‘पडद्यावरचा न नायक !’ हा प्रकाश मगदूम यांचा लेख (रविवार विशेष : २९ जानेवारी) वाचला. रिचर्ड अ‍ॅटनबरो दिग्दर्शित, बेन किंग्सले ने साकारलेली गांधींची भूमिका. हे कदाचित भारतातील गांधींच्या भूमिकेचे सर्वात व्यापक चित्रण आहे. ज्या माणसाने आपल्या दैनंदिन जीवनातून प्रतीके तयार केली, चरखा किंवा आपल्या वेशभूषेला ज्यांनी शक्तिशाली टोटेम बनवले, त्याने आपला संदेश प्रसारित करण्यासाठी इतके शक्तिशाली माध्यम वापरण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आजही गांधींचे जीवन काही प्रमाणात अचूकतेने दाखवणारे चित्रपट म्हणजे ‘गांधी’, जे गांधींच्या दृश्य स्मृतीचे बीज राहिले आणि दुसरे म्हणजे श्याम बेनेगल दिग्दर्शित, रजित कपूर अभिनीत द मेकिंग ऑफ गांधी (१९९६) ज्याने गांधींची दक्षिण आफ्रिकेत बॅरिस्टर होण्यापासून महात्मापर्यंतची प्रगती दाखवली.

 ज्याच्या आदर्शानी जगभरातील लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम केला आहे अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वासाठी, सत्य आणि अहिंसेच्या आदर्शाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतीकासाठी;  जगात सर्वाधिक चित्रपट बनवणाऱ्या देशात, मोठय़ा पडद्यावर गांधींचे चित्रण खरोखरच तुटपुंजे  ठरते. ही अत्यल्प संख्या चित्रपट पाहणाऱ्यांच्या मागणीच्या अभावाचे प्रतिनिधित्व करते. गांधी आणि त्यांचे आदर्श आज अप्रासंगिक आहेत, त्याचा संदेश आता अप्रासंगिक आहे, असा विचार करणे सोपे आहे. डोळय़ाच्या बदल्यात डोळय़ाचा पुरस्कार प्रत्येक राष्ट्रात, प्रत्येक युगात केला गेला आहे. तरीही, हे लक्षात घेतले पाहिजे की अशक्तपणाला थारा न देताही, असे केल्याने संपूर्ण जग आंधळे होईल हे ठामपणे सांगणारा शांत आवाज आम्हाला गांधींमध्ये सापडला. एक संदेश जो प्रत्येक युगासाठी खरा ठरतो.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

– तुषार अशोक रहाटगावकर, मस्कत (ओमान)

या हत्येशी धर्माचा संबंध आहे का?

‘नांदेडमध्ये ऑनर किलिंग :  वडील, भावासह पाच अटकेत’ (लोकसत्ता- २८ जानेवारी) ही बातमी वाचली. पुरोगामी आणि क्रांतिकारी महाराष्ट्रात जातीपातीच्या भिंती नष्ट व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न झाले आहेत. परंतु ‘जाता जात नाही ती जात’ हीच आजही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. जातीबाह्य प्रेम किंवा विवाह करणाऱ्यांना मृत्युदंड द्यावा असे कोणत्याही धर्माने सांगितलेले नाही. आपल्या मुलीने आपले घराणे, घराण्याची अब्रू (खोटी प्रतिष्ठा) धुळीस मिळवली आणि तिला ठार मारूनच त्यातून पुन्हा प्रतिष्ठा मिळेल अशी खोटी समजूत जनमानसात दृढ झालेली दिसते आहे. ऑनर किलिंगसारख्या घटना पुढे भविष्यात थांबवायच्या असतील तर समाजाची प्रतिगामी मानसिकता घडवण्याचे मूळ कशात आहे हे आपण शोधायला हवे. जातीबाहय प्रेम किंवा विवाह करण्यात घराची अप्रतिष्ठा कशी होते ? याचे उत्तर स्त्रीला दुय्यम मानण्यात, तिला उपभोगवस्तू समजण्यात आणि तिच्या पराधीनपणात आढळते. आपल्या पुरुषप्रधान समाजाची स्त्रीच्या जगण्यासंबंधी जी धारणा आहे, त्यातूनच ऑनर किलिंगसारख्या घटना आजही घडत आहेत.

