“जेव्हा ८० टक्के हिंदूंना दुखवायचं असले, ८० टक्के हिंदूंचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर एकाच माणसावर चिखलफेक करा ८० टक्के हिंदू समाज दुखावतो इतकी सावरकर नावाची दहशत आहे. ब्रिटिशांना होती, काँग्रेसला होती आजही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे. सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत. आता यापुढे चित्र बदललं पाहिजे.” असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी'चे (डीईएस) मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्यावतीने 'मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर' नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते शरद पोंक्षे यांना बोलवण्यात आले होते. याप्रसंगी भाषणात शरद पोंक्षे यांनी या कार्यक्रमाचे व कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हटले की, “महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे, प्रत्येक गावात असे विद्यालय हवे. असे कार्यक्रम व्हायला हवे, या मुलांनी खूप छान कार्यक्रम केला, सगळ्या शिक्षकांना नमस्कार करायचा आहे. असे शिक्षक प्रत्येक शाळेत हवेत. संकल्पना सूचणं आणि अंमलात आणण अवघड असतं, छान कार्यक्रम आहे. माझ्याकडे खरोखरच आज शब्द नाहीत. मी कौतुक करतोय म्हणजे खरोखरच कौतूक आहे, कारण मी फारसं कौतुक करत नाही.” एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही - तसेच, “रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात, ही मुलं बघा अन् दिल्लीतला पण मुलगा बघा या मुलांना कळतंय आणि त्याला एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही, गोळवलकरांचा विचार तर फारच लांबचा विषय आहे.” असंही पोंक्षे म्हणाले. या कार्यक्रमाचं लोन महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे - याचबरोबर, “काय करता येईल याचा विचार मी करतोय, या कार्यक्रमाचं लोन महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे. माझे खूप जवळचे स्नेही आता मुख्यमंत्री झाले आहेत त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत हे कार्यक्रम झाले पाहिजे. जिथं अनेक शाळेत सावरकरांचा फोटो लावला जात नाही, अन् धडा शिकवला जात नाही, भलतंच शिकवलं जातं तिथे असा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्यावतीने करायला लावू.” असं देखील यावेळी शरद पोंक्षे यांनी बोलून दाखवलं.