पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने कौटुंबिक हिंसाचार, क्रूरतापूर्ण मारहाण आणि हुंड्याच्या मागणीसाठी होणारा सततचा असह्य छळ याला कंटाळून आपले जीवन संपवले. या हुंडाबळीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेची घराघरात चर्चा व निंदा होत आहे. या घटनेमुळे माध्यमे तसेच समाज माध्यमांवर मराठा समाजाबाबत वेगवेगळ्या टिप्पण्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सकल मराठा समाजाच्या लोकांनी एक बैठक घेऊन त्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे.
० हगवणे कुटुंबासारख्या नराधमांच्या घरात मुलगी द्यायची नाही आणि त्यांच्या घरातील मुलगी करायची नाही.
० समाजातील लग्ने साध्या पद्धतीने व्हावीत यासाठी काम करणे.
० ज्या घरात सुनेचा छळ होतो असे समजते त्या घरच्या सुनेच्या पाठीशी संपूर्ण समाज खंबीरपणे उभे राहायचे.
० अत्याचार करणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाकायचा.
० मुलीच्या आईवडिलांनी समाज काय म्हणेल यांची अजिबात तमा न बाळगता आपल्या मुलीच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहावे आणि समाजही त्यांना साथ देईल.
० अशा कुटुंबाची पोलिसात तक्रार करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला जाईल आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल यासाठी समाज पुढाकार घेईल.
० समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सामाजिक प्रबोधनाचे कार्य करण्यासाठी समाजाची एक समिती स्थापन करून त्या समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण करण्यात येईल.
० मुलींमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवले पाहिजे.
० बडेजावपणाला विरोध करून समाजाने त्याचा निषेध केला पाहिजे.
० अनिष्ट रूढी परंपरा संपविल्या पाहिजेत.
या बैठकीत अशा अनेक मुद्द्यांची चर्चा झाली. त्यामधल्या ‘अशा कुटुंबावर बहिष्कार टाकून त्यांच्या घरात मुली द्यायच्या नाही आणि त्यांच्या घरातल्या मुली करायच्या नाहीत’ हा फार मोठा क्रांतीकारक निर्णय समाजाने घेतला.
आपल्या समाजात अजूनही वैदिक पद्धतीने लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी पाठविण्याची पद्धत आहे. मुलीने आणि मुलाने स्वतंत्र राहावे, आपला संसार आनंदात आणि सुखाने करावा अशी भावना समाजात अजूनही रुजली नाही. याउलट लग्न झालेल्या मुलाला त्याचे आईवडील आपल्या ताब्यात ठेवून त्याच्याजवळ घरात नवीन आलेल्या सुनेची चुगली करतात. तुझी बायको आमचा सन्मान करत नाही, आमची सेवा करत नाही, आम्हाला उद्धट बोलते अशा एक ना अनेक खोट्या गोष्टी मुलाच्या मनात बिंबवून मुलीला त्रास द्यायला प्रारंभ होतो. त्यामुळे काही सन्माननीय कुटुंबे वगळता सासर म्हणजे सुनेला सासुरवास करणारे, तिला परकी समजून तिचा छळ करणारे, पैसा आणि हुंड्यासाठी छळणारे कारागृह अशीच अवस्था कायम असते. याचा अर्थ सुनेचा छळ होतोच हे खरे असून ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी म्हण आपल्याकडे दृढ झाली आहे.
मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नात नातेवाईक, इष्टमित्रासह समाजातील लोक सहभागी होतात. लग्न थाटात लावले तर लोक कौतुक करतात. लग्नात जेवण घेतात, भेटवस्तु देऊन शुभेच्छा देतात. मात्र सासरी मुलीचा छळ होत असेल, तिला त्रास दिला जात असेल तर कोणीही पाठीशी उभे राहायला तयार नसतो. हा कौटुंबिक विषय आहे असे म्हणून त्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. लग्न समारंभ हा सामाजिक असतो तेव्हा कुटुंबात होणारे वाद फक्त कौटुंबिक कसे? इथेच समाज चुकतो. लग्नानंतर काही प्रश्न, अडचणी, त्रास, कौटुंबिक हिंसाचार, छळ होत असेल तर समाजाने त्याची दखल घेतली पाहिजे. मुलीचे म्हणणे ऐकून घेऊन तिच्यावर अन्याय करणाऱ्या कुटुंबाला जाब विचारला पाहिजे. मात्र या मानसिकतेचा समाजात पूर्ण अभाव आहे. म्हणूनच हगवणे कुटुंबासारख्या लोभी, लालची आणि क्रूर असलेल्या लोकांना फावते. ही समाजाची फार मोठी शोकांतिका आहे.
आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, २००५ आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ अस्तित्वात असतांनाही महाराष्ट्रासह भारतात कौटुंबिक हिंसाचार व हुंडा बळीच्या घटना कां वाढत आहेत.? यावर कधी सामाजिक चिंतन होते का? याला सर्वात महत्त्वाचे कारण आहे समाजाची मानसिकता आणि त्रयस्थ वृत्ती. त्यानंतर ह्या कायद्यांचा गैरवापर होतो ही समाजात होणारी अवाजवी ओरड आणि त्याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करून या कायद्यांना कमजोर करण्याची प्रवृत्ती. तिसरे म्हणजे घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष, त्यांच्याकडून घटनेचा केला जाणारा अयोग्य व अपुरा तपास आणि भ्रष्ट प्रवृत्तीने केस दाबण्याचे वाढलेले प्रकार, वकिलांची बेइमानी आणि आपल्या पेशाची नैतिकता न पाळता फक्त पैशासाठी खोट्या केसेस लढून पैशाच्या बळावर केस कमजोर करण्यासाठी कायद्यातून पळवाटा शोधण्याची मनोवृत्ती आणि न्यायालयांची असंवेदनशीलता या गोष्टी प्रामुख्याने अशा घटना वाढण्यास कारणीभूत आहेत.
यासोबतच कौटुंबिक हिंसाचाराची केस न्यायालयात गेल्यास वकिलांकडून अन्यायग्रस्त स्त्रीला विचारले जाणारे फालतू व तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण करणारे प्रश्न, जे उपलब्ध होऊच शकत नाहीत ते पुरावे सादर करण्याची होत असलेली मागणी या व अशा अनेक कारणामुळे अन्यायग्रस्त स्त्रियांना न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी झालेली आहे म्हणूनच अन्याय करणाऱ्यांचे फावते व ते उजळ माथ्याने समाजात वावरतात.
जी मुलगी दुसऱ्याच्या घरात अन्याय सहन करत जगते ती आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचे पुरावे कसे गोळा करेल? फिर्याद नोंदवून घेण्यासही तयार नसलेले पोलीस अशा घटनांचा प्रामाणिक तपास करत असतील यावर विश्वास ठेवायचा कसा? आम्हाला एकच काम आहे का? हे तुमचे कौटुंबिक मॅटर आहे. आपापसात मिटवा अशा शेलक्या मारून नेणारी पोलीस यंत्रणा देखील या घटनांना मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. याचा समाजाने, सरकारने, पोलिसांनी आणि न्यायालयांनी गंभीरपणे विचार करावा. यापुढे एकही वैष्णवी आपला जीव गमावणार नाही याची सामूहिक काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्ये आहे.
लेखक अकोला येथील सेवानिवृत्त प्रोफेसर आणि संविधान प्रचारक तथा विभागीय डाटा सचिव आहेत.