करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्याच्या निषेधार्थ पुण्यात मागील दोन दिवसापासुन व्यापारी महासंघाकडून रात्री सातपर्यंत दुकाने सुरू ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. करोना निर्बंधानुसार दुकाने चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश प्रसृत करण्यात आले आहेत. पुणेकरांना र्निबधांतून दोन दिवसांत दिलासा मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. पण, प्रत्यक्षात पुण्यातील र्निबध कायम ठेवण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली. पुणेकरांची स्वाक्षरी मोहीम, दुकानांसमोर घंटानाद आंदोलन करून व्यापाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. ‘खटले भरले तरी चालेल, पण बुधवारपासून चारनंतर दुकाने उघडी ठेवू’ असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. त्यानुसार बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांकडून दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. व्यापारी महासंघाच्या आवाहनानुसार गुरुवारी दुपारी चारनंतर शहराच्या विविध भागात व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. मात्र, पोलिसांचे पथक, अधिकारी फिरत असल्याने तासाभरात दुकाने बंद करण्यात आली. राज्य सरकारला गणरायाने सुबुद्धी द्यावी, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडे भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करून साकडे घालण्यात आले. या महाआरतीनंतर व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ लक्ष्मी रोडवरून मोर्चा काढण्यात आला. तर राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘तो’ एक मुद्दा ठरतोय अडचणीचा विषय; भाजपा-मनसे युतीसंदर्भात फडणवीसांचं वक्तव्य “जो निर्णय घेतला आहे, तो अत्यंत निराशाजनक आहे. पुण्यातील करोना रुग्णवाढीचा दर हा ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आज तर हा दर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. शासनाची नवी नियमावली पाहिली तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध कमी करायला पाहीजे होते. पुणे शहर आणि ग्रामीण भागातील नोडल अधिकारी वेगवेगळे आहेत. त्यांनी दुकानांची वेळ वाढवून द्यायला हवी असं सांगितलं होतं. मात्र परिस्थितीचा विचार न करता पुणे शहरातील निर्बंध कायम ठेवले आहेत. याला आमचा विरोध आहे. हा निर्णय तात्काळ बदलावा अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांची आहे.”, असं पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सोमवारी सांगितलं होतं.