पुणेकर बेसुमार पाणी वापरतात, पाण्याची नासाडी करतात असे चित्र नेतेमंडळींकडून सातत्याने निर्माण केले जात असले, तरी पाणीकपात आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे पुण्यातील पाणीवापर गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी झाला आहे. धरणातील साठा लक्षात घेऊन केल्या जात असलेल्या नियोजनामुळे पाणीवापर कमी करण्यात यश आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुणेकरांच्या पाणीवापराबाबत आमदार गिरीश बापट यांनी केलेल्या टीकेमुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभेत आंदोलन केले. त्यानंतर पुण्याच्या पाणीपुरवठय़ाबाबत नेमकी परिस्थिती काय आहे, शहरात आणखी पाणीकपात केली जाणार आहे का, अशी विचारणा विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी सभेत केली. त्यावर आयुक्त महेश पाठक यांनी निवेदन केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दरमहा एक टीएमसी (एक हजार दशलक्षलिटर प्रतिदिन याप्रमाणे)पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात आले होते. पावसाळ्यानंतर या परिस्थितीत सुधारणा झाली. मात्र, धरणातील साठा कमी झाल्यामुळे तसेच पाऊस १५ जुलैच्या आसपास सुरू होत असल्याचा गेल्या तीन-चार वर्षांचा अनुभव असल्यामुळे एक ते सव्वा टीएमसी पाणी वापरण्याचे नियोजन करण्यात आले.
गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी २० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. पावसाळ्यानंतर ती कमी करण्यात आली. मात्र शहरात पाणीकपात सुरूच आहे. तसेच ज्या भागात दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता, तेथे एक वेळच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दरमहा दीड टीएमसीवरून पाणीवापर एक ते सव्वा टीएमसीवर आला आहे. पाण्याची काटकसर, तसेच राजकीय पक्ष आणि नागरिकांनी केलेले सहकार्य यामुळे तसेच पाणीवापराबाबत सतत आढावा घेतला गेल्यामुळे, नगरसेवकांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांमुळे यंदा पाणीवापर घटल्याचे लक्षात आले आहे, अशीही माहिती आयुक्तांनी दिली.
गेल्या वर्षी (सन २०११-१२) शहराचा वार्षिक पाणीवापर १५.८५ टीएमसी इतका होता. तो सन २०१२-१३ मध्ये १३.९५ टीएमसी झाला आहे. त्यामुळे पावणेदोन टीएमसी पाणी महापालिकेने कमी घेतल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी पाणी कमी वापरल्यामुळेच हे शक्य झाले. यंदा पाण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या युनिटमध्येही मोठी कपात झाली आहे. सद्यपरिस्थितीत सव्वा टीएमसी पाणीवापर सुरू असून एकवेळ पाणी देण्याचे धोरण यापुढेही सुरू राहील, असे आयुक्त म्हणाले. ज्या भागात अद्यापही पाणी योग्यप्रकारे पोहोचू शकत नाही, तेथे टँकरद्वारे पाणी दिले जात असून महापालिकेचे टँकर व खासगी मिळून सरासरी रोज तीनशे खेपा सुरू असल्याचीही माहिती आयुक्तांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
पुणेकरांचा पाणीवापर घटला
पाणीकपात आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे पुण्यातील पाणीवापर गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी झाला आहे.
First published on: 22-05-2013 at 02:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puneits seriously cut their water consumption