काय चाललंय प्रभागात?
प्रभाग क्रमांक १३ निगडी गावठाण-यमुनानगर- ओटा स्कीम-निगडी वसाहत
राष्ट्रवादी तसेच भाजप-शिवसेनेचा स्वतंत्र प्रभाव असलेले दोन मोठे भाग एकत्र झाल्यानंतर तयार झालेल्या निगडी-यमुनानगर प्रभागात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण दिसून येते. भाजप-शिवसेनेची युती होणार का, यावर नवीन समीकरणे आकाराला येऊ शकतात. पवळे व उबाळे या प्रस्थापितांना वर्चस्व टिकवण्याचे आव्हान आहे. तर, गेल्या वेळी अनपेक्षितपणे दोन उमेदवार निवडून आलेल्या मनसेपुढे अस्तित्वाचा प्रश्न आहे. नेमके समोरासमोर कोण येणार, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे.
निगडी गावठाण, साईनाथनगर, यमुनानगर, ओटा स्कीम, निगडी वसाहत असे नव्या प्रभागाचे क्षेत्र आहे. अश्विनी चिखले, मंगेश खांडेकर, सुलभा उबाळे, संगीता पवार, तानाजी खाडे, शुभांगी बोऱ्हाडे या विद्यमान सहा नगरसेवकांचे सध्याचे क्षेत्र नव्या प्रभागात समाविष्ट आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि अनुसूचित महिला असे आरक्षण आहे. झोपडपट्टी, बैठी घरे, सोसायटय़ा आणि शासकीय गृहप्रकल्पांचा मिळून दाट लोकवस्तीचा हा प्रभाग आहे. अनेक वर्षे दिवंगत महापौर मधुकर पवळे यांचे या पट्टय़ावर निर्विवाद वर्चस्व होते. सन २००० मध्ये महापौरपदावर असताना पवळे यांचे निधन झाले. पोटनिवडणुकीत त्यांचे बंधू दत्ता पवळे निवडून आले. सन २००२ व २००७च्या निवडणुकीत पवळे यांच्या पत्नी सुमन पवळे निवडून आल्या. सन २०११ मध्ये त्या स्थायी समितीच्या अध्यक्षा झाल्या. पदावर असतानाच सन २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील गटबाजीतून सुमन पवळे यांचा पराभव झाला. दुसरीकडे, यमुनानगर प्रभागातून सुलभा उबाळे सलग दोनदा निवडून आल्या. सन २०१२ मध्ये तर त्या सर्वसाधारण गटातून विजयी झाल्या. सन २००२च्या तीनसदस्यीय प्रभागात पवळे-उबाळे यांच्यातील अटीतटीच्या लढतीत पवळे अवघ्या ५६ मतांनी निवडून आल्या. आता निगडी गावठाण-यमुनानगर एकाच प्रभागात आल्याने पवळे-उबाळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘आमने-सामने’ येण्याची शक्यता आहे. निगडी गावठाण भागात राष्ट्रवादीचा तर यमुनानगरमध्ये भाजप-शिवसेनेचा हक्काचा मतदार आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असूनही गेल्या वेळी मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीच्या गटबाजीतून मनसेच्या इंजिनाला ‘इंधन’ मिळाले होते. मंगेश खांडेकर यांचा पाच वर्षांत कुठेही वावर दिसला नाही. त्यामुळे ते नगरसेवक असून नसल्यासारखे होते. लोकसभा निवडणुकीत निगडी पट्टय़ात ‘धनुष्यबाण’ चालले. विधानसभा निवडणुकीत संमिश्र चित्र होते. विलास लांडे यांना ओटय़ावर, एकनाथ पवार व सुलभा उबाळे यांना यमुनानगरमध्ये चांगले मतदान झाले. महेश लांडगे आमदार म्हणून निवडून आले, मात्र त्यांना भागातून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. विद्यमान नगरसेवक तानाजी खाडे स्वत: खुल्या गटातून किंवा भावजयीला राखीव प्रवर्गातून उतरवण्याच्या विचारात आहेत. माजी नगरसेवक शशिकिरण गवळी सूनबाईसाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे शिवसेनेत गेल्या असून, यंदा त्यांचे पती भवितव्य अजमावणार आहेत. आमदारकी लढवलेले एकनाथ पवार व सुलभा उबाळे यांची सेना-भाजपची युती झाल्यास वेगळी आणि न झाल्यास त्याहून वेगळी भूमिका राहणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष स्वत: लढणार की पुन्हा पत्नीला िरगणात उतरवणार, हे अद्याप स्पष्ट नाही. इच्छुकांची जोरदार तयारी सुरू असली राजकीय पटलावर वातावरण अनिश्चित आहे.