पाचवीचे १६.९९ टक्के, आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र
पुणे : राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात पाचवीचे १६.९९ टक्के आणि आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत, तर पाचवी आणि आठवीचे मिळून १४.२० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
परीक्षा परिषदेने २४ नोव्हेंबरला अंतरिम निकाल जाहीर केल्यानंतर महिन्याभराचा कालावधी उलटूनही अंतिम निकाल प्रसिद्ध झाला नव्हता. तसेच काही दिवसांपूर्वी परिषदेच्या संकेतस्थळावरून माहितीची चोरी होऊन गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या याद्या समाजमाध्यमांत फिरत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थी पालकांना शिष्यवृत्तीच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर परिषदेने शुक्रवारी सायंकाळीच अंतिम निकाल संकेतस्थळावर जाहीर केला. परिषदेच्या प्रसिद्धिपत्रकानुसार पाचवीच्या ३ लाख ८८ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
परीक्षा दिलेल्या ३ लाख ३७ हजार ३७० विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार ३३४ विद्यार्थी पात्र ठरले, त्यातील १४ हजार २५० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आठवीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या २ लाख ४४ हजार ३१४ विद्यार्थ्यांपैकी २ लाख १० हजार ३३८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर पात्र ठरलेल्या २३
हजार ९६२ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
पाचवी आणि आठवीच्या मिळून ६ लाख ३२ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी ६ लाख ३१ हजार१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
पात्र ठरलेल्या ८१ हजार २९६ विद्यार्थ्यांपैकी २४ हजार ९८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.