एरवी लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला आनंद देणारे सर्कशीतील कलाकार आणि प्राणी सध्या अडचणीत सापडले आहेत. संचारबंदीमुळे खेळ नाही, त्यामुळे उत्पन्न नाही आणि उत्पन्न नसल्याने कलाकारांच्या-प्राण्यांच्या खाण्यापिण्याचे, वेतनाचे काय करायचे असे प्रश्न सर्कसचालकांसमोर निर्माण झाले आहेत. काही संस्था-संघटनांच्या मदतीवर सर्कशीतील कलाकार आणि प्राण्यांना दिवस काढावे लागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र शासनाने देशभरात २१ दिवसांची संचारबंदी लागू के ली आहे. सर्वसाधारणपणे मार्चच्या अखेरीपासून सुरू होणाऱ्या सुटय़ा डोळ्यासमोर ठेवून खेळ लावण्याच्या तयारीत असलेल्या सर्कशींना या संचारबंदीचा फटका बसतो आहे. प्राणी आणि कलाकारांचा मोठा लवाजमा असणाऱ्या सर्कशींसमोर या संचारबंदीमुळे आता असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. देशभरातील संसर्गाची परिस्थिती दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर कधी येणार, याचीच त्यांना प्रतीक्षा आहे.

पुण्याजवळील वाघोली येथे असलेल्या ग्रेट भारत सर्कसचे उमेश आगाशे म्हणाले, की संचारबंदीमुळे खेळ करता येत नाहीत. आमच्याकडे एकू ण १०५ जण काम करतात. संचारबंदी लागू झाल्यावर त्यातील काही पळून गेले. काही जण रीतसर सांगून त्यांच्या गावी निघून गेले. काही जण छत्तीसगढ आणि अन्य ठिकाणी अडकले आहेत.  सर्कशीबरोबर सध्या ६५ जण आहेत. तर, प्राण्यांमध्ये १८ कु त्रे, २ उंट आणि २ घोडे आहेत. प्राण्यांसाठी काही संस्था आणि कार्यकर्त्यांकडून भुसा, चारा, गवत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काही दिवस जातील.  कलाकारांसाठी शिधा मिळत आहे. मात्र, हे असे किती दिवस चालणार, परिस्थिती कधी पूर्वपदावर येणार हा मोठा प्रश्न आहे.

सरकारने कर्ज, मदत काहीतरी उपलब्ध करावे

काही दिवसांपूर्वी सानपाडा येथील खेळ करून रॅम्बो सर्कस ऐरोली येथे दाखल झाली. मात्र, संचारबंदी लागू झाल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले आहे. कलाकार बसून आहेत. खेळ होत नसल्याने त्यांच्या पगाराचा प्रश्न आहे. सुदैवाने १७ कु त्रे आणि १ घोडा यांच्यासाठीचे महिन्याभराचे खाद्य भरून ठेवले होते. स्थानिक गुरुद्वारा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अन्नधान्य मिळाले आहे. सध्याच्या परिस्थितीत कलाकारांना पैसे कसे द्यायचे हा मोठा प्रश्न आहे. संचारबंदी कधी उठणार, परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. सरकारने सर्कशींना काहीतरी आर्थिक मदत द्यावी किं वा बँके कडून किमान कर्ज मिळवून द्यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, असे रॅम्बो सर्कसचे सुजित दिलीप यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerous questions before circus owners due to curfew restrictions abn
First published on: 02-04-2020 at 01:06 IST