आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५१ वी जयंती. गेले वर्ष आपण त्यांचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष म्हणून विविध उपक्रमांनी साजरे केले. महाराष्ट्रात हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शाहू महाराजांना ‘सुधारकांचा महान दीपस्तंभ’ मानत. त्यांनी शाहू महाराजांचे जीवन, कार्य, सामाजिक सुधारणा, वेदोक्ताचा शास्त्रीय अर्थ, असे अनेकांगी लेखन केले आहे.

शाहू महाराजांच्या जीवन, कार्य विचारांचा वसा पुढे चालविल्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टने १९९० मध्ये ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार प्रदान करून गौरविले होते. पुण्यातील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेने छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने (१९७४-७५) त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. अनावरण समारंभाच्या निमित्ताने १९७७ मध्ये एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली होती. त्यात तर्कतीर्थांनी ‘सुधारकांचा महान दीपस्तंभ : शाहू महाराज’ हा शीर्षक लेख लिहिला आहे.

त्यात तर्कतीर्थांनी विशद केले आहे की, विसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राचा जो राजकीय व सामाजिक इतिहास घडला आहे, त्यात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला या युगात पूज्य झालेल्या तीनच व्यक्ती सांगता येतील, पहिले महात्मा जोतिराव फुले, दुसरे राजर्षी शाहू महाराज, तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. शाहू महाराज अत्यंत खोल धार्मिक श्रद्धा बाळगणारे होते. ते देवदर्शनास नित्य जात. धार्मिक उत्सव व यात्रा यांना भक्तिभावाने मदत करत.

श्राद्ध व देवपूजन मनापासून करत. त्यांना वेदशास्त्राबद्दल पूज्य बुद्धी होती. त्यांना वैदिक धर्मामध्ये सामाजिक समतेचे तत्त्व घालून वैदिक धर्माचे पुनरुजीवन करायचे होते. या कामी त्यांना सत्यशोधक समाज, आर्य समाज पूरक वाटत होता. वेदाचा अधिकार सर्व हिंदूंना सारख्या प्रमाणात मिळाल्यास धार्मिक बंधुत्व सजीव व सबळ होईल, समतेची भावना दृढ होईल, असे त्यांना वाटे; पण शाहू महाराजांच्या या विचारांना तत्कालीन ब्राह्मणवर्गाने साथ दिली नाही. तत्कालीन शंकराचार्यांनीही समर्थन केले नाही, म्हणून शाहू महाराजांना स्वतंत्र धर्मपीठ स्थापावे लागले. त्यांनी स्वतंत्र क्षात्र जगद्गुरूंची परंपरा निर्माण केली. वैदिक विद्यालय सुरू केले.

जगातील सर्व समाज आणि धर्मसुधारकांनी शिक्षणाला सुधारणांची गुरुकिल्ली मानले आहे. ते लक्षात घेऊन शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार घडवून आणण्याच्या दृष्टीने सर्व जाती-धर्मांची वसतिगृहे सुरू करून शिक्षणक्रांती घडवून आणली. कोल्हापूर, पुणे, नाशिक येथे २६ वसतिगृहे, अनेक शाळा, महाविद्याये, शिक्षण संस्था सुरू केल्या. चिपळूणकर, टिळक, आगरकर स्थापित डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शाहू महाराज अनेक वर्षे अध्यक्ष होते, हे फार कमी लोक जाणत असावेत. तत्कालीन संस्थानिक राजवटीत बडोदा, मैसूर, त्रावणकोर संस्थानांबरोबर कोल्हापूर संस्थानांनी जे समाज सुधारण्याचे कार्य केले, त्यात शाहू महाराज अग्रगण्य होते.

जातिभेदाची तीव्र व कणखर धार बोथट करण्याकरिता शाहू महाराजांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळी मागास व अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गासाठी आरक्षण, शिक्षण सुधारणा कायदे तयार केलेच; पण अशा समाजातील व्यक्तींशी त्यांचा खान-पान, स्पर्श, रोटी-बेटी व्यवहार पाहता ते ‘आधी केले, मग सांगितले,’ असा व्यवहार करणारे एकमेव राजे होते. आंतरजातीय विवाह समर्थन, कुष्ठरोगी उपचार, देवदासी प्रथा निर्मूलनासारख्या कार्यांतील त्यांचा सहभाग लक्षणीय नसून, लक्षवेधी होता. त्याची येथे नोंद घेणे आवश्यक आहे.

राजा म्हणून छत्रपती शाहू हे दिन-दलितांप्रति कनवाळू होते खरे; पण मुजोरांप्रति कठोर निर्णय घेण्यात त्यांनी कधीच कुचराई केली नाही. वेदोक्त प्रकरण त्याचे उदाहरण होय. वेदोक्त प्रकरणात तत्कालीन ब्रह्म वृंदाने सामंजस्याचे धोरण जर अंगीकारले असते, तर आपणास आजचा महाराष्ट्र वेगळा दिसला असता. शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या व भारताच्या सुधारणेच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे महान दीपस्तंभ आहेत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला तिलांजली देण्याची सुवर्णसंधी विसाव्या शतकाच्या प्रारंभी शाहू महाराजांनी आणून दिली होती, हे विसरता येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com