पिंपरी : आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवांसह तंबूंची तयारी केली आहे. शिधा व साहित्याची खरेदीही झाली आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या १८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर, आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळा अवघ्या पाच दिवसांवर आला असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
देहूचे पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे म्हणाले, ‘पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पॉलिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात रथापुढे २७ आणि रथामागे ३९० दिंड्या चालणार आहेत. सोहळ्यातील सर्व दिंडीप्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. मानकरी, सेवेकरी, दिंडीप्रमुखांना पत्र्यव्यवहार केला आहे. देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत”
चोवीस तास पाणीपुरवठा, पिण्याच्या पाण्याचे बारा टँकर, पाच फिरत्या टँकरद्वारे पाणीपुरवठा, सुलभ स्वच्छतागृहे, जंतूनाशक औषधी, धूर फवारणी देहू नगरपंचायतीने केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव म्हणाले, ‘पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. उपचार केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात आंतर, बाह्य रुग्ण विभाग असणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत.’
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, ‘दरवर्षी सायंकाळी पाचच्या दरम्यान पालखीचे प्रस्थान होत असते. मात्र, यंदा प्रस्थान सोहळा गुरुवारी आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय पालखीचे प्रस्थान करता येणार नाही. पालखी प्रस्थान सोहळ्यास दिरंगाई होऊ नये यासाठी नित्य गुरुवारची पालखीची मंदिर प्रदक्षिणा सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान काढली जाणार आहे. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम साडेसात वाजता होईल. मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. रात्री आठनंतर पालखीचे प्रस्थान होईल. चांदीच्या रथाला पॅालिश करण्यात आले आहे. देवांचे राजेशाही अलंकार, चांदीचे भांडे, सिंहासन अशी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. श्री गुरू हैबतबाबांनी ठरवून दिलेल्या प्रथेप्रमाणे सोहळा पार पडेल. देवस्थान प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, दिंडीकरी, फडकरी, मानकरी, पोलीस यंत्रणा, गावकऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. आता प्रस्थान सोहळ्याची प्रतीक्षा आहे.
चोवीस तास पिण्याचे पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. धर्मशाळा आणि तंबूत राहणाऱ्या वारकऱ्यांसाठी अठरा टँकरद्वारे मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल. वारकऱ्यांच्या सुरक्षासाठी नगर परिषदेच्या वतीने शहरातील वर्दळीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सिद्धबेट, नदी घाट, नवीन पुलासह संपूर्ण महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. वारी कालावधीत तीन पाळ्यांमध्ये साफसफाई केली जाणार आहे. फिरत्या शौचालयांची उपलब्धता केली आहे. दिवाबत्तीची कामे पूर्ण झाली आहेत.माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद