माझ्या आजोळी, आजोबांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ बांधलेले राममंदिर होते, आजही आहे. पण आमचे गाव आजोळपासून तसे दूर असूनही, तिथे राममंदिर नसूनही रोजच्या जगण्यात राम होता… दिवसभर एकमेकांच्या गाठीभेटी झाल्या की दोघे राम राम करत, लग्न समारंभात मानाचे आहेर झाले की एकमेकांना आणि दोघे मिळून उपस्थित सर्वांना मोठ्या आवाजात राम राम म्हणून अभिवादन करत. रोगाने कांदा करपला किंवा अवकाळी पावसाने ज्वारी काळी पडली की त्यात काही राम राहिला नाही असे म्हटले जाई, ‘रामाच्यापारी (रामप्रहरी) खोटे बोलू नको’ असे दटावले जाई, मकर संक्रातीला बायका जायच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात मात्र वाण घ्यायच्या सीतेच्या नावाने, गावात एकादशीला पालखी निघायची विठ्ठलाची- मुखी जप मात्र रामकृष्ण हरीचा!

साधारण दहा वर्षापूर्वी एक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असतानाचा प्रसंग! संस्थेचे सल्लागार मंडळ होते. त्यामध्ये ठराविक विचार सरणीच्या लोकांचा प्रभाव मोठा. त्यांच्याकडून आणि जोडीला तशाच विचारसरणीला मानणाऱ्या विद्यार्थी संघटनेकडून महाविद्यालयीन परिसरात राम मंदिर बांधावे असा प्रस्ताव चर्चेला आला. सल्लागार मंडळाचा प्रस्ताव त्यामुळे त्याला कोण विरोध करणार! विज्ञान महाविद्यालयात राममंदिराचा आग्रह कशासाठी ? असा प्रश्न करून मी माझी बाजू मांडायला सुरुवात केली. बाजू सबळ ठरते आहे लक्षात आल्या नंतर विद्यार्थ्यांचे मत घेऊ या असा निर्णय झाला. मात्र त्यांच्यासमोरही बाजू मांडण्याची संधी द्यावी हा माझा आग्रह मान्य केला. असावे आणि नसावे या दोन्ही बाजू प्रभावी मात्र संयतपणे मांडाव्यात असे ठरले. ‘उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कोणाच्या गावाला राममंदिर आहे?’ असा प्रश्न केला. त्याला एका विद्यार्थ्याव्यतिरिक्त सर्वांनी नाही म्हणून उत्तर दिले. तुमच्या गावातील लोक रामाप्रती भक्ति भाव जोपासतात का? याचे उत्तर मात्र एका सुरात होय आले. तेथून मांडणीला सुरुवात झाली. शेवट राम मनामनात जपूया मंदिरात नको अशा निर्णयावर बैठक समाप्त झाली. पुढे मी महाविद्यालय सोडले. मात्र मागील दोन वर्षापूर्वी तिथे राम मंदिर उभारले गेले. असो

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

आजोळचे राममंदिर…

माझी आई सधन घरातली. तिच्या वडिलांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ १९६० गावात राममंदिर बांधले, त्या गाव परिसरातील ३०-४० खेड्यात तेवढे एकच राममंदिर. त्यामुळे माझे आई, मामा- मावशी या सर्वांचा अंत:करणाचा विषय म्हणजे राम, त्यामुळे आम्हा सर्व भावंडाच्या लहानपणापासून भाव विश्वातला विषय सुद्धा राम! सर्व मावश्यांसाठी माहेरी साजरी होणारी रामनवमी म्हणजे दुसरी दिवाळीच! माझी आजी सुद्धा शिकलेली आणि वाचनाची आवड असणारी. त्यामुळे ती खूप चांगले दृष्टान्त देऊन रामाविषयीच्या गोष्टी सांगत. माझे मामा आयुष्य भर काँग्रेसी विचाराचे राहिले. ते धार्मिक होते परंतु सार्वजनिक जीवनात (ते जिल्हा परिषदेचे १३ वर्षे उपाध्यक्ष होते. दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदारकीसाठी उमेदवारी होती) अगदी उदारमतवादी. माझे सर्व मामा मावश्या या धार्मिक- परंतु सार्वजनिक जीवनात कमालीच्या सहिष्णू. आम्ही सर्व भावंडे सुद्धा तशीच दुसऱ्यांच्या धार्मिक भावनांनाचा आदर करणारी अशी. एक मावस भाऊ थोडा बदलला आहे. आम्हाला असे वाटते की त्याचा कारखानदार नेता अलीकडे जय श्रीराम म्हणू लागल्या पासून त्याच्यात असा बदल झाला असावा. तो अयोध्येलाही जाणार आहे. आम्ही मात्र दरवर्षी प्रमाणे रामनवमीला मामाच्या गावाला जाणार आहोत.

