हर्षल प्रधान

भाजप व मित्रपक्षांचाही इतिहास पाहिल्यास हा जुना भाजप नाही, हेच लक्षात येते-केंद्रीय अहंकारापुढे इथे महाराष्ट्राचे नेतेही दबतात..

vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

भारतीय जनता पक्षाला जवळून ओळखणारे अगदी संघाशी संबंध असला किंवा नसला तरी भाजपला आपला पक्ष समजणारे बहुतांश सामान्य हिंदू आज भाजपच्या या बदललेल्या रूपाला आणि मोदी-शहा यांच्या अहंकाराने पछाडलेल्या वृत्तीला पाहून आश्चर्यचकित होतात आणि भाजप जो त्यांना आवडत होता तो हाच का, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. मोदी यांच्यावर अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी का नाही,  म्हणत टीका करणारे काँग्रेसचे पवन खेरा यांना थेट विमानतळावरून उचलून अटक केली जाते, अमित शहा महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांना धडा शिकवणार वगैरे उन्मत्त उद्गार काढतात, ‘उद्धव ठाकरे तळवे चाटत होते’ असे विधान करतात , ज्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कार्याचा जागतिक दखल घेऊन गौरव केला जातो, सर्वोच्च न्यायालयापासून ते आंतरराष्ट्रीय संशोधकांपर्यंत सगळे उद्धव ठाकरे यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून काम केल्याची शाबासकी देतात त्यांच्या बद्दल केवळ सत्तेच्या आणि पदाच्या जोरावर अमित शहा वाट्टेल ते बोलून जातात आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसांसमोर झालेल्या या उन्मत्त उद्गारांबाबत आपण कोणीच काही बोलत नाही. सत्ता माणसांना लाचारी स्वीकारायला लावते ती कशी त्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.

आपण ज्या भाजपवर एकेकाळी आदर्श पक्ष म्हणून प्रेम केले, ज्या अटलजी-अडवाणी यांना देशातील आदर्श नेते म्हणून अभिमानाने गौरविले त्यांच्या भाजपमध्ये आज हे सुरू आहे. ईडी, सीबीआय, आयटी, पोलीस या यंत्रणांना वापरून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार देशातील जनता मूकदर्शक म्हणून बघत बसली आहे. महाराष्ट्राने ज्या प्रमोद महाजन – गोपीनाथ मुंडे – नितीन गडकरी या भाजपमधील त्रिकुटावर अतोनात प्रेम केले, त्या भाजपमध्ये आज हे असले कार्यकर्ते आहेत जे तोंडातून ब्र काढायला तयार नाहीत. भाजपचे हे त्रिकूट आज भाजपमधील नेत्यांच्याच विस्मरणात गेले आहे. भाजपची ही अवस्था घसरणीकडेच जाणारी आहे.

भाजपचा इतिहासच ज्याची गरज त्याला प्राधान्य असा राहिला आहे. भाजपसोबत जे जे गेले त्यांना संपवण्याचा कार्यक्रम भाजपने राबवला, गरज सरो वैद्य मारो – अगदी मेला नाही तर मारा, परत त्याने डोके वर काढूच नये, स्वार्थासाठी वापरा आणि त्याचे काम संपले की फेकून द्या, हेच या नव्या भाजपचे राजकारण असल्याचे, ताज्या इतिहासात डोकावले की सहज जाणवेल. आजपर्यंत भाजपसोबत युती केलेले पक्ष पाहा आणि आठवा ते सध्या कुठे आहेत. म.गो. पक्ष युती, मेहबूबा मुफ्ती यांच्याशी युती, मायावतींच्या पक्षाशी युती, ममता बॅनर्जीशी युती, नितीशकुमार यांच्याशी युती, हरियाणात बिश्नोई यांच्याशी युती, कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांची फसवणूक करणारी युती, पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाची फसवणूक, खासदार चिंतामण वनगा, खासदार मनोहर र्पीकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराची वाताहत करणारी भाजपच होती, मग बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ते उद्धव ठाकरेंना कसे सोडतील.. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांचा डाव ओळखला आणि धोबीपछाड दिला, म्हणून त्यांच्याच शिलेदारांना फोडून उन्मत्तपणे ‘आम्ही बदला घेतला’ अशी विधाने करणारी ही भाजप!

शिवसेना संपवूनच महाराष्ट्र हवा

बाळासाहेब असेपर्यंत अतिशय गोड वागणारे भाजपचे नेते बाळासाहेब कैलासवासी झाल्यावर मात्र एकदम पलटले, शिवसेना संपवा आणि महाराष्ट्र काबीज करा या हेतूने झपाटले आणि त्यातूनच पुढील कारवाया झाल्या. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली. त्या निवडणुकीत उद्धव  ठाकरे यांनी एकटय़ाच्या जिवावर ६३ आमदार निवडून आणले तेव्हा भाजपला जाणवले की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत आणि महाराष्ट्रात जनता उद्धव ठाकरे यांनाच महत्त्व देत आहे. कदाचित तेव्हाच हा उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखला गेला आणि सारीपाटावर सोंगटय़ा पसरल्या गेल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला निवडणुकीनंतर सत्तेत समसमान वाटा देण्याचे आश्वासन दिले गेले आणि नंतर त्याला सोयीस्कर वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. शिवसेना आणि अकाली दल जुने सहकारी असूनही पाठीत वार केले.

