आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!,” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या शपथविधीवर दिली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

“दुसरी किंवा तिसरी टीम हा विषय नाही. उद्याच्या निवडणुकीत आमची नवी टीम पाहायला मिळेल,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवार म्हणाले, “दुसरी टीम आमच्याकडं कोण आहे, ती तर पाहुद्या. ज्यांना जायचं, ते थांबणार नव्हते. जे जाणार नाहीत, ते थांबले आहेत. त्यामुळे दुसरी किंवा तिसरी टीम हा विषयच नाही. उद्याची निवडणूक झाल्यावर आमची नवीन टीम पाहायला मिळेल.”

हेही वाचा : “आमच्यावर केसेस आहेत, म्हणून गेल्याचं लोक आरोप करतात, पण..”, छगन भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण

अजित पवारांचा फोन आला होता का? वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं सांगतात, या प्रश्नावर शरद पवारांनी म्हटलं की, “कोणाचीही फोन आला नाही. त्यांना दुसरे कोणतरी वरिष्ठ असू शकतील.”

राज ठाकरे काय म्हणाले होते?

ट्वीट करत राज ठाकरेंनी म्हटलेलं की, “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!.”

“तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं,” असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : शरद पवार की अजित पवार? जयंत पाटलांनी दोन शब्दांत मांडली भूमिका, म्हणाले…

“बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे. ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?” असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.