मुघल वंशाचा पहिला राजा चेंगीझखान याच्यापासूनच मुघल राजवटींबद्दल अनेक गैरसमज पाश्चात्त्यांत आणि भारतीयांतही आहेत. ‘अकबरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघल सम्राटांच्या दरबारामध्ये संस्कृत भाषेला असलेले स्थान’ या विषयाचा सखोल अभ्यास करून अनेक दाखले देणाऱ्या या पुस्तकातून मात्र, हे गैरसमज गळून पडण्यास मदत होते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सम्राट अकबराची ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. येथील उच्चवर्णीय आणि कडव्या मुसलमानांना त्याच्याबद्दल काडीचीही आपुलकी नाही. कारण ते अकबराला खरा मुसलमान मानतच नाहीत. अकबर जरा जास्तच ‘सेक्युलर’ होता असे त्यांचे मत. ते हिंदू सनातन्यांना अजिबात अमान्य. त्यांच्या मते, तो कट्टर धर्मवादी होता, क्रूर होता, त्याचे पूर्वज आणि वंशज क्रूर होते, येथील हिंदूंच्या त्याने सरसकट कत्तली केल्या, त्याला दारूचे, अफूचे व्यसन होते, बायकांच्या बाबतीत तो नादान होता, अनैतिक होता. तेव्हा तो कसला थोर असा त्यांचा सवाल आहे. एकंदर कट्टर मुस्लीम आणि कडवे हिंदू यांचे अनेक बाबतीत एकमत असते. तसेच ते, अकबर थोर नव्हता याबाबतही आहे. त्यात तथ्य आहे असे मानले; येथील कट्टर हिंदुत्ववादी सांगतात त्याप्रमाणे अकबराचे आणि एकंदरच त्याच्या वंशजांचे चरित्र हे क्रूर आक्रमक आणि कट्टर हिंदुधर्मद्वेष्टय़ाचे होते असे मानले, तर मग अकबर आणि हिंदू रजपूत राजे यांच्या संबंधांचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो. अकबराने जैनांच्या पर्युषण पर्वात पशुवधावर घातलेल्या बंदीचे काय करायचे, मथुरेतील मंदिरांच्या संरक्षणासाठी त्याने जारी केलेल्या फर्मानांचे काय करायचे, अकबरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघल सम्राटांच्या दरबारात प्रवेश मिळावा म्हणून धडपडणाऱ्या ब्राह्मण पंडितांचे आणि जैन विद्वानांचे काय करायचे असाही प्रश्न पडतो. या सर्व सवालांतून एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कोणत्याही इतिहासपुरुषाचे चरित्र असे कृष्ण-धवल नसते. हिंदुस्थानातील मुघल कालखंडाकडे पाहायचे, तर ब्रिटिश कालखंडात आपल्या डोळ्यांवर चढविण्यात आलेला चष्मा बाजूला ठेवावा लागेल. बाबरापासून औरंगजेबापर्यंतचे मुघल राजे हे त्यांच्या काळातील अन्य राजांप्रमाणे धार्मिकच होते आणि धर्म हा त्यांच्या राजकारणाचा भाग होता. सोयीनुसार त्याचा वापर करण्यात येत होता. सोयीनुसार तो बाजूला ठेवण्यात येत होता. शिवाजी महाराजांसारख्या काही अपवादाने ही गोष्ट अधिकच स्पष्ट होते. तसे नसते, तर येथील असंख्य हिंदू राजे मुघलांच्या साम्राज्यासाठी झटले नसते. या झटण्यामध्ये अकबराच्या फौजांनी केलेल्या कत्तलींत भाग घेणे ही गोष्टही येते, हे लक्षात घेतले पाहिजे. मुघलांचा धर्म आणि त्यांचे राजकारण यांच्यातील हे नाते समजून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून ऑड्रे ट्रश्क (Audrey Truschke) यांच्या ‘कल्चर ऑफ एन्काउंटर्स’ या ग्रंथाकडे पाहता येईल. अकबरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघल सम्राटांच्या दरबारामध्ये संस्कृत भाषेला असलेले महत्त्वाचे स्थान हा त्यांच्या ग्रंथाचा विषय आहे. मुघल सम्राटांनी येथील हिंदू संस्कृतीची वाट लावली, ते रानटी आणि असंस्कृत होते, असा जो इतिहास उच्चरवाने सांगितला जातो, नेमका त्यालाच छेद देणारे असे हे प्रतिपादन आहे. ते पाहण्यापूर्वी हे मुघल म्हणजे कोण ते समजून घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Culture of encounters sanskrit at the mughal court
First published on: 20-08-2016 at 03:02 IST