सध्या राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अनेकजण भाजपात स्वतः चं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण शिवसेनेतही जात आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादीतील आऊट गोईंग हे परिवर्तन आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच, शिवस्वराज्य यात्रा ही खुर्ची हवी आहे म्हणून नाही, तर रयतेचे राज्य यावे म्हणून काढत असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले. अमोल कोल्हे म्हणाले की, आऊट गोईंगला मी परिवर्तन असे म्हणतो. या घटनांमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसून येतीलच, राज्यात वेगळे चित्र असेल. शिवस्वराज्य यात्रा ही नंतर सुचलेली नाही. काहीजण अगोदर यात्रा काढतात व नंतर त्यात यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा सूर निघतो. तर दुसऱ्या यात्रेत पुन्हा मी येईल असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. असे सांगून अमोल कोल्हे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली. परंतु, तिसरी शिवस्वराज्य यात्रा मात्र महाराजांचा सर्वसामान्य मावळा काढतो आहे, जो या स्पर्धेत कुठेही नाही. मला खुर्ची हवी म्हणून मी यात्रा काढत नाही, रयतेचे राज्य यावे यासाठी ही यात्रा काढत असल्याचे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.