राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशाच्या क्रांती-लढय़ात भाग घेतला. भारत- चीन युद्धाच्या वेळी प्रत्यक्ष नेफाव व लडाखच्या सीमावर्ती भागात जाऊन भारतीय सैनिकांचे मनोधर्य वाढविले. पण जगात शांतता नांदून युद्धे का थांबू शकत नाहीत, युद्धे थांबविण्याचा मार्ग कोणता? हे त्यांच्यापुढील प्रश्न होते. याविषयी महाराज म्हणतात : जगात शांतता नांदावी, सर्वांनी परस्परांशी आपुलकीने वागून आपली व आपल्या राष्ट्राची प्रगती करण्याचा प्रयत्न करावा, हे रम्य सुखस्वप्न आजवर सर्वच संतमहापुरुषांनी आपल्यापुढे ठेवले आणि त्याला प्रत्यक्षात आणण्याचा सतत प्रयत्न केला. हे सर्वांना कळत असूनही लोक त्याच महापुरुषांच्या नावावर दुही माजवीत आहेत, आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळे गट पाडून, त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून इतरांवर कुरघोडीचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच महापुरुषांचे सुखस्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही.

NCP, BJP, Sunil Tatkare,
२०१७ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती होणार होती – सुनील तटकरे
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

हेही वाचा >>> चिंतनधारा : स्पृश्यास्पृश्य हटे..

सर्व काही बदलू शकते, मग जगातील युद्धाचा सिद्धांतच का बदलत नाही? देशादेशांतील ही युद्धे बंद का होत नाहीत? त्यालादेखील उपाय आहेत. ‘युद्धे बंद व्हावीत’ असे जितक्या अधिक लोकांना मनापासून वाटू लागेल तितक्या अधिक प्रमाणात युद्धाची प्रवृत्ती मंदावत जाईल. सध्या तर सर्वच राष्ट्रे युद्ध टाळण्याची भाषा वापरताहेत पण दुसरीकडे सर्वांचीच युद्धसामग्री, सैन्य व नवनवे शोध वाढविण्याची तयारी चालू आहे. विधायक दृष्टीने राष्ट्र सुसंस्कृत व बळकट करण्याऐवजी या अमानुषतेच्या मार्गावरच राष्ट्रांची जास्तीत जास्त संपत्ती सतत खर्ची पडत आहे. याचाच अर्थ असा की युद्धाचा वीट अजून या लोकांना आलेला नाही. सामान्य जनता या प्रवृत्तीला कंटाळली आहे पण थोरामोठय़ांना हे कळत नाही. महात्मा गांधींच्या अहसाशस्त्राने सारे जग सुखशांती अनुभवू शकते! युद्ध हा स्वार्थी व विकारी भावनांचा स्फोट आहे. मनुष्याच्या क्रोधाच्या मुळाशी जसा अतृप्त लोभ असतो तसाच राष्ट्रांच्या पुढाऱ्यांच्या मनातील महालोभ या युद्धांच्या पाठीशी आहे.

हेही वाचा >>> चिंतनधारा: देखावा नको, कर्तव्य करा!

राष्ट्राराष्ट्रांत युद्ध जुंपण्याच्या मुळाशी कोणातरी राष्ट्रचालकांचा कमीअधिक स्वार्थ वा गुन्हा असतो आणि त्याची कटू फळे मात्र जनतेला भोगावी लागतात. ही प्रवृत्ती बदलण्याचे मुख्य साधन मानवतेची संस्कृती वाढवणे हेच असू शकते. त्याप्रमाणे मानवता, बंधुता, समता आदी भावनांचा विकास करणारे महापुरुषही जगाच्या पाठीवर वेळोवेळी येतच असतात. पण साऱ्या विश्वात वजन मिळवून त्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी त्यांना मिळणारा वेळ अपुरा असतो. सामान्य जनतेची बुद्धिमत्ता ही परंपरागत संस्कार बाजूस सारून त्यांची विचारप्रणाली ग्रहण करण्यास तितकी समर्थ नसते आणि स्वार्थी धेंडांना त्यांची ही विचारसरणी स्वत:च्या अहिताची वाटल्यामुळं ते त्यांचा छळ व विरोध आणि जनतेची दिशाभूल करण्यातच वेळ घालवीत असतात. महापुरुषांच्या या अपूर्ण प्रयत्नाला त्याच दिशेने चालना देऊन जर त्यापुढच्या पुढाऱ्यांनी कार्य केले, प्रत्येक राष्ट्र जर याप्रमाणे मानवता आणि सहकारीवृत्ती, बंधुत्व आणि सेवाबुद्धी यांनी रंगून गेले तर जगात युद्ध होण्याचे कारणच उरणार नाही.

rajesh772@gmail.com