पुणे : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, फ्लाॅवर, वांगी, शेवगा या फळभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ५ टेम्पो मटार, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण, इंदूर येथून ४ ते ५ टेम्पो गाजर, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातून ३ ते ४ टेम्पो पावटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो चार हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा १५० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५० ट्रक बटाट्याची आवक झाली.
चौकट १
पालेभाज्यांचे दर तेजीत
पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. तरकारी विभागात कोथिंबिरीच्या ७० हजार जुडींची, मेथीच्या २० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर (रुपयांत) पुढीलप्रमाणे : कोथिंबीर – २००० ते ३०००, मेथी – ३००० ते ४०००, शेपू – १००० ते २०००, कांदापात- १५०० ते २५००, चाकवत – ६०० ते १०००, करडई- ८०० ते १२००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते १०००, मुळे – १००० ते २०००, राजगिरा- ५०० ते ८००, चुका – ८०० ते १२००, चवळई- ५०० ते ८००, पालक- १५०० ते २५००
चौकट २
गावरान आंबा, डाळिंब, मोसंबीला मागणी
पावसाने उघडीप दिल्याने गावरान आंब्यांची आवक वाढली आहे. गावरान आंब्याला मागणीही जास्त आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गावरान आंब्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पपई, मोसंबी, डाळिंबाला मागणी वाढली आहे. हवामान बदलामुळे कलिंगड, खरबूज, लिंबांच्या मागणीत घट झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक फळबाजारात मोसंबी ३० ते ३५ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १२ ते १५ टेम्पो, लिंबे १७०० गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, चिकू दोन हजार खोकी, पेरू ३०० ते ४०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), तसेच केरळहून ३ ट्रक अननस अशी आवक झाली.