– प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहावीचा- माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल आज (२७ मे) लागतो आहे… निकाल, रिझल्ट म्हटलं की गुण कमी जास्त होणार. समाजात एक दृष्टिक्षेप टाकून पाहिल्यास मुलांच्या गुणांची चिंता नोकरी/व्यवसायात स्थिर झालेल्या व स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या पालकांना आहे. पण मुलांनी तरी असा विचार करणं आवश्यक आहे की, एका कागदावरील मार्कांची कुंडली खरंच आपलं भविष्य घडवेल का? स्पर्धा, गुण, गुणवत्ता यावर मुलांचं भविष्य, करिअर असतं असं कोण म्हणतं? मार्क म्हणजेच आयुष्य नाही, आयुष्यातलं यश मार्कांवर अवलंबून नाही हे दहावीचा निकाल लागताना लक्षात ठेवावं.

परीक्षांमध्ये गुण मिळविणं हे अखेर एक तंत्र आहे. परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहून गुण मिळवले जातात. यासाठी गाईड, घोकंपट्टी व खासगी क्लासेस यासारखे अनेक पर्याय वापरले जातात (कॉपी करण्याचाही मार्ग काहीजण वापरतात पण त्यामुळे कुणी ‘टॉपर’ ठरत नाहीत). बऱ्याचदा गुण हे प्रतिभा किंवा बुद्धिमत्तेचं सूचक नसून त्याऐवजी समर्पण, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम हेच त्यातून दिसतं. त्यामुळे परीक्षा आपल्यातील गुणांची आकडेमोड ठरवते, आपलं भविष्य एका परीक्षेवर ठरत नाही. कमी गुण मिळाले म्हणून यशाचं शिखर गाठण्याचे मार्गच संपले असं होत नाही. आपली मानसिकता केवळ पुस्तकी अभ्यासाच्या गुणांना सर्वोत्तम मानणारी झाली आहे. वास्तविक ज्या विद्यार्थ्यांला जास्त गुण तो ‘हुशार’ ही धारणा अत्यंत चुकीची आहे. परीक्षांमधील गुणावरून त्याची बुद्धिमत्ता ठरवता येत नाही.

हेही वाचा – लोकशाहीचे पायदळ…

स्वातंत्र्य आणि जबाबदारी

आज आमची सगळी शिक्षण व्यवस्था दहावी व बारावीच्या निकालाच्या भोवती फिरताना दिसते. पण खरे गुणवान व गुणवत्ताधारक या व्यवस्थेत टिकून राहतात हेही सत्य नाकारून चालत नाही. कारण जरा गतकाळात डोकावून पाहिलं तर गुणांच्या मोजपट्टीत न बसणाऱ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर पराक्रमाची शिखरं उभी केली आहेत. गुण महत्त्वाचेच; पण गुणवत्ता त्याहूनही अधिक मोलाची आहे कारण गुणवत्तेशिवाय गुणांचं खरं मोल कळत नाही. गुणवत्ता म्हणजे कार्यक्षमता, हुशारी आणि प्रामाणिकपणा या तीन गुणांचा समुच्चय होय. विद्यार्थ्यांनी शिकणं महत्त्वाचंच आहे. पण त्यातून महत्त्वाचं काय आहे, कोणतं व कसं शिक्षण घ्यावं, याबद्दल निवडीचं स्वातंत्र्य आणि ते स्वातंत्र्य पेलण्याची जबाबदारी मुलांवर असली पाहिजे. त्यासाठी पालकांनीही आपल्या इच्छा त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये. मुलांच्या मार्कांवरून त्यांची लायकी ठरवू नये. आपण जन्माला आलो म्हणजे आपण जगायला लायक असण्याची कुवत आपल्यात आहेच, ती आपण कशी वापरणार यावर आपलं भवितव्य ठरतं, हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्यांना गुणवत्तेचं महत्त्व कळेल. गुण काळाच्या प्रवाहात विसरले जातात पण गुणवत्ता वेगवेगळ्या काळात टिकून राहते.

