पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या तृतीय पंथीयांनी गणरायाकडे आमच्या बद्दलचे गैरसमज समाजातून दूर कर अशाप्रकारची प्रार्थना केली. “आम्ही दरवर्षी गणेशोत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतो. पण यंदा विशेष आनंद आहे की तृतीय पंथीयांच्या 377 कलमास एक वर्ष पूर्ण होत आहे. यामुळे आम्हाला समाजात सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण अजून देखील तृतीय पंथीयांच्या बद्दलचे गैरसमज समाजात आहेत. हे गैरसमज दूर व्हावेत. एवढीच आमची श्रीमंत दगडूशेठ हलवाई चरणी प्रार्थना आहे” अशी भावना तृतीय पंथी सोनाली दळवी यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सव काळात दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीय पंथीयांच्या हस्ते आरती आणि अभिषेक करण्यात येत असतो. यंदा देखील गुरूवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सोनाली दळवी आणि चांदणी गोरे या तृतीय पंथी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरती आणि अभिषेक केला. या दरम्यान अनेक तृतीय पंथीयांशी संवाद देखील साधण्यात आला. यावेळी चांदणी गोरे म्हणाल्या की, गणेशोत्सव काळात आम्ही दरवर्षी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येत असतो. या ठिकाणी आल्यावर एक समाधान लाभत आहे. पण आता समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिक मुक्त आणि पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.