उत्सव साजरे करण्याची पद्धत

पंधरा वीस वर्षापूर्वी गावातील धार्मिक सोहळे आणि आजचे सोहळे असा तुलनात्मक अभ्यास केला की चित्र किती बदललेले आहे हे लक्षात येते. त्यावेळी वर्षातून येणारी गावची जत्रा, वर्षातून एखादाच साजरा होणारा हरिनाम सप्ताह आणि तीन-पाच वर्षातून होणाऱ्या रामायणउत्सवा शिवाय धार्मिक उत्सव नव्हते. वैयक्तिक पातळीवर महिन्याची पंढरपूर वारी, पूजाअर्चा अशा पद्धतीने श्रद्धा जपल्या जात. मुलांची लग्ने झाली आता वारी सुरू करावी असा रिवाज कितीतरी घरी असे. आजही माझ्या गावच्या देवाच्या पूजेला मुस्लिम समाजाला वाद्य वाजविण्याचा मान आहे. अशी कितीतरी गावोगावीची उदाहरणे देता येतील. याच्या जोडीला अनेक लोक परंपरा आणि त्यातील देव देवता. त्यांचे उत्सव साजरे करण्याची प्रत्येक भागातील पद्धत वेगळी. काही ठिकाणी देवाला पूरणपोळीचा नैवद्य तर काही ठिकाणी मांसाहारी असे आणि अनेक ठिकाणी आजही आहे.

थोड्या फार फरकाने अशा पद्धतीचे चित्र जवळपास सर्व गावात पंधरा-वीस वर्षापर्यंत होते. प्रत्येक समाज घटक त्यांचे त्यांचे रितीरिवाज जोपासून सार्वजनिक धार्मिक उत्सवातही सहभागी होत. आज आपण अनौपचारिक गप्पा मारल्या की लोकांच्या धार्मिक भावना टोकदार बनत आहेत हे जाणवते. राम राम म्हणण्यातला मृदु मुलायमपणा जाऊन त्याची जागा ‘जय श्रीराम’ या काहीशा आक्रमक घोषणेने जागा घेतली आहे. आर्थिक प्रगतीबरोबर धार्मिक कार्यक्रमांतील झगमगाटही वाढला आहे. धार्मिक सोहळ्यासाठी लाखावर वर्गणी जमा होते निरूपणाला सेलेब्रिटी बुवा महाराज बोलविले जातात. अभ्यास कमी आणि विनोदनिर्मिती करून टाळ्या मिळविणे किंवा सर्व मूल्ये (महिलावर विनोद करणे, उद्यमशील माणसाला हिणविणे, एकतर्फी धर्माभिमान) पायदळी तुडवणे असाही प्रकार होतो.

हेही वाचा…अन्वयार्थ: बोईंगची प्रतिमाच खिळखिळी!

नेतृत्व खूप प्रामाणिक असूनही…

अनेक गावात पूर्वी नवरीला लग्न चुडा भरणारी बाई ही मुस्लिम(मात्र ती सवाष्ण असावी हा आग्रह ) असे आज संगितले जाते की हिंदू-कासार समाजाच्या स्त्रीकडूनच तो भरला पाहिजे. लोकांच्या धर्म-जात अस्मिता टोकदार बनू लागल्या की त्याप्रमाणे राजकीय लोकांनी त्यामध्ये सहभाग वाढविला. त्यांच्या पद्धतीने सर्व सोहळे पार पडू लागले. अनेक (सर्वपक्षीय) आमदार/ साखर कारखानदार अलीकडे ऊसाचे बिल वेळेवर देणार नाहीत, पण न चुकता हरिनाम सप्ताह साजरे करतात, सभासदांना काशी यात्रा घडवितात. हेच राजकीय लोक पंधरा-वीस वर्षापूर्वी एका समाजाच्या नावाने असणाऱ्या संघटनेद्वारे एका चळवळीला बळ देत होते. चळवळीचा अजेंडा म्हणजे बहुजनांची आजची दुरवस्था ही केवळ ब्राम्हणामुळे आहे.

