विद्याधर अनास्कर यांचे मत पुणे : सद्य:स्थितीत होणाऱ्या अतिरिक्त साखरेचे उत्पादन पाहता राज्यातील साखर कारखान्यांनी साखर आणि इथेनॉल यांचा ताळेबंद एकत्रित न करता दोन्ही ताळेबंद स्वतंत्र दाखविल्यास इथेनॉल प्रकल्पास मदत करणे शक्य होईल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. डेक्कन शुगर टेकनॉलॉजिस्ट असोसिएशन, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित ‘इथेनॉल’ विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन अनास्कर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘साखर कारखाने विक्रीस न काढता भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने बँकांना तांत्रिक सल्ला दिल्यास कारखान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.’ चर्चासत्राच्या दुपारच्या सत्रात राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. गायकवाड यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक शिक्षणासाठी डेक्कन शुगर असोसिएशनने पुढाकार घ्यावा आणि कारखान्यात नवीन तंत्रज्ञांची नेमणूक करण्यात मदत करावी, असे आवाहन केले. परिसंवादात मोलॅसिस कन्टेमिनेशन आणि त्याचे जतन या विषयावर तसेच शुद्ध साखर निर्माण करणे आणि आसावणीतील निचरा होणाऱ्या पाण्यातून पोटॅशियमची निर्मिती यावर तज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी आपली मते या वेळी मांडली. दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातून १५० सभासदांनी या परिसंवादात सहभाग घेतला. संस्थेचे (प्रभारी) अध्यक्ष एस. बी. भड यांनी पाहुणे आणि उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष सोहन शिरगावकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मंचावर मानद सचिव एम. आर. कुलकर्णी, खजिनदार अजित चौगुले, सहकारी श्री. घोडगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. व्ही. थेटे, तर संस्थेचे सचिव (प्रभारी) एस. बी. देव यांनी आभार प्रदर्शन केले.