‘थ्री ईडियट्स’ या चित्रपटामध्ये खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ‘कामयाब मत बनो…काबिल बनो. कामयाबी झक मारके आपका पीछा करेगी!’ फक्त नोकरीमागे, पैशामागे पळण्यासाठी चांगले गुण नक्की मिळवले जातात, पण म्हणून यशस्वी होतील हे नक्की सांगता येत नाही. केवळ दहावी अथवा बारावीत नव्वदच्या पुढे, अगदी ९९ टक्के गुण मिळाले तरीही समोरची वाट सहज पार करता येईल असेही नाही. आज बारावी नंतर जेईई, सीईटी, नीट… अशा अनेक परीक्षांना अवास्तव महत्त्व आल्यामुळे बारावीच्या टक्केवारीकडे पालकही लक्ष देत नाहीत… फक्त ग्रुप निघाला पाहिजे एवढीच अट! पण स्पर्धेचं जग केवळ एका प्रवेश परीक्षेपुरतं असतं का? त्या लांबरुंद धावत्या जगात धावण्याची ताकद अंगी असायला लागते, ही ताकद प्रवेश परीक्षेतल्या गुणपत्रिकेनं तरी कशी मिळेल? . त्यासाठी अंगभूत धाडस असायला लागतं. जीवघेण्या स्पर्धेत काही कोवळे जीव अक्षम ठरतात. त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. तेव्हा हे गुण मदतीला येतात का? विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर स्वत:मधील ‘मी’ ओळखावा, त्यानंतर आपल्या आवडीनुसार दिशा ठरवावी आणि ज्या क्षेत्रात जायचंय तेथे कष्टानं प्रतिभावंत व्हायचंय याच विचारानं जावं.

स्पर्धा राहाणारच; पण…

आज पालकांच्या पाल्याबाबतीत खूप अपेक्षा आहेत. मुलांच्या क्षमता, ज्ञान, कौशल्य यांचा विचारही करत नाहीत. अर्धवट माहिती, अपुरं ज्ञान, क्रेझ आणि कमी कष्टात दणदणीत पॅकेज मिळवण्याच्या मोहात पालक अडकले आहेत. त्यामुळे मुलांच्या व आपल्या आयुष्यात गुणांना नको तेवढं महत्त्व देऊन गुणांच्या स्पर्धेत पळवतात. मुलांनी काय करावं, काय करू नये, कसं राहावं, कोणता कोर्स करावा ऐवढेच नाही तर काय खावं यांचा निर्णयही पालकच घेत असल्यामुळे मुलांमधली निर्णयक्षमता दिसत नाही. पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पाल्य म्हणजे स्वप्नपूर्तीचं पासबुक नव्हे.! कबुतराला गरुडाचे पंख लवता येतीलही, पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

समानतेची संधी निर्माण करण्यासाठी शिक्षण हे सर्वांत मोठं साधन. परंतु आज त्यालाही विषमतेचा विळखा बसला आहे आणि ही विषमता गुणवत्तेच्या मार्गातील सर्वांत मोठी अडचण बनली आहे. यामुळेच धनिक मंडळी गुणवत्तेला फाटा देऊन पैशांच्या जोरावर उत्तम संधी देणारं शिक्षण ‘विकत घेऊ’ शकतात. ते गुण प्राप्त करू शकतील पण गुणवत्तेचं काय?

हेही वाचा – लोकशाहीच्या उत्सवाचा तणावपूर्व सोहळा!

स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेलच. ती टाळता येणार नाही. पण दुर्दैवाने ती निकोप राहिलेली नाही. सगळ्यांना दुसऱ्याला मागे टाकून पुढे जायचे आहे. अशा स्पर्धेत परीक्षेतल्या गुणांचं घोडं खूप मोठं झालंय. पण त्या घोड्यावर चढून समाधानाच्या शिखरावर पोहोचता येईल का?

लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत

tatyasahebkatkar28@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will 10th result determine quality ssb
First published on: 27-05-2024 at 09:33 IST