‘या तारेने आमचा जीव घेतला…’, १८५७ च्या उठावानंतर एका भारतीय क्रांतिकारकाचे हे हताश उद्गार ब्रिटिशांच्या तांत्रिक प्रगतीबद्दल खूप काही सांगून जातात. भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तार आणि स्थैर्यात १९व्या व २०व्या शतकाच्या सुरुवातीस झालेल्या तांत्रिक प्रगतीचा मोठा वाटा होता. ते सत्तेची किल्ली ठरले. त्यामुळेच ब्रिटिशांनी लष्करी, आर्थिक व प्रशासकीय पातळीवर वर्चस्व मिळवले. स्थानिक सुधारित तंत्रज्ञान (उदा. मराठा आरमार, टिपू सुलतानची तंत्रदृष्टी इ.) इंग्रजांनी कपटनीतीचा वापर करून संपवले. या तंत्रज्ञानाच्या तफावतीतील दूरगामी परिणामांमुळे वसाहती राजवटीच्या रचना दृढ होत गेली, इतकी की भारतीय समाजावरही तिचा खोल ठसा उमटला.

संपर्कमाध्यमे

रेल्वेचा प्रसार हा भारतीय उपखंडाला नियंत्रित करण्याच्या वसाहती प्रशासनाच्या धोरणात निर्णायक ठरला. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, प्रमुख शहरे आणि समृद्ध प्रदेशांना रेल्वेने जोडणे सुरू झाले. लॉर्ड डलहौसी यांनी रेल्वेची कल्पना लष्करी हालचालींसाठी आणि आर्थिक शोषण सुलभ करण्यासाठी मांडली होती, ती भारतीय समाजाच्या व्यापक फायद्याऐवजी वसाहती प्रशासनाच्या गरजांसाठी होती. उदाहरणार्थ, बंगालमधून कापसाची वाहतूक करणे किंवा मुंबईतून देशभरात लष्करी तुकड्या पाठवणे या रेल्वेमुळे अधिक वेगाने आणि कमी खर्चात शक्य झाले. १८५७ च्या उठावादरम्यानही रेल्वेने ब्रिटिश सैन्याला तातडीने बंड दडपण्यास मदत केली. तसेच, कापूस आणि नीळ अशा नगदी पिकांची बंदरांपर्यंतची वाहतूक सुलभ झाली. त्याचबरोबर स्थानिक उद्याोग, पारंपरिक हस्तकलेचा ऱ्हास होऊन रेल्वे आर्थिक शोषणाचे प्रतीक बनली.

तार प्रणालीने तर, भारत आणि ब्रिटन यांच्यातील तसेच देशांतर्गत संवाद पद्धतीत क्रांती घडवून आणली. १८६९ पर्यंत टेलिग्राफिक लाइन्स संपूर्ण उपखंडात पसरल्यामुळे, माहिती द्रुतगतीने पोहोचवणे शक्य झाले. ब्रिटनला भारताशी जोडणाऱ्या समुद्राखालून टाकलेल्या तारांनी साम्राज्याच्या नियंत्रणाला अधिक बळ दिले. जे. आर. सीली यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘तार प्रणालीने ब्रिटिश राजकीय यंत्रणेकरता नवीन मज्जासंस्था प्रदान केली,’ – त्यामुळे आदेश तत्काळ पोहोचवणे आणि उठाव दडपणे शक्य झाले. दुसरीकडे, या तंत्रज्ञानाने भारतीय राष्ट्रवादी चळवळींनादेखील प्रोत्साहन दिले, कारण त्यामुळे विचारांचे आदान-प्रदान आणि व्यापक पातळीवर प्रतिकाराचे समन्वयन शक्य झाले.

वाफेवरील जहाजांमुळे भारत आणि ब्रिटन यांमधील प्रवासाचा वेळ कमी झाला. १८६९ मध्ये सुएझ कालव्याच्या उद्घाटनाने ब्रिटिश साम्राज्याला विलक्षण धोरणात्मक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे युरोप आणि भारतामधील प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी केला, अधिकाऱ्यांची, सैनिकांची आणि वस्तूंची जलद हालचाल सुलभ झाली. समुद्री मार्गावरील अवलंबित्व कमी झाले. व्यापारी जहाजांसाठी खर्च आणि वेळ वाचला. उदाहरणार्थ, ब्रिटिश सैन्याने युद्धाच्या वेळी तातडीने भारतात पोहोचण्यासाठी याचा प्रभावीपणे उपयोग केला. याशिवाय, भारतातून कच्चा माल ब्रिटनला पाठवणे अधिक वेगवान आणि कमी खर्चीक झाले, ज्यामुळे वसाहती आर्थिक शोषण आणखी तीव्र झाले. वाफेवरील जहाजांमुळे देशांतर्गत ब्रिटिशांना नदीमार्गाने देशांतील अंतर्गत भागात पोहोचणे शक्य झाले. तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी वाफेच्या शक्तीला ‘राष्ट्रीय शक्तीचा अविभाज्य भाग’ म्हटले होते, यातून या तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक महत्त्वाचे प्रतिबिंब दिसते.

