दहीभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी। जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी।। ही ओळ चौघांच्या मनात घुमली. ‘अतृप्त वासनेचं जन्ममूळ तिसऱ्या म्हणजे मणिपूर चक्रातच आहे, ही वासना शांत करण्यासाठी दहीभाताची उंडी आली असेल,’ या योगेंद्रच्या विधानानं ज्ञानेंद्र मात्र जरा कोडय़ात पडला. तो म्हणाला..
ज्ञानेंद्र – नाभीस्थानी मणिपूर चक्र आहे. नाभी म्हणजे बेंबीला वासनेचं मूळ म्हटलंय हेही खरं आहे. तिथे डॉक्टरसाहेबांच्या म्हणण्यानुसार पचनाची पॅरासिम्पथेटिक अ‍ॅक्टिव्हिटी चालते. मात्र या ठिकाणी वासनेचं प्रमाण इतकं बेसुमार आहे की अपचनाचा विकार जडला आहे, इथवरही समजलं, पण ‘दहीभाताची उंडी’ का आली? वासनेचा आणि दहीभाताचा काय संबंध?
हृदयेंद्र – भक्तिमार्गाच्या अंगानं या दहीभाताचा आणि या तिन्ही चक्रांचा अर्थ उकलतोय, असं वाटतंय..
कर्मेद्र – अरे तुम्ही गोंधळ नका घालू.. डॉक्टरसाहेब उरलेल्या तीन चक्रांच्या जागी शरीरशास्त्रानुसार काय काय आहे, हे सांगून टाका एकदाचं..
डॉ. नरेंद्र – (हसत) ठीक, किती चक्रं झाली आपली?
कर्मेद्र – तीन.. तीन तिघाडा काम बिघाडा..
हृदयेंद्र – ओहो.. कर्मू तुझ्या या बोलण्यातही किती गूढार्थ लपला आहे तुला कळतंय का?
कर्मेद्र – हृदयेंद्रस्वामीमहाराज! अभंगाचा तुम्ही सगळे लावताय तेवढा अर्थ खूप झाला.. एकमेकांच्या बोलण्याचा गूढार्थ शोधू नका.. (सारेच हसतात) ओके डॉक्टरसाहेब तीन चक्रं झाली..
डॉ. नरेंद्र – ठीक.. योगेंद्रजी सुरू करा..
योगेंद्र – चौथं चक्र आहे अनाहद हे हृदयपद्मी आहे..
डॉ. नरेंद्र – आणि आपण सारेच जाणतो इथे पल्सचं नियंत्रण होतं.. अर्थात हृदयाची गती नियंत्रित होते..
योगेंद्र – पाचवं विशुद्ध चक्र हे कंठद्वाराशी आहे.
डॉ. नरेंद्र – हा शरीरातला एक महत्त्वाचा भाग आहे. इथे थायरॉइड ग्रंथी आहेत. थायरॉइड ग्रंथी या भावाचं नियमन करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथेच स्वरयंत्रही आहे. थायरॉइड ग्रंथींचं महत्त्व कळण्यासाठी आधी शरीराचा थोडा विचार करा. आपल्या शरीराच्या सर्व क्रिया या रासायनिक घटकांनी चालतात. त्या रासायनिक क्रियांवर हार्मोन्सचा अर्थात संप्रेरकांचा अंमल असतो. या गळ्यापासून खालचं सर्व जे शरीर आहे त्याकडे जी संप्रेरकं जातात त्यावर या थायरॉइड ग्रंथींचं नियंत्रण आहे. या थायरॉइड ग्रंथींतून थायरॉक्झिन ही संप्रेरकं निर्माण होतात. छातीतली धडधड, आतडय़ांची हालचाल आणि आहार, पचन व प्रजनन यात ही संप्रेरकं मुख्य भूमिका बजावतात. कंठात असलेल्या या विशुद्ध चक्राजवळ थायरॉइड ग्रंथी, फुप्फुसाकडे जाणारी श्वासनलिका आणि जठराकडे जाणारी अन्ननलिका आहे. आपल्या शरीराच्या चलनवलनासाठी अन्न आणि श्वास किती महत्त्वाचा आहे, हे सांगायला नकोच. या थायरॉइड ग्रंथी आहेत ना त्यावर अंमल चालतो तो तुमच्या सहाव्या चक्रातून..
कर्मेद्र – चला बुवा, शेवटचं चक्र आलं एकदाचं..
योगेंद्र – सहावं चक्र आहे आज्ञाचक्र. हे भ्रूमध्यस्थानी आहे.
डॉ. नरेंद्र – हा शरीराचा जणू केंद्रबिंदूच आहे म्हणा ना! मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे शरीर अनेक रासायनिक घटकांनी कार्यरत आहे. या कार्यासाठी प्रेरणा देतात ती संप्रेरकं. शरीरातल्या रासायनिक क्रियांवर या संप्रेरकांचं नियंत्रण असतं. भ्रूमध्यात ऌ८स्र्३ँं’ंे स्र््र३४्र३ं१८ ं७्र२ अर्थात हायपोथलॅमो पिटय़ुटरी अ‍ॅक्सिस आहे. इथून थायरॉइड ग्रंथींवर नियंत्रण होतंच पण शरीरातील संप्रेरकेही इथूनच नियंत्रित होतात. म्हणजे जर कुठे संप्रेरकं कमी असतील तर त्यांचं प्रमाण वाढविण्याचा आदेश इथून जातो आणि कुठे संप्रेरकं जास्त असतील तर त्यांचे प्रमाणही इथूनच नियंत्रित होते.  हा मनाचा केंद्रबिंदू आहे, असं काही संशोधक मानत आहेत. हा जो पिटय़ुटरी आहे ना, तो मोठय़ा मेंदूचाच भाग आहे. पण थांबा मी थोडी अंतर्गत शरीररचनाच काढून दाखवतो..
असं म्हणत डॉक्टरांनी पॅडवर रेखाकृती काढली. छातीपासून मस्तकापर्यंतच्या त्या आकृतीकडे पाहात असतानाच माउलींच्या अभंगातला ‘आंबया डहाळी’पर्यंतचा अर्थच जणू योगेंद्र आणि हृदयेंद्रच्या डोळ्यासमोर उभा राहिला..
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara six steps
First published on: 26-01-2015 at 12:30 IST