भारत सरकारने १९५० मध्ये स्थापन केलेली ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ अर्थात ‘आयसीसीआर’ ही संस्था सध्याच्या सार्वत्रिक अमेरिकीकरणाच्या काळात भारतीय खाद्यसंस्कृती, महाकाव्ये, वेशभूषा, परंपरा, सण-उत्सव, संगीत-नृत्याचे महत्त्व जगाला पटवून देत आहे. जागतिक पटलावर भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेच्या कार्याविषयी संस्थेचे अध्यक्ष, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची विशेष मुलाखत..

जगाला भारतीय कला, संस्कृती, साहित्य तसेच समाजजीवनाची ओळख करून देणारी संस्था म्हणून ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ (आयसीसीआर) ओळखली जाते. आपल्या ७३ वर्षांच्या वाटचालीत या संस्थेने जगभरात भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. गेली सहा वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच राजकीय विचारवंत डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे आहे. जगभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे भारतीयत्वाचा प्रसार संस्थेकडून अव्याहत सुरू आहे. या कार्याला कोणतीही धार्मिक बाजू नाही. संपूर्ण जगाचे झपाटयाने अमेरिकीकरण होत असताना या सांस्कृतिक सपाटीकरणाला विरोध करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीत आहे, असे ठाम मत डॉ. सहस्रबुद्धे मांडतात. गेल्या काही वर्षांत जगाचा भारताविषयीचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतीय संस्कृतीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता जगात वाढत आहे. भारत एक शक्ती म्हणून झपाटयाने पुढे येत असून, आपली ही विविधता जगापुढे मांडणारा एक सेतू म्हणून आयसीसीआरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट

हेही वाचा >>> पीएच.डी. करून दिवे लागत नाहीत या परिस्थितीला जवाबदार कोण?

आयसीसीआरचे स्वरूप कसे आहे?

 १९५० मध्ये तत्कालीन सरकारने या संस्थात्मक स्वरूपाच्या परिषदेची स्थापना केली. तेव्हा ही संस्था शिक्षण खात्याचा एक भाग होती. त्यामुळे ७०च्या दशकापर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्रीच संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असत. सुरुवात डॉ. अबुल कलाम आझाद यांच्यापासून झाली. पुढे १९७०च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संस्थेला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा एक भाग केले. कारण या संस्थेचा संबंध परदेशांशी अधिक आहे, असा मतप्रवाह होता. यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष ठरले. पुढे एका टप्प्यावर वसंत साठे हे कोणतेही मंत्रीपद नसतानाही या संस्थेचे अध्यक्ष झाले. १९९० च्या दशकात काही उपराष्ट्रपती या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात २००२ मध्ये नजमा हेपतुल्ला यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. पुढे करणसिंह तसेच लोकेशचंद्र अशा नामवंतांनी या पदाची जबाबदारी सांभाळली. २०१८ पासून आयसीसीआरच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आहे.

संस्थेची प्रमुख कामे कोणती आहेत?

आरोग्य मंत्रालय, आयुष तसेच शिक्षण मंत्रालय अशा केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती किंवा पाठयवृत्ती दिली जाते, त्यात समन्वय साधण्याचे काम संस्था करते. देशात दरवर्षी चार हजार परदेशी विद्यार्थी येतात. आफ्रिका, लॅटीन अमेरिका येथून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर भारतीय कलाकारांना परदेशात सादरीकरणाची संधी देण्याची आणि त्यासाठी संबंधित दूतावासांशी सतत संपर्क साधण्याची जबाबदारीही संस्थेमार्फत पार पाडली जाते. भारतीय वकिलातींच्या कार्यक्रमांच्या माध्यामतून भारताच्या सौम्य संपदेच्या (सॉफ्ट पॉवर) विविध अंगांची जगाला ओळख करून देण्यासाठी कार्यक्रमांची आखणी केली जाते.

हेही वाचा >>> राज्याच्या अस्मितेवर येऊ घातलेल्या घाल्याबाबत आपण जागरुक आहोत का?

सॉफ्ट पॉवरचे बदलत्या काळातील महत्त्व काय?

‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजेच ‘सौम्य संपदा’ या शब्दाची ओळख जगाला केनेडी स्कूल ऑफ गव्हर्मेटचे संचालक जोसेफ ने यांनी करून दिली. त्यांनी या विषयावरील पहिले प्रबंधात्मक विवेचन केले, पुढे त्याचे पुस्तकही प्रकाशित झाले. असे असले तरी सौम्य संपदा ही संकल्पना काही त्यांनी शोधून काढली नव्हती, त्यांनी केवळ या संकल्पनेला नामाभिधान दिले. भारताचा शोध घ्यायला कोलंबस आणि वॉस्को द गामा निघाले, त्याचे कारण मसाल्यांचा पुरवठा बंद पडला हे होते. म्हणजे मसाले ही भारताची सौम्य संपदाच आहे. जगात भारत पोहोचण्याआधी भारताचे मसाले पोहोचले होते आणि भारतीय महाकाव्येही पोहोचली होती. याचा अर्थ आपले खाद्यपदार्थ, आपली महाकाव्ये, वेशभूषा, परंपरा, आपले सण-उत्सव,

संगीत-नृत्य ही एक प्रकारे आपली सॉफ्ट पॉवरच आहे.

आज जगाचे सांस्कृतिक सपाटीकरण होण्याचा वेग प्रचंड आहे. आर्थिक आघाडीवर जगाचे सपाटीकरण होण्यास कोणाचीही काही हरकत नाही. मात्र सांस्कृतिकदृष्टया जगाचे सपाटीकरण होणार असेल, तर त्याला विरोध करण्याची ताकद त्या त्या ठिकाणच्या संस्कृतींमध्ये असणे गरजेचे आहे आणि भारतात ती निश्चितच आहे. जगातील काही देशांमध्ये आपण गेलो तर आपल्याला जाणवत राहते, की तिथे पूर्णपणे अमेरिकीकरण झाले आहे, अपवाद केवळ भाषेचा असतो. आपल्याकडे असा अनुभव येत नाही, कारण आपले भारतीयत्व चहुअंगांनी टिकलेले आहे आणि ते अभिव्यक्तही होत राहते.

सध्याचे सरकार संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करते. त्याला संस्थेचे कार्य पूरक कसे?

सध्याच्या सरकारची धोरणे पाहिली तर स्वभाषा, स्वभूषा, स्वदेश यावर भर आहे. हे धोरण म्हणजे एक प्रकारची सॉफ्ट पॉवरच आहे. आपल्या भाषा टिकून राहिल्या तरच आपली संस्कृती टिकून राहील. आज जगावर अमेरिकेकीरण, पाश्चिमात्य देश आणि इंग्रजीचा जबरदस्त पगडा आहे. संस्कृतीशी असलेली आपली नाळ तुटण्याची भीती आहे. आपण अनेक गोष्टी परदेशांतून आयात करत गेलो आहोत. त्यामुळे एक प्रकारच्या सांस्कृतिक सपाटीकरणाची भीती आपल्यालाही आहेच. आपण इंग्रजी भाषेचा अभ्यास निश्चितच करावा. मात्र आपल्या साहित्याचा, सांस्कृतीचा आग्रह धरावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशांत जातात तेव्हा गीतेची प्रत देतात, हिंदीमध्ये बोलताना संकोच करत नाहीत. भारतीय भाषा, संस्कृतीला जागतिक परिमाण मिळवून देण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न असतो. आयसीसीआर भारत सरकारच्या या धोरणाशी सुसंगत धोरणे राबविते.

सांस्कृतिक सपाटीकरण रोखण्यासाठी आयसीसीआर काय करू पाहते?

या आघाडीवर आम्ही बरेच काही करू पाहात आहोत. जगातील सहा भारतीय हॉटेल्स निवडून त्यांना ‘अन्नपूर्णा प्रमाणपत्र’ देण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. भारतीय खाद्यपदार्थाबाबत परदेशात कमालीचे कुतूहल आहे. त्यामुळे परदेशात जी भारतीय हॉटेल्स भारतीयत्व जपून ग्राहकसेवा करतात त्यांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली. निवड करताना संबंधित व्यक्ती त्या व्यवसायात किती वर्षे आहे, हाही निकष महत्त्वाचा ठरला. भारतीयत्व म्हणजे केवळ पदार्थच नव्हेत. पदार्थ वाढण्याची पद्धत, पदार्थाचा क्रमही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्वच्छता, टापटीप हेही घटक यामध्ये तपासले गेले. यातून आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण होण्यास बळकटी मिळेल हा विश्वास आहे.

संस्कृती जतनासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?

जगातील कुठलीही संस्कृती विविध प्रकारे अभिव्यक्त होत असते. ही अभिव्यक्ती जगात योग्य पद्धतीने पोहोचवली जाणे आवश्यक ठरते. त्या दृष्टीने आमची संस्था गेली काही वर्षे काम करत आहे. ज्याबद्दल जगात अपार कुतूहल आहे, असा भारत हा जगातील एकमेव देश असावा. काही मोजके अपवाद वगळता बाकी कोणत्याही देशांत भारताविषयी द्वेष दिसत नाही. परंतु केवळ सदिच्छा म्हणजे ‘सॉफ्ट पॉवर’ नव्हे. या सदिच्छेचे रूपांतर जोपर्यत संस्कृतीच्या आकलनात होत नाही तोपर्यंत ती मान्यता पावत नाही.

