सर्वोदय आणि साम्ययोग या संकल्पनांमध्ये पर्यायी समाजरचनेला कोणते स्थान आहे आणि त्याचे रूप काय या मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे. साम्ययोगाचा विचार ध्यानी घेता हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा ठरतो. साम्ययोगाने परमसाम्याची पूर्वतयारी म्हणून भौतिक साम्याला अग्रक्रम दिला आहे. या आकलनाची ज्ञानदेवांनी नेमकी मांडणी केली आहे.
जयांचें ऐहिक धड नाहीं ।
तयांचे परत्र पुससी काई ।
म्हणौनि असो हे गोठी पाहीं ।
पंडुकुमरा ॥ – ज्ञानेश्वरी
या ‘ऐहिक धड ना’ या शब्दांच्या तीन अर्थछटा आहेत. अगदी पिचून गेलेले, कोणतेही काम करणे जिवावर आलेले आणि उन्मत्त धनवान अशा तिन्ही वर्गाच्या पारलौकिक जीवनाचा विचार करणे निष्फळ आहे. साम्ययोगाच्या मांडणीत या ओवीला मोठे स्थान आहे.
साम्ययोगप्रणीत समाजरचना मुख्यत: तीन तत्त्वांवर आधारलेली आहे. १. मंजुरीची तुल्यता, २. चढाओढीचा अभाव, ३. आनुवंशिक संस्कारांचा लाभ घेणारी शिक्षणव्यवस्था. गांधीजींना मान्य असणाऱ्या वर्णव्यवस्थेची विनोबांनी केलेली ही उकल आहे.
वर्णव्यवस्थेचा हा अर्थ विनोबांच्या मते, अिहसक परिवर्तनाचा प्रयोग आहे. एखाद्या समाजात आदरणीय असणारे शब्द आणि कल्पना कायम ठेवत त्यांना विकसित रूप देणे ही अिहसक क्रांतीची प्रक्रिया आहे. भारतीय परंपरेतील समन्वयाचा विचार या अिहसक प्रक्रियेतून आला आहे असे ते सांगतात. गीतेने ‘यज्ञ’ संकल्पनेचा विकास केला. त्याला निष्काम कर्मयोगाचे अधिष्ठान दिले. विनोबांनी हाच यज्ञ भूदानाच्या रूपात पाहिला आणि प्रत्यक्षात आणला.
अशा अिहसक क्रांतीचा विपर्यास होण्याची मोठीच शक्यता असते. ‘भव्य कल्पनेचा विपर्यास अत्यंत हीन असतो,’ हे विनोबांचे वचन यानिमित्ताने आठवते. विपर्यास होतो त्याचप्रमाणे शब्दाची अत्यंत ओढाताण झाली तर या क्रांतीचे अधिष्ठान असत्य आणि हिंसा बनते.
गांधीजींनी वर्णाश्रम पुरस्कार का केला असावा याचाही विनोबांनी शोध घेतला आहे. गांधीजी भारतीय संस्कृतीमध्ये जन्मले आणि वाढले. त्याच संस्कृतीमधील जनतेसाठी ते काम करत होते. त्यांच्याशी बोलत होते. त्यामुळे त्यांनी वर्णाश्रम व्यवस्थेचा पुरस्कार केला, असा विनोबांचा कयास आहे. ते दुसऱ्या समाजात जन्मले आणि वाढले असते व त्यांच्यासाठी त्यांनी काम केले असते तर त्यांना वर्णाश्रम संकल्पना सुचली असती का, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे, असे विनोबा म्हणतात. तथापि अिहसक क्रांतीचे स्वप्न त्यांनी पाहिलेच असते.
वर्णाश्रम या संकल्पनेविषयी देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात असणारी नाराजी विनोबांना ठाऊक होती. त्यामुळे या संकल्पनेच्या विरोधकांनी शब्द सोडून सार घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यादृष्टीने विनोबांनी सांगितलेल्या नवसमाजरचनेची तत्त्वत्रयी पाहायला हवी.
तरीही वर्णाश्रम व्यवस्था अमान्य असणे हे विनोबांनी समजून घेतलेच असते. एवढेच नव्हे तर नवसमाजरचनेचा नवा विचार त्यांना कुणी पटवून दिला असता तर त्यांनी तो नक्कीच स्वीकारला असता. सत्य, प्रेम आणि करुणा या तत्त्वांवर ते ठाम होते इतकेच.
अतुल सुलाखे