लष्करी, कृषी आणि वैद्याकीय तंत्रज्ञान

लष्करी तंत्रज्ञानाने भारतातील ब्रिटिशांच्या विजय आणि प्रादेशिक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. १८४३ मधील हैदराबादच्या लढाईत ब्रिटिशांनी सुधारित तोफखान्याचा वापर करून निर्णायक विजय मिळवला. १८५७ च्या उठावादरम्यान वापरलेल्या ब्रीच-लोडिंग रायफल्सने ब्रिटिश सैन्याला लष्करी लाभ मिळवून दिला. शस्त्रास्त्रांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे ब्रिटिश सैन्याला भारतीय सैन्यावर निर्णायक विजय मिळवता आला. तोफखाना आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी महत्त्वाच्या लढायांमध्ये ब्रिटिशांचे वर्चस्व कायम ठेवले. युद्धाचे यांत्रिकीकरण केवळ प्रतिकार दडपण्यासाठी नव्हते, तर ब्रिटिशांनी त्याचा वापर स्वत:ला पराक्रमाचे प्रतीक बनवण्यासाठीही केला. १८५७ च्या उठावात आधुनिक एनफील्ड रायफल्समुळे अधिक अचूकता, लांब पल्ला आणि वेगाने दारूगोळा पुनर्भरण करण्याची सुविधा मिळाली. याचा इंग्रजांना मानसिक आणि रणनीतिक आक्रमकतेत मोठा फायदा मिळाला. भारतीय सैन्याने कधी कधी इंग्रजांकडून पकडलेल्या रायफली वापरल्या; परंतु वैज्ञानिक प्रशिक्षण आणि सरावाच्या अभावामुळे त्यांचे कौशल्य अपुरे ठरले.

नकाशे तयार करण्याच्या प्रगत पद्धती आणि त्रिकोणमितीय सर्वेक्षणाच्या साहाय्याने रणनीती आखण्याचा तंत्राने ब्रिटिशांना भारतीय भूभागाची ओळख अधिक चांगल्या पद्धतीने झाली. अनेक दशके चाललेल्या त्रिकोणमितीय सर्वेक्षणाने तपशीलवार नकाशे तयार केले, त्यामुळे संसाधन ओळख, पायाभूत सुविधा नियोजन आणि लष्करी कारवाया सुलभ झाल्या. हे नकाशे केवळ प्रशासनाचे साधन नव्हते; ते भारताच्या प्रत्येक अंगावर नियंत्रण मिळवण्याच्या वसाहती इच्छेचे प्रतीक होते. छपाई यंत्र हे दुसरे तंत्रज्ञान होते ज्याने ब्रिटिश राजवटीस पाठबळ दिले. प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके, वर्तमानपत्रे आणि अहवालांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे ब्रिटिशांना जनमत घडवणे आणि धोरणे प्रभावीपणे पोहोचवणे शक्य झाले. मात्र याचा दुधारी परिणाम झाला- राष्ट्रीय नेत्यांनी आपले विचार पसरवण्यासाठी आणि वसाहतवादाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी हे माध्यम वापरले. औषधोपचारातील प्रगती, जी बऱ्याचदा दुर्लक्षित केली जाते, भारतातील ब्रिटिश उपस्थिती टिकवून ठेवण्यात महत्त्वाची ठरली. मलेरियासारख्या उष्णकटिबंधीय आजारांसाठी लस आणि उपचारांमुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आणि सैनिकांचा मृत्युदर कमी झाला, ज्यामुळे त्यांना भारतातील कठीण हवामानाचा सामना करण्याची संधी मिळाली. या वैद्याकीय प्रगतींनी केवळ ब्रिटिश नियंत्रण टिकवून ठेवले नाही तर आधुनिकतेच्या ब्रिटिश कथानकालादेखील पाठबळ दिले.

