धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे १९२६ साली केशवदत्त महाराजांच्या पुढाकाराने धर्म परिषद संपन्न झाली होती. त्यानिमित्ताने धर्म सुधारणांसंबंधी लोकमतसंग्रह केला होता. त्याआधारे अनंत कृष्णशास्त्री संपादित ‘धर्मप्रदीप’ शीर्षक संस्कृत ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. या ग्रंथात चार भाग होते.- १) प्रमाणप्रकाश:, २) जातितत्त्वप्रकाश:, ३) शुद्धितत्त्वप्रकाश:, ४) विवाहप्रकाश:. यातील ‘शुद्धितत्त्वप्रकाश:’ या तिसऱ्या भागाचे खंडन करीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९२८ मध्ये ‘शुद्धिसर्वस्वम्’ शीर्षक संस्कृत प्रबंध लिहिला आणि तो स्वत: प्रकाशित केला.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात धर्मांतरित व धर्मभ्रष्टांसाठी परंपरेने चालत आलेली पतीतता रूढ होती. तिचे अनेक प्रकार होते. – १) म्लेंच्छां (असंस्कृत) बरोबर अन्नसेवन करणे, २) म्लेंच्छ स्त्री संबंध ठेवणे, ३) निंद्या / पातकीचे अन्नसेवन करणे, ४) हीन स्त्रीचा उपभोग घेणे, ५) अयोग्य, वयाने मोठ्या स्त्रीशी समागम करणे, ६) गुरुसखी (पत्नी)शी संबंध ठेवणे. या सर्वप्रकारच्या पातकांसाठी धर्मग्रंथांमध्ये प्रायश्चित्ते सांगितली गेली आहेत. या प्रायश्चित्तांसंबंधात धर्मपंडितांमध्ये मतभिन्नता होती. सांगितली जाणारी प्रायश्चित्ते ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशा स्वरूपाची असत. ही प्रायश्चित्ते सुसह्य कमी अन् असह्य अधिक असत. परिणामी, पतीत पतीतच राहात. मेधातिथी, आपस्तंब, ‘उज्वल’कार वसिष्ठ, बौद्धायन, अत्री इ. ऋषी-मुनींनी धर्मपतितांसाठी वेगवेगळी प्रायश्चित्ते वर्णिली आहेत.
तर्कतीर्थांनी आपल्या या प्रबंधात ‘म्लेंच्छ’ शब्दाची व्याख्या व तद्नुषंगिक विस्तृत ऊहापोह केलेला आपणास वाचण्यास मिळतो. म्लेंच्छ व्यवहारांतून कोणकोणती पातके घडतात, ते यात विशद केले आहे. या पातकातून शुद्धी/मुक्तीसाठी जी विविध प्रायश्चित्ते धर्मग्रंथात (श्रुती, स्मृती, पुराण इ.) सुचविली गेली आहेत, त्यांची चर्चा करून ती प्रायश्चित्ते सुधारणावादी व उदारमतवादी दृष्टिकोन वापरून सुसह्य कशी करता येतात, ते तर्कतीर्थांनी या ग्रंथात साधार स्पष्ट केले आहे. ते धर्मसुधारणा प्रयत्नांतील तर्कतीर्थांचे मानवसंवेदी व पुरोगामी योगदान म्हणून पाहावे लागेल. त्यांनी आपल्या या ग्रंथात धर्मग्रंथ निर्देशित जी प्रायश्चित्ते सुचविली आहेत, त्यात ५० टक्के सवलत देण्याचा आग्रह केला आहे. प्रायश्चित्तातील अतिरेकास शह देण्याच्या उद्देशाने पतीत व पातक संतती यांमध्ये भेद करून पतीत संततीस निर्दोष मानून तीस प्रायश्चित्तमुक्त करण्याच्या इराद्याने तर्कतीर्थांनी हे सुचविले आहे. त्यांच्यासाठीची प्रायश्चित्तता किमानपक्षी एकतृतीयांश असावी, अशी विनवणी केली आहे. यातून धर्मसुधारणांमागील तर्कतीर्थांची मानवतावादी, विवेकी तळमळ स्पष्ट होते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या या प्रयत्नांची प्रशंसा करीत ‘शुद्धिसर्वस्वम्’ची समीक्षा सदाशिवशास्त्री भिडे यांनी साप्ताहिक ‘केसरी’च्या २२ व २९ जानेवारी, १९२९च्या अंकात पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा स्वरूपात विस्ताराने केली आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले हे की, ‘‘शुद्धी कार्याला विरोध करण्याच्या भरात येऊन अस्पृश्यांपेक्षा म्लेंच्छ धर्मदृष्ट्या उच्च असल्याचे बेधडक विधान ‘धर्मप्रदीप’कारांनी केले आहे. या विधानाचा कोणीही तिरस्कारपूर्वक धिक्कारच करेल. श्री. जोशी यांनी शास्त्रीय शब्दांनीच त्यांच्या सर्व विधानांचे खंडन केले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेल्या या ग्रंथाने लोकांचा बुद्धिभेद नाहीसा होईल व समाजातील शुद्धिकार्याविषयी उत्साहात द्विगुणित वाढ होईल.’’
या ग्रंथाच्या ‘भूमिका’ शीर्षक प्रस्तावनेत तर्कतीर्थ स्पष्ट करतात की, हिंदू धर्मातून ज्या काही व्यक्ती बाहेर पडल्या वा त्यांना बाहेर काढले गेले, त्यांच्या पुन:श्च धर्मप्रवेशाबाबत धर्मवेत्ते संभ्रमात दिसतात. पुन्हा स्वधर्म प्रवेशाबाबत शास्त्रसंमत मार्गच नाही, अशी त्यांची धारणा आहे. त्यांचे हे मत खरे तर धर्मशास्त्र नीट अभ्यासले नसल्याने असते. अन्य धर्म स्वीकृतीने व्यक्तीस नास्तिकतेचा दोष लागतो; पण त्या दोषांच्या निरासाचे धर्मग्रंथांतील जे उपाय आहेत, ते अतिशयोक्त केले जातात. यात मानवीय सहानुभूतीपेक्षा शब्दप्रामाण्य, पारंपरिक निष्ठुरता अधिक असते. काही प्रसंगी तर निरपराधांना त्रास सोसावा लागतो, म्हणून लोकाचार समन्वय हाच त्यावरील रामबाण उपाय होय. शब्दप्रामाण्य व लोकाचार यात समन्वय करून करुणासागर विद्वानांनी भारतीयत्व जपावे म्हणून केलेले यातील आव्हान तर्कतीर्थांच्या समन्वयी व्यक्तिमत्त्वाची साक्ष होय. धर्म व्यवहार कठोर नि कर्मठ करताना धर्मवेत्ते हे विसरतात की, धर्म निर्माण झाला तो मुळी मानवकल्याणार्थ. त्यामुळे धर्माच्या नावावर केला जाणारा कोणताही अन्याय, कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरत नसतो.
drsklawate@gmail.com