सध्या थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. तापमान कमी झाल्याने दिवसाही वातावरणात गारवा जाणवतोय. या ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो. या ऋतूमध्ये आपल्या आहारात काय बदल केला पाहिजे हे समजावून घेऊ. आहाराच्या वेळा, या ऋतूमधील सर्वसाधारण आहार, विशेष आहार, विशेष बदल या क्रमाने आपण आहारपद्धती समजावून घेऊ यात. या लेखात आहाराच्या वेळांबाबत आपण माहिती घेऊ.
ल्ल हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते म्हणून या ऋतूमध्ये आपण जो आहार घेऊ त्यामध्ये अधिक ऊर्जा असणे गरजेचे आहे. रात्रीचे जेवण लवकर घ्यावे तसेच रात्री झोपताना दूध जरूर घ्यावे.
ल्ल रात्र मोठी असल्याने सकाळी लवकर (सकाळी ७ ते ८.३० पर्यंत) नाश्ता करावा. सकाळच्या नाश्त्याला शक्यतो उशीर करू नये किंवा नाश्ता करणे टाळू नये. काही कारणास्तव उशीर होणार असेल तर सुका मेवा उदाहरणार्थ बदाम, अक्रोड आदी सकाळी उठल्यावर खायला हरकत नाही. सकाळीही दूध लवकर प्यावे.
ल्ल शरद ऋतूमध्ये पचनशक्ती चांगली असते. भूक चांगली लागते आणि पचनही चांगले होते. त्यामुळे दोन जेवणांमध्ये जास्त अंतर ठेवू नका तसेच एका वेळी खूप जेवू नका. दिवसभरातल्या जेवणांमध्ये सकाळची न्याहारी जास्त चांगली असावी.
ल्ल दोन जेवणांमध्ये जास्त अंतर राहिल्यास आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी या ऋतूमध्ये सकाळचा नाश्ता लवकरच घ्यावा. अन्यथा सकाळची उपाशीपोटीची साखर कमी होण्याची शक्यता असते.
ल्ल ज्यांचे वजन खूपच कमी आहे, लहान मुले, जे अंगमेहनतीची कामे जास्त करतात आणि गर्भवती स्त्रिया यांनी तर सकाळच्या न्याहारीला खूप महत्त्व दिले पाहिजे. न्याहरी सकाळी ७ ते ८.३० पर्यंत, दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण, सायंकाळी ४ ते ५ दरम्यान हलका नाश्ता आणि रात्री ८ ते ९ दरम्यान रात्रीचे जेवण अशा वेळा शक्यतो पाळाव्यात.