सुबोध जावडेकर, विज्ञानलेखक
गेल्या काही दिवसांत कृत्रिम बुद्धिमत्ता हा प्रकार सर्वसामान्यांच्या ओळखीचा झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्यानं बनवलेली, राजकीय नेत्यांच्या विकृत नाचाची किंवा आयपीएल संघांचे कर्णधार आणि मालकिणी यांच्या चुंबनालिंगनाची तद्दन खोटी रील्स आजकाल समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रकरण आहे तरी काय? हा प्रश्न अनेकांचं डोकं कुरतडू लागला आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता बुद्धिबळात ग्रँडमास्टरला सहज हरवू शकते, पण त्याच वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेला रोबोट बुटाची लेस बांधण्यासारख्या साध्यासोप्या गोष्टी करू शकत नाही. असं का? यासारख्या किती तरी कोड्यांची उत्तरं जाणून घ्यायची असली तर मानवी बुद्धिमत्ता कशी विकसित झाली आणि तिचं कृत्रिम बुद्धिमत्तेशी काय नातं आहे, याचा शोध घ्यायला हवा. मॅक्स बेनेट यांनी हा शोध त्यांच्या ‘ए ब्रीफ हिस्टरी ऑफ इंटलिजन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक मानवी बुद्धिमत्तेच्या इतिहासाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याचा सखोल परामर्श घेतं.
मॅक्स बेनेट यांच्या मते, मानवी मेंदूची उत्क्रांती पाच टप्प्यांत झाली. प्रत्येक टप्प्यात मेंदूच्या रचनेत काही महत्त्वाचे बदल झाले आणि नवीन बौद्धिक क्षमता विकसित झाल्या. साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिला सजीव जन्माला आल्यानंतर बराच काळ, म्हणजे जवळजवळ ८५ टक्के कालखंडात, प्राण्यांना मेंदूच नव्हता! कृमी-कीटकांसारखे ते जीव पाण्याच्या प्रवाहाबरोबर इतस्थत: वाहत जात आणि समोर येणारं अन्न खात जगत. बऱ्याचदा त्यांच्याहून मोठ्या असलेल्या प्राण्यांच्या भक्षस्थानी पडत. ५५ कोटी वर्षांपूर्वी त्यांच्या शरीरात न्यूरॉन्सचे काही पुंजके तयार झाले. जेमतेम ३०० मेंदूपेशींचा हा गड्डा म्हणजे आपल्या आजच्या मेंदूचा पूर्वज. सभोवतालून येणाऱ्या संदेशांचा अर्थ त्याला लावता यायला लागला. त्यानुसार, भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मेंदू असलेला हा प्राणी हालचाल करायला लागला. पुढं जायचं की बाजूला वळायचं, हा निर्णय घेऊ लागला. त्याच्या चिमुकल्या मेंदूला इष्ट काय (अन्न, सुरक्षितता) आणि अनिष्ट काय (धोका, जगण्यास अनुकूल नसलेली परिस्थिती) हे कळायला लागलं. म्हणजेच एका परीनं चांगल्या-वाईटाची जाण आली. बुद्धिमत्तेच्या इतिहासातला हा पहिला क्रांतिकारी टप्पा (ब्रेकथ्रू) होता.
अन्नाचा वास आला की त्या दिशेने पुढं जायचं आणि धोका वाटला तर दिशा बदलायची, ही जगायची पद्धत सोपी वाटली तरी सोपी नाही. हे तत्त्व शिकून ते अमलात आणण्यापूर्वी प्राण्यांच्या कोट्यवधी पिढ्या जाव्या लागल्या. एकाच वेळी अनेक दिशांनी, अनेक संदेश येत असतात. त्यातले काही परस्परविरोधीही असतात. त्यातला कुठला महत्त्वाचा, कशाकडे लक्ष द्यायचं आणि कशाकडे नाही, ते ठरवावं लागतं. प्रवाळासारख्या प्राण्यांना हे अजूनही जमत नाही. कितीही शिकवलं तरी ते हे शिकू शकत नाहीत. म्हणूनच हे वळण बुद्धिमत्तेच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं वळण समजलं जातं.
५० कोटी वर्षांपूर्वी मेंदूनं उत्क्रांतीचा दुसरा टप्पा गाठला. या टप्प्यामध्ये जीवांच्या शरीररचनेत बदल होऊन माशांसारखे, पाठीचा कणा असलेले प्राणी निर्माण झाले. या जीवांचा, किंचित का होईना, पण प्रगत झालेला मेंदू ‘चुकांमधून शिका’ (ट्रायल अॅण्ड एरर) हे तत्त्व वापरून शिकू लागला. ज्या क्रिया इष्ट आहेत त्या पुन्हा पुन्हा करणं आणि ज्या हानीकारक आहेत त्या टाळणं, असं करायला लागला. काय करायचं हे तर त्याला कळायला लागलंच होतं पण ते केव्हा करायचं हेही समजू लागलं. कुतूहल, भीती, उत्तेजना, निराशा, समाधान या भावना मेंदूत निर्माण झाल्या.
मग बराच काळ, म्हणजे सुमारे ४० कोटी वर्षं फार काही घडलं नाही. दहा कोटी वर्षांपूर्वी मेंदूच्या उत्क्रांतीचा तिसरा टप्पा गाठला गेला. या वेळी लहान लहान सस्तन प्राण्यांच्या मेंदूमध्ये निओकॉर्टेक्स हा भाग तयार व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे एखादी गोष्ट प्रत्यक्ष न करता ती केवळ मनातल्या मनात केली तर तिचे परिणाम काय होतील, याचा अंदाज प्राण्यांना करता येऊ लागला. त्याच्या आधारानं प्राणी भविष्यकाळाचं नियोजन करू लागले. यालाच ‘कल्पना आधारित शिकणं’ किंवा ‘करण्याआधी शिकणं’ असं म्हटलं जातं.
पुढच्या टप्प्यात निओकॉर्टेक्सचा आकार वाढू लागला, कार्यक्षमता वाढली. त्यामुळे केवळ सभोवतालीच नव्हे तर स्वत:च्या मनात डोकावून पाहायची क्षमता प्राण्यांना प्राप्त झाली. भविष्यकाळात आपल्या गरजा काय असणार आहेत याची पूर्वकल्पना येऊ लागली. आपल्यासोबत इतरांच्या मानसिक स्थितीचाही अंदाज घेता येऊ लागला. कोण आपल्यावर चिडलं आहे, कोण हल्ला करायचा विचार करतंय आणि कोण मदतीचा हात पुढं करेल हे उमजायला लागलं. दुसऱ्याचं मन जाणणं याला शास्त्रीय परिभाषेत ‘थिअरी ऑफ माइंड’ म्हणतात. साधारणपणे दोनतीन कोटी वर्षांपूर्वी हे हळूहळू घडलं. त्यामुळे नवीन कौशल्य शिकणं, सहकार्य करणं, या गोष्टी करता येऊ लागल्या.
मेंदूच्या उत्क्रांतीचा पाचवा टप्पा म्हणजे भाषेचा उगम. त्यामुळे मिळवलेले ज्ञान पुढच्या पिढीला देणं शक्य झालं. उदाहरणार्थ, ‘‘अमुक फळ कडू आहे. हे ते खाऊ नका’’, हे इतरांना सांगता येऊ लागलं. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यायची गरज उरली नाही. बोलता येऊ लागल्यामुळे माणसं गप्पागोष्टी करू लागली. यात केवळ शिळोप्याच्या गप्पा मारणं, चकाट्या पिटणं, एवढंच नव्हतं, तर त्यामुळे दुसऱ्यांच्या वर्तनावर टीका-टिप्पणी करणं शक्य झालं. एखाद्याच्या चांगल्या कृत्याचं कौतुक केलं जाऊ लागलं. वाईट कृत्याचा निषेध होऊ लागला. त्यातून समाजव्यवस्था आकार घेऊ लागली. बोलता येणं हा मानवी बुद्धिमत्तेच्या इतिहासात केवढा महत्त्वाचा टप्पा आहे याबद्दल अधिक काही सांगायची आवश्यकताच नाही. हा टप्पा अगदी अलीकडे म्हणजे जेमतेम एक लाख वर्षांपूर्वी मानवानं गाठला.
