‘लेक वाचवा’ च्या पुढे एक पाऊल टाकून राज्याच्या शिक्षण विभागाकडून आता ‘लेक शिकवा’ अभियान राबवण्यात येणार असून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारपासून (३ जानेवारी) या अभियानाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
नायगावपासून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ औरंगाबाद येथे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थित होणार आहे. या अभियानांतर्गत २६ जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये मुली शिक्षणाकडे वळाव्यात, मुलींना शिकवण्याची मानसिकता वाढीस लागावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळेत सातत्याने अनुपस्थित असलेल्या मुलींच्या घरी शालेय समितीचे सदस्य भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे शाळेत न जाणाऱ्या मुलींना शाळेत पाठवावे यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून कार्यक्रम करण्यात येणार आहेत.
या कालावधीमध्ये गावातील शिक्षिकांचा, महिला कार्यकर्त्यांचा, महिला पालकांचा, एकच मुलगी असलेल्या पालकांचा, विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार शाळांमध्ये करण्यात येणार आहे. आदर्श माता पुरस्कारही देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या अभियानामध्ये मुलींची आरोग्य तपासणी, ज्युडो-कराटेंचे प्रात्यक्षिक, संगणक साक्षरता वर्ग, वक्तृत्व, निबंध, मैदानी खेळांच्या स्पर्धा, माता-पालक-शिक्षक संवाद सभा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात फक्त ५६ हजार शाळाबाह्य़ मुली?
मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, मुली शाळेत याव्यात यासाठी हे अभियान आखण्यात आले आहे. मात्र, सध्या राज्यात फक्त ५६ हजार मुली शाळाबाह्य़ असल्याचा दावा प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी केला आहे.