गेल्या शतकातील समाजजीवनावर धर्माचा पगडा किती होता नि त्यातून मानवी शोषण किती क्रूरपणे चालायचे; बुवाबाजी, अंधश्रद्धा, रूढी, कर्मकांड, पुरोहित प्रभाव, धर्ममार्तंडांचे वर्चस्व किती अमानुष होते, हे समजून घ्यायचे, तर हिंदू धर्मसुधारणांचे कार्य करणाऱ्या महादेवशास्त्री दिवेकरांचे जीवन, कार्य, लेखन समजून घ्यायला हवे. महादेवशास्त्री दिवेकरांचे निधन ८ ऑगस्ट, १९७१ रोजी सोलापूरमध्ये झाले. वाईतील प्राज्ञपाठशाळा येथे अनेक वर्षे आपला सहकारी राहिलेल्या या थोर धर्मसुधारकाला श्रद्धांजली समर्पित करीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेला लेख ‘नवभारत’ मासिकाच्या सप्टेंबर १९७१च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.
महादेवशास्त्री दिवेकरांचा जन्म ५ फेब्रुवारी, १८८२ रोजी बेळगाव (कर्नाटक) जिल्ह्यातील उगार खुर्दमध्ये झाला होता. मॅट्रिक्युलेट होताच ते प्रा. वि. गो. विजापुरे संचालित तळेगाव ढमढेरे येथील समर्थ विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. १९१० मध्ये ब्रिटिशांनी ते विद्यालय सरकारविरोधी ठरवून बंद पाडल्यावर तेथील विद्यार्थी व शिक्षक वाईतील प्राज्ञपाठशाळेमध्ये दाखल झाले. त्यात महादेवशास्त्री दिवेकरही होते. ते तेजस्वी, बुद्धिमान व प्रखर देशभक्त होते. दिवेकरांनी स्वत: प्राज्ञपाठशाळेच्या योगक्षमाकरिता निधी संकलनाचे कार्य पत्करले. या कार्यासाठी ते कीर्तन-प्रवचन करीत. प्राज्ञपाठशाळेचे रूपांतर राष्ट्रीय शिक्षण संस्थेत करण्यात ते नारायणशास्त्री मराठेंच्या खांद्यास खांदा लावून कार्य करीत होते.
पुढे महादेवशास्त्री दिवेकर यांनी स्वत:स हिंदुधर्म सुधारणेच्या कार्यास वाहून घेतले. त्यांच्यापुढे तत्कालीन धर्मबंधने व धारणा अमानुष असणे, हे प्रमुख कारण होते. म्हणजे असे की, स्त्री विवाह आठ वर्षे होण्यापूर्वी करावा लागेल. ऋतुप्राप्त कन्या वृषली (दुष्कर्मी) होण्याची शक्यता लक्षात घेऊन तीस धर्मकार्यास अयोग्य समजली जायची. पोटजातीतील विवाह निंद्या मानला जात असे. अस्पृश्यता धर्मसिद्ध होती. पाप, प्रायश्चित्तविषयक नियम कठोर होते. परदेशागमन निषिद्ध होते. चातुर्वर्ण्य वर्ष जन्मसिद्ध समजला जाई. पाप, प्रायश्चित्त तीन पिढ्यांपर्यंत चाले. या सर्वांविरुद्ध नारायणशास्त्री मराठी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, दिनकरशास्त्री कानडे यांच्यासह महादेवशास्त्री दिवेकर विविध धर्मसभा, परिषदा, धर्मसंमेलने इ.मध्ये जाऊन वरील धर्मबंधने शिथिल व बदलावी म्हणून आग्रह धरीत; पण त्याकाळी कोणताही बदल झाला नाही.
आपल्या मत व धारणांच्या प्रचार-प्रसारार्थ दिवेकर यांनी विपुल लेखन केले. ‘धर्मभ्रष्टांचे शुद्धीकरण’ (१९२४), ‘नवयुग विद्यार्थी धर्म’ (१९२५), ‘हिंदुधर्म शिक्षण’ (१९२६), ‘अस्पृश्यतोद्धार’ (१९२६), ‘हिंदू समाज समर्थ कसा होईल?’ (१९३०), ‘धर्मशास्त्र मंथन’ (१९३३), ‘ब्रह्मज्ञान व बुवाशाही’ (१९३५), ‘हिंदू संस्कृतिप्रदीप (१९४०), ‘नवा हिंदुधर्म’ (१९४२), ‘क्षत्रियवैश्यांचे अस्तित्व’, ‘हिंदुविधवा धर्म’ या ग्रंथांद्वारे धर्मजागृती व सुधारणांचे कार्य केले. यातील ‘ब्रह्मज्ञान व बुवाशाही’ ग्रंथांच्या अनुषंगाने न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याच्या सुनावणीत फिर्यादी बुवा-बाबांचे पितळ उघडे पडले. सार्वजनिक वाभाडे निघाले. महादेवशास्त्री दिवेकर व प्रस्तुत ग्रंथातील लेख प्रकाशित करणाऱ्या ‘किर्लोस्कर’ मासिकाची निर्दोष मुक्तता झाली. त्यांच्या धर्मसुधारणा कार्यामुळे समाजात ‘सर्व मानव जात समान’ हे मानवी मूल्य रुजले. परधर्मात गेलेल्या हिंदूंचा पुनर्प्रवेश सुकर झाला. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा विचार आंदोलन बनला व अनेक मंदिरे सर्वांना खुली झाली. एकट्या ब्राह्मण जातीतील २७ पोटजातीतील विवाह धर्मसंमत मानण्यात येऊ लागले.
महादेवशास्त्री दिवेकर यांनी प्रौढ वयात विवाह केला. नंतर ते मिरजेस स्थायिक झाले. पुढे मुंबई ट्राम प्रवासातील अपघातात त्यांना अपंगत्व आले. तशाही अवस्थेत त्यांनी आपले धर्मसुधारणा कार्य शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. तर्कतीर्थांनी लिहून ठेवले आहे की, ‘‘महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात शुद्धी निर्माण करण्याकरिता त्यांनी आटोकाट परिश्रम केले. धर्मभोळेपणावर त्यांनी कडाडून हल्ला चालविला होता. बुद्धिनिष्ठ धर्माची तात्त्विक बैठक अधिक शुद्ध पायावर उभारून हिंदू समाज सामर्थ्यशील व विजिगीषू (विजयी) कसा होईल व हिंदू हे सनातन (प्राचीन) राष्ट्र जगामध्ये सामर्थ्याने कसे तळपू लागेल, याचाच विचार करीत राहिले व आयुष्यभर त्याच विचारात त्यांची समाधी लागली होती.’’
drsklawate@gmail.com