स्वारगेट चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्याचा शासनाचा आराखडा सदोष आहे, असा आरोप जनसंपत्ती बचाव समितीने केला आहे. खर्च कमी करणाऱ्या आणि सिग्नलची आवश्यकता न भासणाऱ्या ‘बोन्साय ब्रिज’चा आराखडा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे सादर केला आहे.
उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधल्यास सिग्नल व्यवस्था चालू राहून चौकातील वाहतूक कोंडी तशीच राहणार आहे. तसेच त्याचा खर्च १६० कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असे बचाव समितीचे अध्यक्ष शशिकांत कोलते पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शंकरशेठ रस्त्यावरील एसटी गेटपासून सारसबागेच्या दिशेने उड्डाणपूल बांधावा, कात्रजच्या दिशेने चौकात येणारी वाहने गणेश कला क्रीडा केंद्राच्या गल्लीतून टिळक रस्त्यावर वळवावीत, सातारा रस्त्यावर एसटी गेटपासून लक्ष्मी नारायण टॉकिजपर्यंत दुहेरी पूल टाकावा, अशा सूचना समितीने शासन आणि महामंडळाला सादर केलेल्या आराखडय़ात करण्यात आल्या आहेत. याकडे शासनाने लक्ष न दिल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे.