शतायुषी जीवन लाभलेल्या अपवाद व्यक्तींमधील एक ‘भारतरत्न’ महर्षी धोंडे केशव कर्वे होते. त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी गौरवलेख ‘नवभारत’ मासिकाच्या मे, १९५८च्या अंकात लिहिला होता. त्यात म्हटले आहे की, अण्णासाहेब ‘पूर्णायुष्य’ जगले. ज्याला शंभर वर्षांचे आयुष्य लाभते, तो पूर्णायुष्य जगल्याचे मानायचा प्राचीन रिवाज आहे. ‘कर्वे नुसतेच पूर्णायुष्य जगले असे नाही, तर शंभर वर्षे लोकवंद्या कृती करीत त्यांनी आपले आयुष्य समाजास समर्पित केले होते.’ अनाथ, निराधार मुला-मुलींचे संगोपन, सुसंस्कार, शिक्षण व पुनर्वसन कार्य प्रा. कर्वे यांनी केले. तद्वतच कुमारीमाता, विधवा, परित्यक्ता भगिनींना आश्रय देऊन शिक्षण, कौशल्यविकास, विवाह इत्यादींद्वारे त्यांनी या भगिनींना समाजाच्या मध्यप्रवाहाचे अंग बनविले. महिला उच्च शिक्षणासाठी नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ, मुंबईची स्थापना (१९१६) व विकास करून महिलांना त्यांचे स्वराज्य बहाल केले.
हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा (१८९६) सहस्रादर्शन सोहळा अर्थात माणिक महोत्सव (८० वर्षे पूर्ण) १९६७ मध्ये साजरा झाला, तेव्हा या संस्थेने ‘भारतीय स्त्री’ शीर्षक गौरवग्रंथ प्रकाशित केला होता. त्यास तर्कतीर्थांची प्रस्तावना आहे. या ग्रंथात प्रथमच भारतीय प्राचीन विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्री-पुरुष संबंधाचा आढावा घेतला आहे. ‘या लेखसंग्रहाच्या रूपाने मराठी साहित्यात एका मूलभूत सामाजिक विषयावरील सर्वांगीण चर्चेची भर टाकली आहे,’ असे उद्गार तर्कतीर्थांनी या प्रस्तावनेत काढले. ‘स्त्रिया व पुरुष यांचे कुटुंबासह समाजात समान अधिकार स्थापन करणे, हे नव्या मानवी युगाचे महत्त्वाचे कार्य आहे. ही उदारवादी मूल्यांची चळवळ आहे. ही मूल्ये म्हणजेच लोकशाहीची मूलतत्त्वे होत. यासाठी अनेक समाजसुधारकांनी आपले जीवन पणास लावले. त्यांच्या जीवनाचा इतिहास म्हणजेच सामाजिक व धार्मिक सुधारणांचा इतिहास होय. या इतिहासाचे एक महत्त्वाचे यश हे अण्णासाहेब कर्वे यांच्या महिला विद्यापीठाच्या स्थापनेने मूर्तिमंत बनले आहे,’ अशी तर्कतीर्थांची धारणा होती. तो महर्षींच्या यांच्याप्रति तर्कतीर्थांच्या मनातला नितांत आदर होता.
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उच्च शिक्षणाची महिला विद्यापीठाच्या रूपाने केलेली उभारणी ही तर्कतीर्थांच्या लेखी स्त्रीस गृहकार्यातून समाज उभारणीच्या कार्यात प्रवृत्त व सक्रिय करण्याचा प्रारंभ होता. याचे वर्णन ते ‘वैचारिक संग्राम’रूपात करतात. ते म्हणतात की, ‘रूढीवादी जुन्या श्रद्धांच्या व जुन्या पावित्र्याच्या मुळांना खिळखिळे करणारा हा विचार संग्राम होता. या वैचारिक प्रक्षोभातून जे नवनीत निघाले, त्याचे प्रत्यंतर कर्वे यांच्या महिला विद्यापीठाच्या रूपाने मिळत आहे. विचारांची केवळ मीमांसा महान कृतीस जन्म देत नाही. मानवी समतेची स्थापना करणाऱ्या महात्म्यांची कृतीला विशुद्ध, उदार व खोल अशा भावनांची प्रेरणा लाभलेली असते. त्यांची अनाथ महिलाश्रम संस्था त्यांच्या उदार व व्यापक अशा करुणेचे प्रतीक आहे. मानवव्यापी सहानुभूती हीच मानव्याच्या रक्षणाची एकमेव साधनभूत शक्ती आहे. ती शक्ती मंदावली की, मानव्य लोपू लागते, ती शक्ती प्रदीप्त झाली म्हणजे मानव्य उच्छवास करू लागते. अण्णासाहेब म्हणजे मानव्याला जागविणाऱ्या सहानुभूतीचा शंभर वर्षे तेवत राहिलेला नंदादीप होय’.
महर्षी कर्वे यांची जन्मशताब्दी १८ एप्रिल, १९५८ रोजी मुंबईत साजरी झाली होती, तेव्हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी येऊन त्यांना ‘भारतरत्न’ पदवी प्रदान केली होती. उपेक्षा, निंदा व अप्रतिष्ठा यांच्या विषारी वातावरणात प्रारंभिलेल्या समाजकार्याच्या रूपांतराने अभिनंदन आणि कृतज्ञता यांचा अमृतवर्षाव करणारा वर्षदिन उगवला, याबद्दल ‘नवभारत’मधील लेखात तर्कतीर्थांनी धन्यता व्यक्त केली आहे.
पुण्यात हिंगणे येथे महर्षी कर्वे स्मृतिसंग्रहालय उभारले आहे. त्याच्या प्राथमिक संशोधनकार्यात मी त्यांच्या मुरूड (जंजिरा) गावी गेलो होतो. महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह केला म्हणून त्यांना जन्मगावाने समाजबहिष्कृत केले होते. त्यांना वरच्या पाखाडीवरून (मुख्य रस्त्यावरून) चालण्यास मज्जाव केला होता. ही कृती त्यांना सामाजिक अस्पृश्य ठरविणारी होती. ‘भारतरत्न’च्या अभिनंदन सभेत अध्यक्ष म्हणून सुपारी-नारळ ठेवले होते. १९५८ चा भारतही रूढीमुक्त झालेला नव्हता.