सिद्धार्थ खांडेकर

एका अर्थाने हा सामना म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटसंस्कृतीचा विजय ठरला. पण यात भारतीय क्रिकेटसंस्कृतीने हार मानावी असेही काही घडलेले नाही..

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

इंग्लंड १९७९ आणि भारत २०२३ या दोन विश्वचषक क्रिकेट स्पर्धामध्ये साम्य काय? दोन्ही स्पर्धामध्ये यजमान संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला! विश्वचषक स्पर्धेमध्ये यजमान किंवा सहयजमान जिंकण्याचे प्रमाण फार उच्च नाही. आजवर १३ स्पर्धामध्ये चारच वेळा तसा योग येऊन गेला. २०१५ मध्ये न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाशी हरला, पण त्या वेळी दोघेही देश सहयजमान होते. इंग्लंड आणि भारताच्या बाबतीत वेगळेपण म्हणजे हे दोघेही एकल यजमान होते. इंग्लंडच्या १९७९ मधील संघापेक्षा भारताचा २०२३ मधील संघ अधिक गुणवान होता हे मात्र नक्की. ते काही असले तरी ऑस्ट्रेलियन संघाचा परवाचा विजय सामान्य नव्हता. कोणत्याही सांघिक विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धक्कादायक विजयांच्या यादीत तो पहिल्या पाचात गणला जाईल. अंतिम फेरीतले सामने कधीही ‘डेव्हिड वि. गोलिएथ’ स्वरूपाचे नसतात. तसले सामने कदाचित साखळी स्तरावर खेळले जात असतील. अंतिम फेरीत दाखल होणारे सर्व संघ तयारीत असतात. अनेक अडथळे पार करून आलेले असतात. तेव्हा एक संघ फारच कमकुवत आणि दुसरा प्रचंड बलवान असे काही घडत नाही. कमकुवत संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचत नाहीत. अंतिम फेरीत दाखल होणारे संघ सहसा समतुल्य असतात. त्यांच्या क्षमतेमध्ये आणि आवेगात (‘फॉर्म’ या अर्थी) थोडा फरक असू शकतो; पण दर्जामध्ये फार फरक नाही हे स्पर्धेतूनच सिद्ध झालेले असते. विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल झालेला ऑस्ट्रेलियन संघ याआधी अंतिम फेरीत गेलेल्या आणि विजयी ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाइतका बलवान नव्हता असे मात्र म्हणता येईल. त्याचप्रमाणे, विश्वचषक २०२३च्या अंतिम फेरीत दाखल झालेला भारतीय संघ आधीच्या अंतिम फेरीतील भारतीय संघांपेक्षा सामथ्र्यवान होता असेही म्हणता येईल.

याआधी १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ या वर्षी ऑस्ट्रेलियाने पुरुष विश्वचषक जिंकला होता. यात कदाचित पहिला (१९८७) आणि शेवटचा (२०१५) अपवाद वगळता, आधीचे संघ विद्यमान संघापेक्षा नि:संशय सामथ्र्यवान होते. १९७५ आणि १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ उपविजेता ठरला होता. भारतीय संघाने १९८३, २०११ या वर्षी विश्वचषक जिंकला आणि २००३ मध्ये अंतिम फेरी गाठली. या सर्व संघांपेक्षा विद्यमान संघ अधिक सामथ्र्यवान आहे. शिवाय ज्या प्रकारे त्यांची या स्पर्धेतली कामगिरी होती, ती थक्क करणारी होती. त्या विजयांच्या तपशिलात जाण्यात अर्थ नाही; पण अंतिम सामन्याआधीच्या दहा सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारत सरासरी १७५ धावांनी जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना सरासरी ६.४ गडी आणि सरासरी ६४.४ चेंडू राखून विजय मिळाले. ही एकतर्फी वाटचाल अविश्वसनीय होती. एखाद्या स्थानिक लीगमध्ये दादा संघाने बाकीच्या पिल्लू संघांना धूळ चारावी, तसा हा प्रकार होता. भारतीय संघ आपल्याच देशातील मैदानांवर खेळत होता, तेव्हा त्यात काय शौर्य असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र हल्ली आयपीएलमुळे तो घटकही निर्णायक राहिलेला नाही. पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियालाच हरवून भारताच्या विजयमालिकेची सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलियानेच या मालिकेचा शेवट करावा हा काव्यात्मक न्याय. हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला. कारण अंतिम सामन्याच्या दिवशी एकाही बाबतीत भारताला ऑस्ट्रेलियावर वरचष्मा गाजवता आला नाही. अडखळत, चाचपडत, धडपडत ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचला नि त्या सामन्यात भारतीय संघासारखा खेळला. उलट आधीच्या फेऱ्यांमध्ये सुसाटत निघालेला भारतीय संघ अंतिम फेरीत अडखळत, चाचपडत, धडपडत खेळला. फार कमी वेळा इतिहासात अंतिम सामन्यात प्रबळ दावेदार संघाचे अशा प्रकारे धैर्यस्खलन झालेले आढळेल. काही दाखले चटकन नजरेसमोर येतात. फुटबॉल विश्वचषक १९५४च्या अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीने केलेला हंगेरीचा पराभव उल्लेखनीय ठरला होता. १९७४ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीनेच योहान क्रायुफ यांच्या नेदरलँड्सचा केलेला पराभव असाच धक्कादायक ठरला होता. ‘विश्वचषक कधीही जिंकू न शकलेले सर्वोत्तम संघ’ या यादीत हंगेरी आणि नेदरलँड्स यांचा सन्मानाने समावेश केला जातो. दोन्ही वेळेस प्रतिस्पर्धी पश्चिम जर्मनीचा संघ फार कमकुवत होता अशातला भाग नाही; पण हंगेरी आणि नेदरलँड्स यांनी नितांतसुंदर खेळ करून दाखवला होता आणि ते जवळपास अविजित वाटत होते, हा मुद्दा आहे. क्रिकेट विश्वचषक १९८३च्या अंतिम सामन्यात बलाढय़ वेस्ट इंडिजला कपिलदेव यांच्या भारतीय संघाचे धूळ चारली होती, तो सामनाही धक्कादायक होता. कारण कागदावर नगास नग समीकरणात वेस्ट इंडिजचा संघ किती तरी सरस होता. शिवाय आधीच्या दोन विश्वचषक स्पर्धा त्यांनी तुलनेने सहजपणे जिंकूनही दाखवल्या होत्या. युरो २००४ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान पोर्तुगालचा ग्रीसकडून झालेला पराभव संस्मरणीय होता. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नुकताच उदय होत होता; परंतु पोर्तुगालचा तो संघ अस्ताकडे निघालेल्या सुवर्णपिढीसाठी ओळखला जायचा. ऑस्ट्रेलियाने भारतावर मिळवलेला विजय हा या मालिकेतला होता.