बुद्धिमत्तेच्या इतिहासातील ही पाच निर्णायक वळणं. पाच क्रांतिकारी टप्पे. मानवी बुद्धिमत्तेचे हे आधारस्तंभ स्वतंत्रपणे, स्वायत्ततेनं उभे राहिलेले नाहीत, तर एकावर आधारलेला दुसरा, दुसऱ्यावर तिसरा असे, दहीहंडीचा मनोरा रचावा तसे, उभे राहिले आहेत. चुकांतून शिकण्याचा पहिला टप्पा गाठला नसता तर इष्ट क्रियांची पुनरावृत्ती करून शिकण्याचा दुसरा टप्पा गाठता आलाच नसता आणि तो आला नसता तर ‘कल्पनेतून शिकण्याचा’ तिसरा टप्पा गाठणं अशक्य होतं. बुद्धिमत्तेचे हे पाचही टप्पे असे एकापाठोपाठ एक, चढत्या क्रमानं गाठले गेले.
बुद्धिमत्तेच्या इतिहासाच्या गाथेचे दोन अध्याय आहेत, असं मानता येतील. पहिला अध्याय म्हणजे जीवशास्त्रीय उत्क्रांती, विश्वाच्या निर्जीव पसऱ्यातून आजचा बुद्धिमान मानव निर्माण होणं. आणि दुसरा अध्याय सांस्कृतिक उत्क्रांती, आदिमानवापासून सुसंस्कृत मानवापर्यंतची प्रगती. पहिला अध्याय उलगडायला अब्जावधी वर्षं लागली तर दुसऱ्यासाठी केवळ लाखभर. म्हणजे पहिल्या अध्यायाच्या तुलनेत फक्त निमिषभराचा खेळ. लक्षात घ्या, आपली सगळी संस्कृती, सगळं तंत्रज्ञान, सगळे शोध, साहित्य, संगीत, कला बहराला येण्याचा काळ विश्वाच्या वयाच्या तुलनेत किती लहान आहे! एकूणच, माणूस हा विश्वाच्या संदर्भात किती क्षुद्र आहे ते लेखकानं हा हिशेब मांडून दाखवून दिलं आहे.
बेनेट केवळ मेंदूच्या उत्क्रांतीतील टप्पे सांगत नाहीत तर त्यांचं नातं कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडून दाखवतात. २००२ साली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेला जो पहिला घरगुती व्हॅक्युम क्लिनिंग रोबोट बाजारात आला तो हुबेहूब पहिल्या टप्प्यात उत्क्रांत झालेल्या प्राण्यासारखाच काम करत असे. अडथळा आला की थांबून दिशा बदलायचा. कृत्रिम बुद्धिमत्तेतील ‘मशीन लर्निंग’च्या संकल्पनेचं साधर्म्य दुसऱ्या टप्प्यातल्या मेंदूशी आहे. मशीन लर्निंगचं तत्त्व चुकांतून शिकणं, सतत सुधारणा करणं, हेच तर आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या मेंदूच्या ‘कल्पना आधारित’ शिकण्याची तुलना कृत्रिम बुद्धिमत्तेतील ‘जनरेटिव्ह मॉडेल्स’शी करता येते. पाचव्या टप्प्यात मानवानं अवगत केलेल्या भाषाकौशल्याचं नातं अर्थातच ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’शी आहे. चौथ्या टप्प्यात मानवी मेंदूनं आत्मसात केलेलं, स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेण्याचं कौशल्य मात्र अजूनही कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी एक आव्हानच आहे.
बेनेट यांनी पुस्तकाची रचना अतिशय विचारपूर्वक केली आहे. पहिल्या काही प्रकरणांत मेंदू उत्पन्न होण्याआधी जग कसं होतं, त्याचं सविस्तर आणि प्रत्ययकरी वर्णन आहे. त्यानंतर एकेक क्रांतिकारी टप्पा घेऊन, त्या टप्प्याला मेंदूची उत्क्रांती कशी झाली आणि त्याचा प्राण्याला काय फायदा झाला, ते स्पष्ट केलं आहे. प्रत्येक तीन-चार प्रकरणांनंतर त्यांचा सारांश दिला आहे. जे नेहमीपेक्षा वेगळे शास्त्रीय शब्द पुस्तकात वापरले आहेत ते एकत्रित करून त्यांचे अर्थ दिले आहेत. बहुतेक तळटिपा प्रत्येक पानाच्या खाली न देता, शेवटी दिल्या आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना अधेमधे येऊन त्या अडचण करत नाहीत, पण आवश्यक ते स्पष्टीकरण हवं तेव्हा मिळू शकतं. पुस्तकात भरपूर आकृत्या आहेत. विषय समजून घ्यायला त्यांची मदत होते. पुस्तकाची भाषा फार सोपी नाही, पण फार क्लिष्टही नाही. काही काही ठिकाणी तर ती चक्क काव्यात्मक बनते. तरीही काही संकल्पना मुळातच इतक्या अवघड आहेत की पुन्हापुन्हा वाचल्याशिवाय त्या व्यवस्थित समजून घेता येत नाहीत.
बेनेट यांचा एक लोभसवाणा गुण म्हणजे त्यांचा नितळ प्रामाणिकपणा. आपण शास्त्रज्ञ नाही हे ते पुस्तकाच्या सुरुवातीला सांगून टाकतात. पुढं ते लिहितात. ‘अनेक शास्त्रज्ञांनी जे लिहून ठेवलं आहे तेच या पुस्तकात मी एकत्र केलं आहे. माझे स्वत:चे विचार फारसे आलेले नाहीत.’ हाच प्रामाणिकपणा स्वत:च्या आडाख्यांच्या, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या किंवा आजच्या मेंदुविज्ञानाच्या मर्यादा सांगताना ते दाखवतात. अर्थात बेनेट हे मेंदुशास्त्रज्ञ नसले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. Alby या अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीचे ते कार्याध्यक्ष आहेत. याआधी त्यांनी स्थापन केलेली ‘ब्लू कोअर’ ही कंपनी आजच्या घडीला बिलियन डॉलर कंपनी बनलेली आहे.
पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातली माहिती अगदी अद्यायावत आहे. पुस्तक छपाईला जाईपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे नवीन शोध लागले आहेत, जे नवीन अल्गोरिदम्स वापरले जात आहेत, त्यांचा उल्लेख त्यांनी पुस्तकात केला आहे.
मेंदुविज्ञानात काही चुकीच्या समजुती जनमानसात रूढ आहेत. त्यांचा पर्दाफाश ते विवेचनाच्या ओघात सहज करतात. उदाहरणार्थ, डोपामाईनला पूर्वी ‘सुखाचं रसायन’ मानलं जात असे. कारण मेंदूत सुखद भावना निर्माण झाली की डोपामाईन स्रावतं, असा समज होता. आज डोपामाईन हे सुखाचं रसायन नसून काही तरी मिळवायची इच्छा मनात उत्पन्न करणारं रसायन आहे, हे सिद्ध झालं आहे. त्याचप्रमाणे, माणसाचा मेंदू हा तीन स्तरांचा बनलेला आहे, खाली सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू, त्यावर सस्तन प्राण्यांचा मेंदू आणि त्याच्या वर नवा मेंदू अशी मेंदूची रचना असल्याचं पूर्वी मानलं जात असे. या दोन्ही समजुती कालबाह्य असल्याचं बेनेट साधार नोंदवतात.
बेनेट यांचे सर्वच विवेचन सगळ्यांना पटेल असं नाही. उदाहरणार्थ, एके ठिकाणी ते म्हणतात, ‘समजा, मेंदूचा एखादा भाग एका विशिष्ट पद्धतीने काम करतो असं गृहीत धरून आपण त्या पद्धतीवर आधारित बुद्धिमान यंत्राची रचना केली आणि ते यंत्र त्या पद्धतीनं चाललं नाही तर त्याचा अर्थ आपण जे गृहीत धरलं होतं ते चुकीचं होतं, असा होतो. मेंदूचा तो भाग त्या पद्धतीने काम करत नसणार, याचा तो ठोस पुरावा ठरतो’, हे लेखकाचं म्हणणं बरोबर वाटत नाही. ते यंत्र न चालण्याची दुसरीही काही कारणं असू शकतात. पण पुस्तकात अशा विवाद्या जागा फारच कमी आहेत.
