६ डिसेंबर १९७८ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कजवळील रामदास भुवन येथे श्रीपाद शंकर नवरे यांचे निधन झाले. ते संपादक व सामाजिक कार्यकर्ते होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ते प्राज्ञपाठशाळेतील शिक्षक सहकारी होते. त्यांच्या निधनानंतर मासिक ‘नवभारत’च्या फेब्रुवारी, १९७९ च्या अंकात तर्कतीर्थांनी श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता.
श्रीपाद शंकर नवरे यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०० चा. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात ते दाखल झाले. १९२०-२१ च्या असहकारिता आंदोलनात ते महात्मा गांधींच्या आवाहनानुसार शिक्षण सोडून सक्रिय झाले. वाई येथील प्राज्ञपाठशाळेत ते धर्म आणि वेदांत शिकवू लागले. इतिहास, निबंध, साहित्य, कविता यांशिवाय ते मैदानी खेळ शिकवीत. सुट्टीच्या दिवशी भाषणे, चर्चा, सभा योजत. ‘धार्मिक अधिष्ठान असल्याशिवाय भारताची राजकीय स्वातंत्र्यांची चळवळ यशस्वी होणार नाही’, अशी त्यांची पक्की धारणा होती. ते स्वातंत्र्यचळवळीतही सक्रिय होते. नारायणशास्त्री मराठे करीत असलेल्या धर्मसुधारणांशी ते सहमत होते. नवरे यांनी १९२४ ला प्राज्ञपाठशाळा सोडली. नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून अर्थशास्त्र व इतिहासातील बी.ए. पदवी संपादून १९२७ ला ते मुंबईत स्थायिक झाले.
मुंबईत ‘लोकमान्य’, ‘प्रभात’, ‘गोमंतवाणी’सारखी वृत्तपत्रे सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. निर्भीड व स्वतंत्र विचारांचे नवरे हे समर्थक होते. पुराव्याशिवाय न लिहिण्याचा दंडक त्यांनी आयुष्यभर पाळला. वृत्तपत्रातील टिंगल-टवाळीपर लेखनाच्या ते विरुद्ध होते. घोटाळे, बदनामी यासंबंधीची वृत्ते जबाबदारीने व जोखीम लक्षात घेऊन प्रकाशित करण्यासंबंधी ‘पुरावा हीच खात्री’चे तत्त्व त्यांनी व्रत म्हणून पाळले. खपाची वृत्ते, कुलंगड्या छापण्याच्या ते विरुद्ध असत. प्रक्षोभक, सनसनाटी वृत्ते देऊन वृत्तपत्राचा भाव वधारण्याच्या प्रवृत्तींना त्यांनी सतत नकार दिला. ‘मौज’च्या प्रा. श्री. पु. भागवत यांनी म्हटले आहे की, ‘नवरे हे स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेत नव्हते; पण खरेखुरे गांधीवादी होते.’
माटुंगा, मुंबईस्थित ‘हिंदू श्रद्धानंद महिलाश्रम’चे ते संस्थापक सदस्य, सचिव होते. १९२७ ते १९६९ अशा तब्बल चार दशकांहून अधिक काळात रोज ५ ते ७ तास खपून त्यांनी या आश्रमाच्या माध्यमातून अनाथ, निराधार मुले, मुली आणि महिलांच्या संगोपन, संरक्षण, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसनाचे महत्कार्य केले. दु:खित, पतित, परित्यक्ता, अपंग, निराधार, अनाथ, तसेच अनौरसांप्रति त्यांचा भाव व कार्य संत तुकारामांच्या ‘जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले।’ आणि ‘ज्यासि अपंगिता नाही। त्यासि धरी जो हृदयी।’ असेच होते.
श्री. शं. नवरे यांनी महात्मा गांधींचे कृतिशील अनुकरण करीत स्वत: त्यांनी आंतर पोटजातीय विवाह १९२९ च्या फेब्रुवारीमध्ये अमरावतीत केला. या विवाहास होणारा तत्कालीन विरोध लक्षात घेऊन नारायणशास्त्री मराठे यांचे प्रतिनिधी म्हणून तर्कतीर्थ या विवाहास उपस्थित होते. पुढे आपल्या वडिलांचा कित्ता त्यांच्या दोन्ही मुलींनी आंतरजातीय व आंतरधर्मीय (मराठी / ख्रिाश्चन) विवाह करून गिरविला होता. नवरे यांचे कुटुंब आंतरभारतीय होते. ते कर्ते सुधारक होते.
मुंबई पत्रकार परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी साहित्य महामंडळ, प्राज्ञपाठशाळा मंडळ अशा अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी म्हणून सक्रिय होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बाजूने ठराव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे निरंतर कार्य श्री. शं. नवरे यांनी केले. १९५४ मध्ये दिल्ली येथे संपन्न साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ द्वैभाषिक महाराष्ट्र समर्थक होते; पण तिथेही नवरे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडून मंजूर करून घेतला होता.
श्री. शं. नवरे यांच्या निधनानंतर मुंबई मराठी साहित्य संघात संपन्न सार्वजनिक शोकसभेचे अध्यक्ष तर्कतीर्थ होते. तर्कतीर्थ व अन्य मित्र नवरे यांना खासगीत ‘पंत’ संबोधत. श्रद्धांजली ठरावात तर्कतीर्थांनी ‘पंत हे संत होते. ‘त्यांच्या पुण्यस्मृतीस ही सभा श्रद्धांजली वाहते,’ असे लिहिले; पण त्यांना सद्गती लाभो’, असे लिहिणे टाळले. कारण, तर्कतीर्थांची अशी धारणा होती की, अशा, सत्पुरुषाला सद्गतीच लाभते.
drsklawate@gmail.com