– डॉ. बी. बी. घुगे, बीड

भाजपची स्पर्धा कोणत्या शिवसेनेशी आहे

आशीष शेलार यांच्याशी झालेला ‘लोकसंवाद’ (रविवार विशेष- २९ जानेवारी) वाचला. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ वरचढ ठरेल काय हे येणारा काळच सांगेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किंचित सेना म्हणून हिणवायचे आणि ‘आमची मुख्य लढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच आहे’ हेही कबूल करायचे, म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखे आहे. त्यातच शेलार हे मुंबई महापालिकेवर महापौर भाजपचाच होईल हे आताच सांगून शिंदे गटाची कोंडी करत आहेत, यातून भाजप शिंदे गटाला खिजगणतीत धरत नाही असेच म्हणावे लागेल. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि त्यांच्या गडगंज मुदत ठेवीवर भाजपचा डोळा आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून लक्षात येते. महापालिकेत भ्रष्टाचार आहे हे कोणी नाकारू शकत नाही. ‘चोऱ्या करून’ डोळे दिपवणारी ठेव वाढवत नेणे हेसुद्धा कौतुकास्पद आहे. मुंबई महापालिकेत भाजपचे परभापक नगरसेवक आजच ८० टक्के आहेत. अशा अनेक कारणांमुळे शेलार यांची ही वक्तव्ये पोकळ ठरू शकतात.              

– यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर.

भाजपच्या नव्या कार्यपद्धतीमुळे..

‘‘किंचित’ सेनेपेक्षा ‘बाळासाहेबां’ची शिवसेना वरचढ ठरेल!’ – हा आशीष शेलारांचा ‘लोकसंवाद’ (२९ जाने.)  वाचताना एक गोष्ट जाणवते की, बाळासाहेबांच्या करिष्म्यापुढे भाजप तेव्हाही निष्प्रभ ठरत होता, आजही त्यावर मात मारण्यास त्या पक्षास यश मिळत नसावे. दुसरे असे की उद्धव ठाकरेंनी युतीत स्वत:चे अस्तित्व कायम ठेवण्यास प्राधान्य दिले, हेच शल्य, शेलार जेव्हा उद्धव ठाकरेंचा उल्लेख डाकू, वैचारिक स्वैराचार, अप्पलपोटे अशा विशेषणांनी करतात तेव्हा व्यक्त होत नसावे?

भाजप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही हे मान्यच, परंतु तिच्या नव्या ‘हायर अँड फायर’ कार्यपद्धतीमुळे भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते मागे पडले व भलत्यांनाच महत्त्व प्राप्त झाले हे वास्तव नाकारता येत नाही. २०१४ पासून या पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा बागुलबुवा दाखवून निवडणुका जिंकल्या, परंतु सहा-सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात त्याच भ्रष्ट लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सत्ता हस्तगत केलेली जनतेने पाहिली.

दिल्ली, हैद्राबाद, प. बंगाल वगैरेच्या प्रचाराची पातळी पाहता मुंबईतदेखील निवडणूक प्रचार सागरतळ गाठणार याची चुणूक या लोकसंवादातून दिसली.

शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व (मुंबई)

तीच दडपशाहीची ‘री’..

