पुणे : राज्यात व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीबीएम, बीएमएस), संगणक उपयोजन (बीसीए) पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेली समाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) काही विद्यार्थी देऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हिताचा विचार बीबीए, बीसीएसाठी अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या पुरेशा प्रतिसादाअभावी सलग दुसऱ्या वर्षी दोनवेळा सीईटी घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
बीबीए आणि बीसीए पदवी अभ्यासक्रम गेल्यावर्षीपासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अखत्यारित गेले.या अभ्यासक्रमांच्या राज्यभरात एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी दोन वेळा सीईटी आयोजित करूनही पुरेशा प्रतिसादाअभावी या अभ्यासक्रमाच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहिल्या होत्या. तर यंदा ७२ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यांपैकी ६१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
त्यामुळे गेल्यावर्षीचीच पुनरावृत्ती होऊन यंदाही जागाही रिक्त राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सीईटी सेलने नुकताच यंदाच्या सीईटीचा निकालही जाहीर केला. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त सीईटी घेण्याची मागणी संस्थाचालकांकडून करण्यात येत होती.
सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रमाची सीईटी काही उमेदवार देऊ शकले नाहीत. त्यामुळे उमेदवार, पालक, संस्था यांनी प्रत्यक्ष भेट, ई मेल, दूरध्वनीद्वारे अतिरिक्त समाइक प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची विनंती केली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने अतिरिक्त परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.