एकंदर भाजप आणि सहयोगी पक्षांचा युतीचा इतिहास बघता शिवसेना व अकाली दल वगळता इतर सर्व पक्ष भाजपची केंद्रातली सत्ता गेल्यावर भाजपला सोडून गेले. शिवसेना भाजपसोबत सत्ता नसतानाही राज्यात, केंद्रात सोबत होती.  याउलट भाजपचा इतिहास तपासणे गरजेचे आहे. भाजपप्रणीत ‘एनडीए’तून २००२ ते २०१४ या १२ वर्षांच्या काळात काही मतभेदांमुळे १४ पक्ष बाहेर पडले.. जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (२००२), समता पार्टी (२००३ ), द्रमुक (२००४), हरियाणा विकास पार्टी (२००४ ), इंडियन फेडरल डेमॉक्रॅटिक पार्टी (२००४), तृणमूल काँग्रेस (२००७), जनता दल सेक्युलर (२००७),  इंडियन लोकदल (२००९), बिजू जनता दल (२००९), तेलंगणा राष्ट्र समिती (२००९ ), कामतापूर प्रोग्रेसिव्ह पार्टी – बंगाल (२०१०), उत्तराखंड क्रांती दल (२०१२), राष्ट्रीय लोक दल (२०१२), झारखंड मुक्ती मोर्चा (२०१२ ) अशी त्यांची नावे. मात्र २०१४ च्या नंतर हरियाणा जनहित काँग्रेस (२०१४ ), एमडीएमके (२०१४), रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी केरळ (२०१६), स्वाभिमानी पक्ष (२०१७ ), जम्मू कश्मीर पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (२०१८),  राष्ट्रीय लोक समता पार्टी (२०१८) , तेलगू देसम (२०१८), गोरखा जनमुक्ती मोर्चा बंगाल (२०१९), प्रवासी निवासी पार्टी केरळ (२०१९ ), शिवसेना (२०१९), शिरोमणी अकाली दल (२०२०) , राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष राजस्थान (२०२०), बोडोलँड पीपल्स फ्रंट (२०२१), डीएमडीके (२०२१), गोवा फॉरवर्ड पार्टी (२०२१), महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष (२०२१), लोक इन्साफ पार्टी (२०२२) असे १७ पक्ष अवघ्या आठ वर्षांत भाजपची साथ सोडते झाले. एनडीएत आजघडीला १७ पक्ष असले तरी त्यापैकी किती पक्षांना भाजप किंमत देते हा संशोधनाचा विषय आहे. इतकेच नव्हे तर भाजपमध्ये असलेल्या भाजपच्या नेत्यांना तरी आज कुठे महत्त्व आहे? ना बोलण्याचे स्वातंत्र्य ना विचार करण्याचे. नुसते हो ला हो करणारेच आज पुढे आहेत. अटलजी-अडवाणींच्या काळात, महाजन- मुंडे यांच्या काळात असे होते का?

भाजपची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा अशी होती, भाजपमध्ये कार्यरत असणारे सगळे कार्यकर्ते संघाच्या शाखेत तयार होऊन येतात असे म्हटले जाई, मग आज संघ गप्प का? त्यांना महाराष्ट्रात आणि देशात सुरू असलेला भाजपच्या या नेत्यांचा अहंकारी नाच कसा चालतो, एखादा आपल्याविरोधात आहे म्हणून त्याला सर्व सरकारी यंत्रणा लावून उखडून फेकून द्यायचे पण तो आपल्या पक्षात आला की ‘शुद्ध’, ही काय संघाची शिकवण आहे का?

 महाराष्ट्रातील नेते दबलेलेच

महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणल्यावर फुटीर गटाचे एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केले. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे घडवून आणले त्यांचेही महत्त्व कमी करून एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढवले गेले. त्यानंतर राज्यपालांमार्फत शिवाजी महाराजांवर, महात्मा फुले, सावित्रीबाईंवर अपमानास्पद टिप्पणी झाली तेव्हा स्वत:चे पद टिकवून ठेवण्यासाठी शिंदेंनी अवाक्षरही काढले नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली तेव्हा शिंदे काहीच बोलू शकले नाहीत. महाराष्ट्रातून उद्योग पळवले तेव्हा शिंदे मुख्यमंत्री असूनही कानाडोळा केला. ऋतुजा लटकेंना राजीनामा देता येऊ नये यासाठी मनपा आयुक्तांवर दबाव आणला तो कोणी हे वेगळे सांगायची गरज आहे का ? दसरा मेळाव्याला शिवतीर्थ मिळू नये म्हणून प्रशासनाला वेठीस धरले. शिवसैनिकांवर दबाव टाकून जुन्या केसेस काढून छळवणूक केली गेली, नगरविकासमंत्री असताना मविआ काळातील स्वत: मंजूर केलेल्या प्रभाग रचनेला मुख्यमंत्री म्हणून स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला जुन्या निर्णयांना स्थगिती देण्यावरून फटकारले. शिंदेंनी गेल्या सहा-सात महिन्यांत फक्त भाजपच्या वरिष्ठ दोन नेत्यांना खूश कसे करता येईल एवढेच पाहिले. शिंदे हे जगातले पहिले उदाहरण ज्यांनी बंडखोरी केली, मग मुख्यमंत्री झाले आणि मग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्षच बळकावला.

महाराष्ट्रातील घराघरात शिंदे आणि भाजपच्या या कुटिल राजकारणाबद्दल बोलले जाते, तेव्हा भाजप पूर्ण बदलला आणि अटलजी- अडवाणी, महाजन-मुंडे यांच्याऐवजी अहंकारी नेत्यांचा पक्ष आता उरला, हेच वास्तव गहिरे होते.