‘बॉलीवूडचा खरा रंग..’  हे शनिवारचे संपादकीय (२८ जानेवारी) वाचले. ‘पठाण’ या चित्रपटाला होणारा विरोध आणि दुसऱ्या बाजूला ‘बॉक्स ऑफिस’वर प्रेक्षकांची होणारी गर्दी बघता या चित्रपटासाठी सोडलेले बहिष्कारास्त्र विरोध करणाऱ्यांवरच उलटे फिरले, हे उघडच आहे. एखाद्या चित्रपटाला अशा कारणास्तव होणारा विरोध बघता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचीच मोडतोड होताना दिसत आहे!  ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या वेळीही असेच झाले होते. कार्यकर्ते म्हणून ठीक आहे. कारण केवळ ‘छू’ म्हटले की ते धावत सुटतात! पण लोकप्रतिनिधींचे, मुख्यमंत्री, मंत्री आदींचे काय?  विरोधी पक्षातील लोक नरेंद्र मोदींचे सरकार दडपशाही करत आहे असे म्हणत आहेत पण तीच दडपशाहीची ‘री’  विरोधी पक्षातील लोकही ओढत आहेत. शेवटी प्रेक्षकांनी काय पाहावे, त्यांना काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे! कुठलाही ‘वाद’ न झालेले चित्रपटही डब्यात गेलेले आहेतच की ! शेवटी विरोध, बहिष्कार हा प्रेक्षकांच्या आवडीसमोर निष्प्रभ ठरतो हेच ‘पठाण’ ने दाखवून दिले!

अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम

दंगा होण्याची वाट पाहू नये..

शनिवारचे संपादकीय वाचले. ‘पठाण’बाबत एका गाण्यात नायिकेला भगव्या रंगाची अर्धवस्त्रे घातली यावरून  चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली. त्यामुळे चित्रपटाला उलट प्रसिद्धी मिळाली. या सर्व गदारोळात एक सत्य झाकले गेले की नायिकेने भगव्या रंगाची वस्त्रे व अर्धवस्त्रे वापरणे योग्य आहे का? भगव्या रंगाची वस्त्रे कोण वापरतो हे नटनटींना विशेषत: दिग्दर्शकाला माहिती असू नये ? चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काढायचा असतो – कुणाच्या भावना दुखावण्यासाठी काढायचा नसतो-  हे दिग्दर्शकाला माहिती नाही का ? श्वृंगारिक गाण्यात साधू वापरतात तशी भगव्या रंगाची अर्धवस्त्रे वापरणे विसंगत नाही काय ?सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशी दृश्ये चित्रपटात ठेवू नयेत. त्यांना तात्काळ कात्री लावावी. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यावर दंगा होण्याची वाट पाहू नये, ही विनंती. हिंदू धर्म सहिष्णु आहे याचा अर्थ कोणीही सोम्या-गोम्याने त्याची टिंगल करावी, त्यावर टीका करावी असे नाही.

अरिवद जोशी, पुणे</strong>

रंगाची धर्माशी सांगड अनाठायी

‘बॉलीवूडचा खरा रंग’ हे संपादकीय (२८ जानेवारी) वाचले. ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून झालेला गदारोळ आणि त्यानंतर चित्रपटाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यावरून प्रेक्षकांना धर्म, रंग या गोष्टींत काडीचाही रस नसल्याचे स्पष्ट होते. अजूनही आपण जात, धर्म, रंग यातच आपले जगणे शोधत आहोत. कोणाला तरी धर्मावरून टार्गेट करून, त्याच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कुठल्या तरी कारणांचा आश्रय घेत त्याची निंदा करीत सामाजिक तेढ निर्माण करण्याची एकही संधी आपण सोडत नाही. मुळात ज्या गाण्यावरून वाद सुरू झाला त्या गाण्यात परिधान करण्यात आलेल्या एका विशिष्ट रंगाच्या पोशाखामुळे धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार हा हास्यास्पदच आहे. रंग हा निळा, भगवा, हिरवा असो की अजून इतर कोणताही या रंगांना जाती-धर्माच्या बंधनात अडकून ठेवणारे आपण कोण? कोणताही रंग कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करीत नाही हे समजण्याइतके शहाणपण आपल्याकडे नाही याचे वाईट वाटते. धर्म आणि रंगाच्या मोहातून मुक्त होऊन एकजुटीने भारतीय असल्याचा अभिमान बाळगत सामाजिक सलोखा जपण्याचे वचन प्रत्येकाने स्वत:ला देणे इष्ट ठरते.

– श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे.