बहुत दिन मं तुम्हारे दर्द को सिने में लेकर
जीभ कटवाता रहा
उसे शिव की तरहा लेकर गले में
सारी पृथ्वी घूम आया हूँ
कई युग जाग के काँटे है मने
तुम्हारा दर्द दाखील हो चुका नज्म्म मे
और सो गया है ..
पुराने साप को आखीर अंधेरे बिल में जाकर नींद आयी
..अशा शब्दांत कवितेमागची अस्वस्थता ज्येष्ठ कवीच्या शब्दांतून उतरली आणि साहित्यसंमेलनातील सायंकाळ गुलजार यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरली. मुलाखतीच्या साचेबद्ध रचनेला थोडीशी बगल देत गुलजार यांच्या कवितांची मफल शनिवारी ग्यानबा तुकाराम साहित्यनगरीत रंगली.
गुलजार यांच्या चाहत्यांसाठी सहित्यसंमेलनातील शनिवारची सायंकाळ पर्वणी ठरली. सर्व वयोगटांतील रसिकांनी मंडप भरून गेला होता. मुलाखतीच्या साचेबद्ध प्रश्नोत्तरांना बाजूला ठेवूनही गुलजार उलगडत गेले ते त्यांच्या कवितांमधून.
मनातली अस्वस्थता कवितेच्या माध्यमातून वाट शोधते आणि कविता कागदावर उतरू लागते, असे सांगून कवितेचा प्रवास गुलजार यांनी त्यांच्याच कवितेतून उलगडा.. चलो ना दर्या पे नज्म्म पकडे.. किनारे पे सिंपीया पडी है खुली हुई है.. ना सदख ना मोती.. चलो न मंधार तक चलेंगे.. वहाँ पे गहराई भी जादा, बहाव भी जादा तेज होगा, अटक गये तो पता चलेगा की हम उसें िखच कर निकालेंगे या हमे नज्म्म खेंचे.
जे सांगायचे आहे ते सांगता आलेच नाहीतर कविता झाली असे कसे म्हणणार? अशी विचारणा करून राहून गेलेल्या कवितेची रुखरुखही त्यांच्या शब्दांतून या वेळी उलगडली.. लपक के मोड पे आया.. बस एक दरवाजा देखा, हिल रहा था.. वो फिर बाहर नही आयी.. अधुरी नज्म्म रखी है..
कविता राहून गेली म्हणून अस्वस्थ होणारा, कवितेवर प्रेम करणारा, कवितेचे व्यसन लागले म्हणणारा कवी गुलजार यांच्या कवितांतून रसिकांना या वेळी भेटला. ‘मी चांगला कवी आहे हा आत्मविश्वास अजूनही नाही,’ असे सांगणाऱ्या गुलजार यांनी नव्या पिढीतील कवींकडे खूप प्रतिभा आहे, अशी दिलखुलास दादही दिली. संगणकाच्या काळात पुस्तकांशी असलेले नाते बदलत गेले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कुसुमाग्रजांच्या कवितेचा गुलजार यांनी केलेल्या अनुवादाच्या सादरीकरणाने ही मफल रंगत गेली. अंबरिश मिश्र यांनी गुलजार यांच्याशी संवाद साधला.
कविता ही प्रसिद्धीवर तोलू नका..
कवितेच्या प्रसिद्धीवर तिला तोलू नका, असे सांगताना गुलजार म्हणाले, की एखादी कविता ही एखाद्या गटासाठी असते, तिचा वाचक निश्चित असतो, मात्र ती केवळ खूप प्रसिद्ध नाही, या निकषावर ती चांगली की वाईट हे ठरवणे चुकीचे आहे.
अनुवाद हा एका कुपीतून
दुसऱ्या कुपीत अत्तर ओतण्यासारखा
कवितेचा अनुवाद हा एका कुपीतून दुसऱ्या कुपीत अत्तर ओतण्यासारखा असतो. त्यात काही अत्तर खाली सांडतेच. तसेच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कविता अनुवादित करताना त्यात थोडासा बदल होतो. उत्तम अनुवाद असला तरी तो तंतोतंत असेलच असे नाही आणि तंतोतंत असेल तर तो उत्तम असेलच असे नाही, असे गुलजार म्हणाले.
अ पोएम अ डे
गुलजार यांनी केलेल्या सुमारे चारशे अनुवादित कवितांचा ‘अ पोएम अ डे’ हा काव्यसंग्रह लवकरच येणार आहे. त्यांनी ३२ भाषांमधील २७० कवींच्या कवितांचा अनुवाद या काव्यसंग्रहासाठी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of gulzar in marathi sahitya sammelan
First published on: 17-01-2016 at 03:30 IST