भारतीयांच्या अफलातून कामगिरीचे श्रेय देशी आणि परदेशी विश्लेषक येथील क्रिकेट गुणवत्तेला आणि या गुणवत्तेस पैलू पाडू शकेल अशा अव्वल दर्जाच्या पायाभूत सुविधांना देत होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटू उत्तम खेळतात कारण दीर्घ मुदतीचे क्रिकेट खेळण्याची सवय स्थानिक आणि वयोगट क्रिकेटमधून त्यांच्या अंगवळणी पडते, असे अनेक जण सांगत/लिहीत होते. हे ‘प्रोसेस’चेच यश नव्हे काय, असे विचारत होते. भारताच्या दुर्दैवाने क्रिकेट ‘प्रोसेस’ आणि क्रीडासंस्कृती फार आधीपासूनच रुजलेला ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यात आपल्या समोर होता. क्रिकेटमध्ये या दोन महासत्तांच्या द्वंद्वाइतके दुसरे मोठे आणि रंजक द्वंद्व नाही. भारत-पाकिस्तान लढती या एकतर्फी बनत चालल्या आहेत. कारण हे सामने आता तुल्यबळ संघातले नसतातच. अ‍ॅशेस लढती बेभरवशाच्या असतात. शिवाय गोऱ्यांच्या विश्वापलीकडे त्यांना फारशी किंमत नाही. ऑस्ट्रेलिया ही क्रिकेटमधली चिरकालीन महासत्ता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय साहेबाच्या इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने नोंदवला होता. इतर कोणत्याही देशापेक्षा वर्षांनुवर्षे, दशकानुदशके ऑस्ट्रेलियन संघाने क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजवले आहे. क्रीडासंस्कृती, क्रीडाविज्ञान, क्रीडा सुविधा, क्रिकेट प्रक्षेपण या सर्व क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाने निर्माण केलेले मानदंड कालातीत ठरले. या ऑस्ट्रेलियाशी खऱ्या अर्थाने टक्कर घेण्याचे धाडस आणि सातत्य नवीन सहस्रकात एकाच देशाने दाखवले आणि तो देश म्हणजे भारत. भारताने अनेकदा ऑस्ट्रेलियाची विजयमालिका खंडित केली. काही अत्यंत जिव्हारी लागणारे पराभव (कोलकाता २००१, पर्थ २००८, ब्रिस्बेन २०२१) भारतानेही ऑस्ट्रेलियाला ‘भेट’ दिले आहेत. भारतातल्या प्रोसेसकडे ऑस्ट्रेलियाचेही लक्ष आहेच. आयपीएलचे आयोजन भारताने ऑस्ट्रेलियन बिग बॅशच्या आधी आणि अधिक यशस्वीरीत्या करून दाखवले. त्यातून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचेही उखळ पांढरे झाले, हे नाकारता येत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंमध्ये, क्रिकेटव्यवस्थेमध्ये आणि क्रिकेटरसिकांमध्ये भारताविषयी आकर्षण आणि आदरभाव आहे. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानांवर सलग दोन कसोटी मालिकांमध्ये हरवणारा संघ भारतच आहे. सचिन तेंडुलकरनंतरही भारतात क्रिकेट गुणवत्ता टिकून राहिली आणि वृिद्धगत झाली, हे ऑस्ट्रेलियाने पाहिले. सुरुवातीस मैदानावर शिवीगाळ करणाऱ्या विराट कोहलीला त्यामुळेच नंतर ऑस्ट्रेलियाने आपलेसेही केले. दोन क्रिकेटव्यवस्थांमध्ये वाद काही कमी झाले नाहीत; पण ऑस्ट्रेलियन संस्कृतीत जिंकण्याची सवय निवलेली नाही, हे ओळखण्यात

बहुधा भारतीय क्रिकेट संघ कमी पडला

असावा. एका अर्थाने हा सामना म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटसंस्कृतीचा विजय ठरला; पण यात भारतीय क्रिकेटसंस्कृतीने हार मानावी असेही काही घडलेले नाही. ऑस्ट्रेलिया हे ओळखून आहे, तोवर भारताविषयी आदरभाव  राहणारच.