कृषी आणि सांस्कृतिक परिणाम

सिंचनाच्या तंत्रज्ञानाने भारताचे कृषी परिदृश्य बदलले. काही भागात उत्पादकता वाढली पण नवीन आव्हानेही निर्माण केली. मोठ्या प्रमाणावर कालवे प्रकल्पांनी ओसाड भागात शेतीसाठी नवी जमीन उपलब्ध करून दिली; परंतु अन्नधान्याऐवजी नगदी पिकांना प्राधान्य दिल्यामुळे दुष्काळ आणि अन्न-असुरक्षितता वाढली. निर्याताभिमुख शेतीच्या जोरावर पारंपरिक शेती पद्धती विस्थापित झाल्या. याचा परिणाम ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेवर झाला. कृषी तंत्रज्ञानाने वसाहती अर्थव्यवस्थेला अधिकच बळ दिले. सिंचन प्रकल्पांनी शेतीयोग्य जमिनीची वाढ केली, परंतु यामुळे क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढले आणि वनीकरणाचे नुकसान झाले. यांत्रिक शेती उपकरणांच्या आगमनाने पारंपरिक पद्धती विस्थापित होऊन, ग्रामीण भागात सामाजिक व आर्थिक अराजकता निर्माण झाली.

भारतातील वसाहती व्यवस्थेवर तंत्रज्ञानाचा मनोवैज्ञानिक परिणामही झाला. स्वत:ला महान दाखविण्याच्या प्रयत्नात भारतीय समाज, विचार आणि तंत्रज्ञान यांना अप्रगत, अंधश्रद्ध आणि बदलांना विरोध करणारे घोषित करण्यात आले. भारत हे अस्वच्छता आणि आजारपणाचे आगर असल्याचे दाखविले गेले. ब्रिटिशांनी स्वत:ला ‘तंत्रज्ञानाचे दैत्य’ म्हणून प्रक्षेपित केले, विज्ञानावर प्रभुत्व गाजवून त्यांनी आपले वसाहती राज्य योग्य असल्याचे दाखवत कल्याणकारी निरंकुशतेचा बुरखा पांघरला. जे.आर. सीली यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘वाफशक्ती आणि विजेने ब्रिटनचा एक ‘ग्रेटर ब्रिटन’ निर्माण केला’. तंत्रज्ञानाचा धार्मिक आणि सांस्कृतिक परिणामही दिसून येतो. धर्मप्रसारकांनी स्थानिक भाषांमध्ये बायबल आणि धार्मिक पुस्तके छापण्यासाठी छपाई यंत्राचा वापर केला, तंत्रज्ञानाचा उपयोग धर्मांतरासाठी आणि सांस्कृतिक मिलाफासाठी केला. वैद्याकीय प्रगतीने मिशनऱ्यांच्या प्रयत्नांना प्रतिष्ठा मिळवून दिली, कारण त्यांना प्रगती आणि दयाळूपणाचे प्रतीक मानले गेले.

तंत्रज्ञानाचा ब्रिटिश साम्राज्याच्या भारतातील विस्तारामधील भूमिकेचा विचार करता, हे स्पष्ट होते की तंत्रज्ञानात्मक श्रेष्ठता हे केवळ साधन नव्हते तर, वर्चस्ववादाचे साध्य होते. तांत्रिक तफावतीने भारतीयांना युद्ध, अर्थकारण अशा भौतिक स्तरावर पिछाडीवर सोडलेच मात्र मानसिक आघात करून भारतीय असण्याचा न्यूनगंड ब्रिटिशांनी भारतीयांच्या मनावर बिंबवला. केवळ संसाधनांच्या वसाहतीकरणावर समाधान न मानता त्याचा मानसिक परिणाम करण्यावर तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका होती. दुर्दैवाने साम्राज्यवादाची लढाई मानसिक प्रारूपापर्यंत नेण्याची गरजदेखील ब्रिटिशांनी मनोविज्ञानाच्या सखोल अभ्यासानंतरच ओळखली होती. काळाच्या ओघात एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाचे माहेरघर असणाऱ्या भारताला अक्षम्य दुर्लक्षामुळे गुलामीच्या अंधारात खितपत पडावे लागले तर दुसरीकडे भारतात पोहोचण्यासाठी चाचपडणाऱ्या ब्रिटिशांना तेच तंत्रज्ञान साम्राज्यवादाचा राजमार्ग बनले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


phanasepankaj@gmail.com