पुणे : धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी पवार बोलत होते. शाहू महाराज छत्रपती, न्या. बी. जी. कोळसे पाटील, श्रद्धा कुंभोजकर, डॉ. पी. डी. जगताप, राजकुमार घोगरे आणि चंद्रशेखर शिखरे या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले,की महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. अन्य घटकांचे महत्त्व वाढवण्याचे काम त्यांनी केले.  शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास आणि दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना दिशा फक्त जिजाऊ यांनीच दिली. पुरंदरे यांनी केलेली मांडणी सत्यावर विश्वास ठेवणारे कधीही मान्य करणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्रातील गुरुजनांसाठी दादोजी कोंडदेव यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता. त्यावर वाद झाल्यानंतर सरकारने समिती नेमली. त्यात दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार देणे बंद केले.