भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यामुळे देशातील असंख्य बुद्धिबळरसिक आनंदले आहेत. माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदनंतर अशा प्रकारची कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा केवळ दुसराच भारतीय. तशात तो केवळ १८ वर्षांचा असणे त्याच्या यशोगाथेत नवलाईची भर घालते. प्रज्ञानंदच्या या देदीप्यमान वाटचालीचे श्रेय बऱ्याच प्रमाणात त्याचा प्रशिक्षक ग्रँडमास्टर आर. बी. रमेशला दिले जाते.

या सहस्रकाच्या सुरुवातीस रमेश देशातील एक उत्तम बुद्धिबळपटू होता आणि भारताप्रमाणे परदेशातही चांगली कामगिरी करून दाखवत होता. १९८८मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी रमेशने गांभीर्याने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्या वेळी विश्वनाथन आनंद नुकताच भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला होता आणि तोच रमेशचे स्फूर्तिस्थान होता. यानंतर दहा वर्षांतच रमेशला भारताच्या ज्युनियर संघाला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. म्हणजे २० वर्षांखालील बुद्धिबळपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी २२ वर्षांचा प्रशिक्षक! यातील विरोधाभासाकडे रमेशने नंतर एका मुलाखतीत लक्ष वेधले.

आनंदनंतर सुरुवातीच्या दहा वर्षांत भारतात दिव्येंदु बारुआ आणि प्रवीण ठिपसे असे एकूण तीनच ग्रँडमास्टर उदयाला आले. ही परिस्थिती नंतर काही प्रमाणात बदलत गेली, याला कारण उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन. रमेश स्वत: २००३ मध्ये म्हणजे वयाच्या २७ व्या वर्षी ग्रँडमास्टर बनला. पण त्याच्या आधीच त्याची प्रशिक्षकपदाची कारकीर्द सुरू झाली होती. ‘आमच्या वेळी चांगले आणि विशेषत: परदेशी प्रशिक्षक फारसे मिळायचेच नाहीत. त्याचा परिणाम परदेशात खेळताना व्हायचा. बुद्धिबळात एका स्तरावर पोहोचल्यानंतर निव्वळ समज, गुणवत्ता, अंत:प्रेरणा या बाबी गौण ठरतात आणि कसून तयारी हा घटक निर्णायक ठरतो. त्या दृष्टीने काही करता येईल का या विचाराने मी प्रशिक्षणात उतरलो,’ असे रमेश सांगतो.

२००८ मध्ये तो आणि त्याची महिला ग्रँडमास्टर पत्नी आरती रामस्वामी यांनी चेन्नईत ‘चेस गुरुकुल’ची स्थापना केली. त्या वेळी लठ्ठ पगाराची सरकारी नोकरी आणि बुद्धिबळपटू म्हणून कारकीर्द या दोहोंवर पाणी सोडण्याचा धोका त्याने पत्करला. याचे कारण तोपर्यंत रमेशने प्रशिक्षण दिलेले बुद्धिबळपटू राष्ट्रीय, आशियाई आणि युवा स्तरावर जगज्जेते बनू लागले होते. प्रज्ञानंद हा त्याचा सर्वात प्रसिद्ध शिष्य, पण अरविंद चिदम्बरमसारख्या इतरही गुणवानांना त्याच्या प्रशिक्षणाचा लाभ होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुद्धिबळात निव्वळ चालींच्या गणनाइतकेच महत्त्व मानसिक कणखरपणाला असते आणि त्या दृष्टीने प्रशिक्षकाची जबाबदारी सर्वात महत्त्वाची ठरते असे रमेशला वाटते. वैयक्तिक प्रशिक्षणाबरोबरच रमेशच्या सांघिक मार्गदर्शनाचा पैलूही महत्त्वाचा ठरतो. ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या दोन संघांना कांस्यपदक जिंकण्यास हातभार लावणारा तो एकमेव प्रशिक्षक आहे.