आजच्या काळात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया चमकताना दिसत आहेत. पोलीस दलाचेच उदाहरण घ्यायचे तर श्रीदेवी गोयल, मीरा बोरवणकर, अर्चना त्यागी, शालिनी शर्मा, डॉ. रश्मी करंदीकर, स्वाती साठे अशा अनेक महिला अधिकाऱ्यांनी मोठय़ा पदांवर काम केले वा करीत आहेत. आता त्यातच साताऱ्याच्या किरोली या छोटय़ा गावातून आलेल्या पोलीस अधिकारी गीता चव्हाण यांची दहशतवादविरोधी पोलीस पथकात (एटीएस) पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक झाली आहे. या दलात महिला अधिकाऱ्याची नेमणूक पहिल्यांदाच झाली आहे. आता दहशतवादासाठी इसिस व इतर दहशतवादी संघटना महिलांचा वापर करीत आहेत, त्याचबरोबर दहशतवादी कृत्यांना महिलाही बळी पडत असताना या दलात महिला अधिकाऱ्याची झालेली नेमणूक सयुक्तिकच आहे. एटीएसची स्थापना २००४ मध्ये झाली, त्यानंतर अनेक वर्षांनी महिला अधिकाऱ्यास ही संधी मिळाली आहे. दहशतवादातही काळानुसार बदल होत आहेत त्याचे विश्लेषण, हल्ल्यात वापरलेली स्फोटके , मागच्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी संघटनांची माहिती, दहशतीची कृत्ये करण्याच्या पद्धती अशा सगळ्या बाबींचा अभ्यास करण्याची संधी व जबाबदारीही श्रीमती चव्हाण यांना मिळणार आहे. त्यांच्या मते एटीएसमधील पोलीस उपायुक्तपद ही आव्हानात्मक जबाबदारी आहे व त्यासाठी त्या सज्ज आहेत. पोलीस दलात काम करताना प्रत्येक दिवशी नवे अनुभव येत असतात, त्यात आता नवी भर पडणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गीता चव्हाण यांचा विवाह पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्याशी झाला. त्या सातारा जिल्ह्य़ातील एका शेतक ऱ्याच्या कन्या. वडिलांबरोबर नेहमी शेतात जात असत. आई-वडिलांनी त्यांच्या शिक्षणाला उत्तेजनच दिले. विज्ञानात पदवी घेतल्यानंतर त्यांनी कृषी विषयात विशेष प्रावीण्य मिळवले. पोलीस दलाचे त्यांना लहानपणापासून आकर्षण होते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल विचारायच्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन त्या २००७ मध्ये बीड जिल्ह्य़ात उपअधीक्षक झाल्या. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांना पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाली, त्या वेळी त्यांची नेमणूक अमरावतीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागात होती. आता त्या एटीएसमध्ये काम करणार आहेत. या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली आहे.