पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात बारावीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत २५.८७ टक्के, जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेत २७.३१ टक्के आणि दहावीच्या परीक्षेत २९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्य मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे पुरवणी परीक्षेच्या निकालाबाबत माहिती दिली. बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी २ हजार १०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ हजार ८०९ विद्यार्थ्यांपैकी ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १२ हजार ५३४ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार १६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३ हजार ३२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदाचा निकाल ७.४६ टक्क्यांनी वाढला आहे. तर दहावीच्या परीक्षेसाठी १२ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १० हजार ४७७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४ हजार ३३६ विद्यार्थी किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने एटीकेटी सवलतीसह अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जवळपास ३.४६ टक्क्यांनी घटला आहे. छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी. निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय सोडून) कोणत्याही विषयात मिळवलेल्या गुणांची पडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ttps://varificatuin.mh-hsc.ac.in// या संकेतस्थळाद्वारे स्वत: किंवा शाळा-कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी २१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर, छायाप्रतीसाठी २१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करून शुल्क ऑनलाइन भरता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.