अलीकडे परदेशगमन वाढले आहे. यातून भारतीय संस्कृतीचा प्रसार होत आहे. परदेशी नागरिक आपले सण मोठया प्रमाणात साजरे करतात. मात्र तेवढयावर थांबता कामा नये. महापुरुषांच्या जयंतीदिनी असे कार्यक्रम तिथे व्हायला हवेत, असा आमचा आग्रह आहे. सण, उत्सवांप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही परदेशात साजरी व्हायला हवी. त्याच दृष्टीने दूतावासांच्या माध्यमातून आम्ही विविध देशांतील भारतीयांच्या मंडळांशी सातत्याने संपर्क साधत आहोत.

नवी पिढी या संस्कृतीपासून तुटता कामा नये, म्हणून भारतीय साहित्याला प्रोत्साहन देण्याचे काम सतत सुरू असते. स्वदेश तसेच स्वभाषेची जपणूक गरजेची आहे. भारतीय संगीताबाबत परदेशांत अनेक अभ्यासक्रम आहेत. तिथे आपल्या वाद्यांच्या देखभालीत अडचणी येत. त्यामुळे लंडनमध्ये वाद्यनिर्मिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा असा पहिलाच उपक्रम होता. संस्थेची कार्यकक्षा वाढवण्याचे सहा वर्षांत झाले याचे समाधान आहे.

बौद्धिक स्वामित्वावर भर देण्यासाठी काय करण्यात येत आहे?

भारताबाबत जगभरात अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र त्यात भेसळ होत आहे. योगाभ्यासाला विविध नावे देऊन विकृत स्वरूप देण्याचे प्रयत्न होत आहेत. हे टाळण्यासाठी प्रामाणिकपणे काम  करणाऱ्या संस्थांना आयसीसीआर बौद्धिक स्वामित्व प्रमाणपत्र आणि अधिस्वीकृती देते. यातून परदेशात प्रामाणिकपणे भारतीय कला-संस्कृतीचे जतन करणाऱ्या संस्थांना बळ मिळते.

सकारात्मक मतनिर्मिती

आयसीसीआर जगभरात ३७ केंद्रांद्वारे भारतीय वकिलातींशी संपर्क साधून तिथे भारताबाबत काय मत आहे हे जाणून घेते. देशाची सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी या हेतूने काय करता येईल याचा सातत्याने विचार सुरू असतो. त्याच दृष्टीने परदेशातील ग्रंथालयांमध्ये भारतीय पुस्तके पाठवणे, तेथील अभ्यासक्रमांतून भारताबाबत काय धारणा निर्माण केली जात आहे, याचा अभ्यास करणे, काही त्रुटी असतील तर त्यांना समजावून सांगणे असे प्रयत्न करून आपल्या देशाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न आयसीसीआर करत आहे. 

शिक्षणपरंपरेबाबतही पुढाकार

जगभरात अनेक विद्यापीठांमधील अभ्यासकांना भारतीय ज्ञानपरंपरेबाबत कुतूहल आहे. हा अभ्यास अधिक व्यापक व्हावा या हेतूने ३५ देशांतील विविध विद्यापीठांतील प्रमुखांना भारतात आणून त्यांना विविधांगी मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासक्रमांच्या विविध संधींबरोबरच ‘चेंबर ऑफ कॉमर्स’सारख्या आघाडीच्या वाणिज्य संस्थांशी संवाद साधून उद्योगजगताची ओळख करून देण्यात आली. त्यामुळे याला रोजगारसंधीची जोड देण्यातही यश आले आहे. 

व्यक्तीपेक्षा समूह महत्त्वाचा

व्यक्तिस्वातंत्र्य अमर्याद नाही, मात्र त्याचबरोबर स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही, ही धारणा महत्त्वाची आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक नात्याचे वेगळे महत्त्व दिसते. हीच तर भारतीयत्वाची खुबी मानली जाते. व्यक्तींचा समूह महत्त्वाचा मानून जगभरात भारताची भूमिका जोरकसपणे मांडण्याचे काम आयसीसीआर करत आहे. या कार्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा आमचा सहा वर्षांचा अनुभव आहे. जगाचा भारताविषयीचा दृष्टिकोन बदलत आहे..

शब्दांकन- हृषीकेश देशपांडे, जयेश सामंत