‘‘व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात पुकारलेला संप आणि शासनाची एलबीटी रद्द न करण्याची भूमिका यामुळे निर्माण झालेल्या कोंडीवर ‘लोकसत्ता’ने काढलेला तोडगा अतिशय योग्य असून मी त्याचे स्वागत करतो,’’ अशी प्रतिक्रिया पुणे व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत पाठक यांनी दिली आहे.
‘‘लोकसत्ता’ने काढलेला तोडगा अमलात आणून त्याचे शंभर टक्के पालन झाल्यास व्यापाऱ्यांना आंदोलन करण्याचे कारणच राहणार नाही. पुण्यातल्या पुण्यात होणाऱ्या व्यापारामधील देखील एलबीटीच्या जाचक तरतुदी नाहीशा होतील,’ असे मत पाठक यांनी व्यक्त केले. ‘हा तोडगा जर शासनाने मान्य केला, तर व्यापाऱ्यांनाही तो मान्य करावाच लागेल. पण शासन याला मान्यता देईल की नाही याची शंका आहे. दोन्हीकडून जर या तोडग्याला मान्यता मिळाली, तर भविष्यात अडचण उद्भवणार नाही,’ असेही ते म्हणाले. फक्त खरेदी केलेल्या मालावर एलबीटी भरावा, असा तोडगा ‘लोकसत्ता’ने व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून काढला आहे.