचारला गेला असता विक्रम गोखले म्हणाले, आहेच, पण हे आपण सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आपण म्हणजे कोण आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे, की तुम्ही हे काय करत आहात? मी तर म्हणेण की यापुढे होणार कुठलाही मोठा खर्च त्याबद्दलचं ऑडीट हे जनतेला माहिती असलं पाहिजे, की आम्ही पैसे भरतो आहोत. आम्ही देशातून पैसा चोरून बाहेर स्वीस बँकेत नेवून ठेवत नाही. कर भरतो हा सामान्य माणूस कर भरतोय त्याचा प्रत्येक ठिकाणी हक्क आहे. त्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या पैशांचं काय करत आहात? कंगनाच्या विधानाशी सहमत आहे, भीक मागूनच मिळालेलं आहे ते. मतपेटीचं राजकारण सुरू झाल्यापासून वादला काही कमी नाही. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात. यामध्ये सगळे आले, एकही पक्ष असा नाही की जो वादात पडत नाही.” असंही यावेळी विक्रम गोखले यांनी बोलून दाखवलं.