पुस्तकाच्या शेवटी बेनेट यांनी बुद्धिमत्तेचा सहावा टप्पा काय असेल त्याबद्दल लिहिलं आहे. त्यांच्या मते हा सहावा टप्पा म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षाही सरस अशा कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती. ते म्हणतात, ‘‘बुद्धिमत्तेच्या उत्क्रांतीचा हा सिलसिला असाच पुढेही चालत राहणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विश्वाच्या जन्मापासून आज जेवढा काळ गेला त्याच्या हजारोपट काळ गेल्यानंतरच हे विश्व लयाला जाईल. त्यामुळे पुढं निर्माण होणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्यापेक्षा किती प्रगत असेल याचा अंदाजही आपण करू शकणार नाही. पण तिला योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आलेली आहे. ती नीट निभावण्याकरिता आपल्याला मानवी बुद्धिमत्तेचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे.’’ या पुस्तकातून बेनेट यांना नेमकं तेच सांगायचं आहे.
‘ए ब्रीफ हिस्टरी ऑफ इंटलिजन्स’
लेखक : मॅक्स बेनेट
प्रकाशक : विल्यम कॉलिन्स
मूल्य : ३७० रुपये पृष्ठे : ४३२
subodh.jawadekar@hotmail.com
बुकलेट
पुस्तकबंदीचा हट्ट…
‘पेन्सकोला’ हे अमेरिकेच्या फ्लोरिडामधील शहराचे नाव. ऐतिहासिक घटनांनी आधी ज्ञात. २०२३ पासून मात्र वेगळ्या कारणांसाठी चर्चेत. शालेय वाचनालयांमधील पुस्तकांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्या विचारकक्षेला ‘अमुक-तमुक’ गोष्टी भ्रष्ट करतील असा ठपका ठेवत पुस्तकबंदी घालण्याचा धडाकाच इथे लागला. या एकाच वर्षाच्या अखेरीस ‘मरियम-वेब्स्टर’ शब्दकोशासह तब्बल १,६०० पुस्तकांना वाचनालयातून काढून ती वाचण्यास मज्जाव करण्यात आला. राजकीय हस्तक्षेपानंतर ज्या गोष्टी घडतात, त्यांचे हे उदाहरण. या मज्जावाचा परिणाम काय होईल, हे सांगणारे पुस्तक नुकतेच आले असून त्यातील हे प्रकरण इथे वाचता येईल.
https:// tinyurl. com/ yc7 kjax4
युवा पुरस्कार, पण तिथला…
अमेरिकेत २०००च्या दशकातील काही वर्षांत साहित्यपटलावर एक लाट आलेली. ‘जुने येऊ द्या पुन्हा वाचनी, नव्यांना मारा गोळी’अशा अर्थाची. कुणी नव्या लेखकांचे लेखन वाचायला सुचवत नाही, एकोणीसशे तीस-चाळीस पन्नास-साठच्या दशकातील ‘थोर-थोर’ साहित्यावर चर्चा केली जाते, हे पाहून अभिनेता इथन हॉक (तोच ‘बिफोर सनराईज’, ‘सनसेट’ चित्रपट मालिकेतील) याने तात्कालीन युवा कथा-कादंबरीकारांना घेऊन २००१ साली ‘यंग लायन्स’ हे पारितोषिक सुरू केले. दहा हजार डॉलर इतकी चांगली रक्कम असलेला हा पुरस्कार अद्याप सुरू आहे. यंदा तो ‘लास्ट अॅक्ट्स’ या अलेक्झांडर समरटिनो यांच्या कादंबरीला मिळाला. त्याबद्दल इथे वाचा.
https:// tinyurl. com/386 vp4 bk
‘तरण्या’ बॉण्डची मुलाखत…
पुढल्या वर्षी लिखाणाची सत्तरी साजरी करणारे भारताचे जगद्विख्यात लेखक रस्कीन बॉण्ड गेल्या महिन्याच्या मध्यात ९१ वर्षांचे झाले. त्यांच्या पुस्तकांविषयी, गोष्टींविषयी आणि त्यावर झालेल्या चित्रपट-मालिकांविषयी सर्वांना बरीच माहिती आहे. आता या वयातही ते ‘डिटेक्टिव्ह’ गोष्टी आवडीने का वाचतात, लेखनाचे त्यांचे नियोजन कसे करतात. त्यांचा लेखनोत्साह अद्याप तरुण का आहे, हे सांगणारी अगदी चार दिवसांपूर्वी उपलब्ध झालेली ताजी मुलाखत येथे पाहता येईल.
https:// tinyurl. com/5 n7 zzamj