भारतातील बहुतेक सर्व विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये किरकोळ वा गंभीर स्वरूपाचे बिघाड निर्माण होऊन, उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडू लागले आहेत. कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी नागरी विमान वाहतूक क्षेत्र हे प्रगतीचा निदर्शक मानले जाते. भारतात स्थानिक बाजारपेठेत काही विस्कटलेल्या विमान कंपन्या नव्याने उभ्या राहात आहेत, काही नवीन कंपन्या येत आहेत, इतर काही कंपन्या आपले स्थान अधिक बळकट करत आहेत. करोनाचा मोठा आघात सहन केल्यानंतर हे क्षेत्र नव्याने उभारी घेऊ पाहात आहे. परंतु असे करत असताना सुरक्षितता तपासण्या आणि देखभाल दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे अलीकडच्या काही घटनांतून सिद्ध होते. या घटनांची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच विविध ठिकाणी विमानांची अचानक तपासणी केली. त्यावेळी काही कंपन्यांच्या विमानांसाठी प्रशिक्षित आणि पुरेसे तंत्रकुशल मनुष्यबळ उड्डाणस्थळी उपस्थित नव्हते, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली. विमानांच्या वाढीव उड्डाणफेऱ्या आणि अधिकाधिक व्यवसाय पदरात पाडून घेण्याच्या हव्यासापोठी विमानांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्याची गंभीर दखल घेण्याची वेळ आलेली आहे. विमानवाहतूक महासंचालनालयाने निव्वळ नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे अधोरेखित केली आहेत. त्याऐवजी दंडात्मक आणि निलंबनात्मक कारवाईची वेळ आली आहे. कारण गेल्या काही आठवडय़ांतील घटना देखभाल-दुरुस्तीतील दुर्लक्षाचा पटच मांडतात. इंडिगो एअरलाइन्सचे शारजाहून हैदराबादला निघालेले विमान एका इंजिनात बिघाड झाल्यामुळे परवा तातडीने कराची विमानतळावर उतरवावे लागले. अशा प्रकारे तातडीने एखादे विमान कराचीत उतरवले जाण्याची ही दुसरी वेळ. गेल्या महिन्यातच स्पाइस जेट कंपनीचे दुबईला निघालेले विमान तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे तेथे उतरवावे लागले होते. एअर इंडिया एक्स्प्रेसचे दुबईला निघालेले विमान सामान कक्षात जळका वास आल्यामुळे तातडीने मस्कत येथे उतरवण्यात आले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्याच आणखी एका विमानाच्या वैमानिक कक्षात चक्क अशा वेळी चिमणी आढळून आली, जेव्हा हे विमान ३७ हजार फूट उंचीवरून उडत होते! स्पाइस जेट कंपनीच्या विमानांमध्ये महिन्याभरात आठ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे धडाडीचे म्हणून ओळखले जातात, तेव्हा ही धडाडी विमान कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी दाखवली पाहिजे. वास्तविक कोणतेही विमान हा अभियांत्रिकीतील प्रगतीचा अत्युच्च आविष्कार मानला जातो. मात्र पूर्ण कार्यक्षमतेने दीर्घकाळ कार्यरत राहण्यासाठी इतर कोणत्याही महत्त्वाच्या यंत्राप्रमाणे त्यांची वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती होणे आवश्यक असते. येथे तडजोड किंवा जवळचा मार्ग (शॉर्ट कट) असे काही असू शकत नाही. निव्वळ खंडीभर विमान कंपन्या देशात कार्यरत आहेत याचा अर्थ देशातील विमान वाहतूक क्षेत्र सुरळीत आहे, असे नव्हे. विमान सुरक्षेच्या बाबतीत सरकारी आणि खासगी पातळीवर अक्षम्य हेळसांड दाखवल्याबद्दल इंडोनेशियाला युरोप आणि अमेरिकेतील विमान वाहतूक यंत्रणांनी जवळपास बहिष्कृत केले होते. मेक्सिको, नेपाळसारखे आणखी काही देश अघोषित काळय़ा यादीत गेले आहेत. ती वेळ भारतावर येऊ द्यायची नसेल, तर ठोस आणि निर्णायक पावले उचलावी लागतील; अन्यथा ही अनास्था प्रवाशांच्या जिवावर उठेल.