भारतातून दरवर्षी अनेक लहान मुले हरवतात. त्यातील खूप कमी मुले सापडतात. ही मुले लवकरात लवकर सापडण्यास मदत व्हावी या उद्देशाने डॉ. मंदार तारू यांनी एक संकेतस्थळ सुरू केले आहे. या वेबसाइटच्या आधारे हरवलेल्या मुलांचा एक ‘डेटा बेस’ तयार होण्यास मदत होईल, असे तारू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार भारतातून दरवर्षी ४४ हजार मुले बेपत्ता होतात. त्यातील सुमारे एक चतुर्थाश मुले सापडत नाहीत. महाराष्ट्र पोलिस, राष्ट्रीय तपास यंत्रणा, राज्य आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांनाही या संकेतस्थाळाची मदत होईल, असे डॉ. तारू यांनी सांगितले. http://www.missingperson.india.in या संकेतस्थळावर हरवलेल्या मुलाची संपूर्ण माहिती छायाचित्रासह देता येणार आहे. तसेच हरवलेल्या व्यक्तींचे पोस्टर तयार करता येईल. संकेतस्थळाचे उद्घाटन २५ मे रोजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांचा सत्कार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.