पुणे : सोलापूर महामार्ग आणि नगर रस्त्याला जाण्यासाठीचा जवळचा रस्ता हडपसरमधून जात असल्याने या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी हा मोठा जटील प्रश्न हडपसर मतदारसंघाला सतावतो आहे. गेल्या काही वर्षांत हा प्रश्न सुटलेला नाही. त्याचबरोबर नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पिण्याचे पाणी, अरुंद रस्ते, अपुरी सांडपाणी वाहिनी व्यवस्था आणि कचरा, अशा समस्या हडपसरकरांना भेडसावत आहेत.

पुणे शहराच्या पूर्वेकडील वेगाने विस्तारणारा भाग अशी हडपसर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमुळे या मतदारसंघातील लोकसंख्या वाढली आहे. या मतदारसंघातील मुंढवा, केशवनगर, साडेसतरा नळी, कात्रज, फुरसुंगी, उरुळी ही सर्व गावे पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झाली. त्यातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावात आता स्वतंत्र नगर परिषदा स्थापन करण्याचे आदेश नुकतेच राज्य सरकारने दिले आहेत. त्याची सध्या प्रक्रिया सध्या सुरू आहे. हडपसर भागात मगरपट्टा सिटी, अमनोरा पार्क, यांसह अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या आहेत. खराडी तसेच नगर रस्त्यावर जा-ये करण्यासाठी हडपसर मतदारसंघातून जाणाऱ्या रस्त्याच्या वापर केला जातो. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या भागात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले असतात.

हेही वाचा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या ! आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा

या मतदारसंघामधून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व पुणे-पंढरपूर पालखी मार्ग जातो. त्यामुळे सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील सतत वाहतुकीची कोंडी होते. या भागातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी व कर्मचारी, तसेच विविध कंपन्यांच्या कार्यालयांत कार्यरत नोकरदारांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. या भागातील वाहतूक कोंडीची विधानसभेतही अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना करण्यात यश आलेले नाही.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, कचरा प्रकल्पासारख्या कोणताही त्रासदायक प्रकल्प करायचा झाल्यास मिळणारे प्राधान्य यामुळे मतदार त्रस्त असून, निधी द्यायची वेळ आल्यास मात्र हडपसरकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप केला जातो. कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे. परंतु हा प्रश्न मार्गी लावण्यात यश आलेले नाही.

हेही वाचा : पुणे: बाबा भिडे पुलावरील संरक्षक कठडे झाले गायब नक्की काय आहे प्रकार !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाविष्ट गावांमध्ये अपुरी सांडपाणी वाहिनी व्यवस्था, अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे, अरुंद रस्ते, उद्याने, क्रीडांगणांचा अभाव असेही चित्र येथे आहे. पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिका असावी, अशी मागणी गेली काही वर्षे केली जात आहे. मात्र, लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, अशी नागरिकांची भावना आहे.

प्रमुख समस्या

  • सततची वाहतूक कोंडी.
  • कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण.
  • त्रासदायक कचरा प्रकल्प.
  • समाविष्ट गावांतील बेकायदा बांधकामे.
  • अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा.