एप्रिल-मे महिन्यात तीव्र उन्हाच्या झळांमुळे सामान्य माणूस बाहेर पडायचे टाळत असला, तरी काही जणांसाठी मात्र याच झळा उत्पन्नाचे साधन ठरत आहेत. उन्हाळ्यात सिंहगड रस्ता, सातारा रस्त्यासह शहराच्या बऱ्याच भागात उसाची ‘फिरती गुऱ्हाळं’ सगळीकडे दिसत आहेत, ही गुऱ्हाळं दुष्काळी भाग असलेल्या अहमदनगर जिल्ह्य़ातील पाथर्डी तालुक्यातील अनेकांचे जगण्याचे साधन ठरल्या आहेत.
ही गुऱ्हाळं चालवणारे अहमदनगर जिल्ह्य़ातून दरवर्षी येणारे शेतकरी आहेत. प्रत्येकाची सुमारे २ ते ६ एकर शेतजमीनही आहे. पण शेतीतून मिळणारे उत्पन्न फारसे नाही. दुष्काळामुळे पीक जळून गेले आहे. उन्हाळ्यात शहरामध्ये येऊन आपल्या गुऱ्हाळांच्या मदतीने स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट भरणे हे दरवर्षीचेच ठरलेले आहे. जानेवारी ते मे किंवा जून या कालावधीत हे लोक आपले गाव सोडून पुण्यातील कर्वेनगर, मार्केट यार्ड भागात येऊन भाडय़ाने राहतात आणि पाच महिने पाठ मोडेपर्यंत लोकांची तहान भागवून पैसे कमावतात.
‘‘गाडीवर रस काढणे हे एकटय़ाचे काम नाही. त्यासाठी कमीतकमी दोघांची गरज असते. म्हणूनच काही ठिकाणी नवरा-बायको तर काही ठिकाणी मुलगा आणि वडील घाम गाळताना दिसतात. शाळकरी मुलं देखील आपली उन्हाळ्याची सुट्टी आई-बाबांना मदत करण्यात घालवतात. गाडय़ा स्वतच्या मालकीच्या असल्या, तरी त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी खर्च करावा लागतो,’’ पाथर्डी तालुक्यातील मोहटा-देवी गावचे विठ्ठल पालवे सांगत होते. ‘‘गाडीवरचे ‘चरखू’ फिरवून फिरवून दरवर्षी खराब होते. ते बदलायला सुमारे ६ ते १० हजार रुपये खर्च येतो. मागच्या वर्षी ५०-६० रुपयांत मिळणारी उसाची मोळीच यंदा १०० ते २०० रुपयांना मिळते आहे, या शिवाय बर्फ, लिंबू, आलं, मीठ याचा खर्च वेगळा. उत्पन्न मात्र केवळ ५०० ते ७०० रुपये इतकेच आहे. पण गेल्या चारआठ दिवसात तापमानाने चाळिशी गाठल्यामुळे धंदाही वाढला आहे,’’ भोसरगावचे संभाजी टेमकर यांनी सांगितले.
केवळ १० रुपयात फुल ग्लास देणाऱ्या या गुऱ्हाळचालकांना सुदैवाने पोलीस किंवा पालिकेच्या लोकांकडून त्रास होत नाही. क्वचित एखाद्या पोलिसाला मात्र फुकट रस पाजावा लागतो. गाडीवर काढलेला रस आणि यंत्रावर काढलेल्या रसाची चव एकसारखीच असली, तरी किमतीचा नक्कीच फरक आहे. अंगमेहेनतीने काढलेला रस दोनचार रुपयांनी स्वस्त असतोच, शिवाय तो दुष्काळी भागातील अनेकांचे संसार चालण्यासाठी उपयुक्तही ठरतो.