पुणे : ‘आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. माणूस आपलेपणाकडे झुकला, तर देवरूप होतो. एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांची सेवा, परोपकाराचे कार्य करणारे आदर्श समाजात आहेत,’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

आयुर्वेदभास्कर कै. वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या जीवनकार्याच्या आढावा घेणाऱ्या ‘दर्शन योगेश्वराचे : आयुर्वेदभास्कर दादा वैद्य खडीवाले’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन डाॅ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, डॉ. राजीव ढेरे आदी उपस्थित होते.

भागवत म्हणाले, ‘संघाचे वर्णन एका शब्दांत करायचे झाले, तर तो शब्द आपलेपणा आहे. आपलेपणाची जाणीव ठेवून, जो वागतो तो मनुष्य असतो. महापुरुषांच्या वाटेने जायला सामान्य माणूस कचरतो. मात्र, आपलेपणाची वाट चोखाळणाऱ्या माणसांना तो आप्त समजतो. या आपलेपणानेच सर्वांचे जीवन उजळून निघावे, त्यासाठी कर्तृत्व खर्च करून स्वतःचेही जीवन उजळून टाकण्याची प्रेरणा समाजाला पुढे नेते, हीच संघाची भावना आहे. त्यातूनच समाजाचे परिवर्तन घडते.’ संगीता वैद्य खडीवाले यांनी उपस्थितांचे स्वागत तर विनायक वैद्य खडीवाले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी तर, डाॅ. राजीव ढेरे यांनी आभार मानले.

पुण्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात आयुर्वेदाचे विद्यापीठ नाही : डॉ. शां. ब. मुजुमदार

‘आयुर्वेदशास्त्रात पुणे हे नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. आयुर्वेदाचे अनेक जाणकार आणि ज्यांनी आयुर्वेदासाठी आयुष्य वेचले, अशा दिग्गज व्यक्ती पुण्यात आहेत. पुण्यात आजमितीस ३० विद्यापीठे आहेत. आयुर्वेद शास्त्राची ही मोठी परंपरा पुण्यात असूनही पुण्यातच काय महाराष्ट्रात आयुर्वेदासाठी विद्यापीठ नाही,’ अशी खंत डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘राजस्थान आणि गुजरातमध्ये मात्र विद्यापीठ आहे. पुण्यामध्ये आयुर्वेद विद्यापीठाची नितांत आवश्यकता असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पुण्यात आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न व्हावे,’ अशी अपेक्षा त्यांनी मोहन भागवत यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान, ‘संघ ठरवून काही करत नाही. विचार मांडला की कृती होते. त्यानुसार काम सुरू करावे. मदतीची आवश्यकता असल्यास संघ पुढे येईल,’ असे डाॅ. मोहन भागवत यांनी सांगितले.