ते मोक्याच्या जागी राहून आपले वर्चस्व कसे प्रस्थापित करतात हे विविध पद्धतीने संगितले जात होते. त्याला पर्याय म्हणून नवीन धर्माची घोषणासुद्धा केली गेली. पुढे काही वर्षानी त्याचा प्रभाव कमी झाला. ती चळवळ क्षीण झाली. पुरोगामी चळवळी मध्ये सर्व सामाजिक विविधतेचा सारासार विचार करून अस्सल भारतीय बनावटीचा किमान कार्यक्रम देणे शक्य झाले नाही त्यामुळे त्या चळवळीचे नेतृत्व खूप प्रामाणिक असूनही तीही चळवळ क्षीण होत गेली. अन्य संघटनांना देखील, लोकांना कोणताही विधायक कार्यक्रमामध्ये गुंतून ठेवता आले नाही त्यामुळे एकच कार्यक्रम उरला त्यांना धार्मिक बनविणे आणि तेही पूर्ण धर्म समजून न सांगता. हा बदल लवकरच टोक गाठेल असे वाटते कारण खरे प्रश्न विसरून लोक जाती/ धर्माविषयीच प्राधान्याने बोलत आहेत. त्यामध्ये काही वेळा उन्मादही दिसतो आहे.

या सर्व गदारोळत खरा संत कोण हा सांगणारा तुकाराम, अवघ्या विश्वासाठी पसायदान मागणारा ज्ञांनेश्वर, कर्म हीच भक्ती मानणारा सावता ,साक्षात देवांचा राजा असणाऱ्या इंद्राला गोरगरीब जनतेचा कैवार घेऊन आव्हान देणारा कृष्ण आणि राजस सुकुमार मर्यादा पुरुषोत्तम राम हे सर्व हरवून जातील की काय अशी भीती वाटते आहे. आजचा आपण तयार केलेला राम आक्रमक आहे.

हेही वाचा…लालकिल्ला: ‘इंडिया’ने एकास एक उमेदवार दिले तर?

आज असा प्रसंग आला तर…

कारण तिने सांगितलेला राम म्हणजे राजस सुकुमार, भिल्लिणीची बोरे खाणारा, शत्रूचेही श्राद्ध घालणारा राम! तेच रामाचे रूप आजही मनात कायम आहे. मृदु मुलायम आवाजातील ‘राम’ हा उच्चार आजही कानाला हवाहवासा वाटतो. ती म्हणायची की खरा रामभक्त कोण? आम्ही उत्तर द्यायचो मंदिरातील पुजारी, रोज जप करणारी तू, रामकथा सांगणारे महाराज परंतु उत्तर चुकायचे. तिच्या मतानुसार खरी रामभक्ती वडार समाजाच्या स्त्रियांनी केली. ज्या चोळीच्या मोहापायी रामायण घडले त्या चोळीचा त्याग करणारी ती वडार स्त्री ही खरी राम भक्त. अशा कितीतरी पद्धतीने तिने सांगितलेला राम लक्षात राहिला आहे.

महाविद्यालयातला तो प्रसंग. ती माझी भूमिका माझ्या आजीच्या संस्कारांमुळेही घडली असावी… दहा वर्षापूर्वी विरोधी-प्रामाणिक बाजू मांडण्याची संधी होती. ती मांडता येत होती. विचारात परिवर्तन करण्याची शक्यता सुद्धा होती. आज असा प्रसंग आला तर विचार मांडण्याची संधी तरी मिळेल का? अशा परिस्थितीत माझ्या आजीने मला सांगितलेला राम मला दिसेनासा झाला आहे. आज माझी आजी असती तर ती खूप व्याकुळ झाली असती…

satishkarande_78@rediffmail.com
(समाप्त)