२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत आहे. योगाचा आंतरराष्ट्रीय प्रचार झाला. परदेशातील अनेक नागरिकांना त्यात रुचीही निर्माण झाली आहे. कोणाला काय रुचेल व पचेल हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र प्रांताच्या, देशाच्या सीमा ओलांडून एखादी प्रणाली, पद्धत दुसऱ्या प्रदेशात पदार्पण करते तेव्हा त्यामागे यशस्वी प्रचारतंत्र असते, ही बाब विसरून चालणार नाही. रुची निर्माण होण्यामागे अनेकदा निव्वळ कुतूहलही असते. त्या पद्धत वा प्रणालीच्या उपयुक्ततेचे ते प्रमाणपत्र नक्कीच नाही.
कोणत्याही समाजाचे सामाजिक अथवा आरोग्यविषयक आदी प्रश्न सोडवताना त्या समाजात निर्माण व काळानुरूप विकसित झालेले व तेथील तत्कालीन जीवनशैलीशी, समाजजीवनाशी, निसर्गाशी व पर्यावरणाशी सुसंगत असणारे तंत्र व मार्ग अधिक परिणामकारक असतात. त्यातून योगशास्त्र या देशात शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झाले आहे. त्या वेळची समाजरचना, जीवनशैली व आत्ताची याची तुलना होऊच शकत नाही. सामान्य माणसाच्या सर्वसाधारण आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक असतो. विद्यार्थिदशेत मदानी खेळातून तो सहज मिळतो. शालेय अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश करताना नक्की कशासाठी केला जाणार आहे? विद्यार्थ्यांचे म्हणजेच भावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी की प्राचीन भारतात शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेले एक तंत्र ज्याची भुरळ आज विकसित देशांतील परदेशी नागरिकांना पडत असल्याने आमच्या परंपरा, पद्धती कशा श्रेष्ठ अशा समजुतीत राहून कालबाहय़ तंत्रांना पुनरुत्थान देऊन कालौघात मागे पडलेल्या या प्रणालींचा अधिक अभ्यास वगरे करण्यासाठी, भावी संशोधक निर्माण करण्यासाठी हे अगोदर स्पष्ट व्हावे. यम, नियम, हठयोग, साधना सूत्रे हे सारे काही साधू, साधक, अभ्यासक यांच्यासाठी. सर्वसामान्य माणूस यापासून सहसा दूर असतो.
जगभर प्रयोगशाळांमध्ये  संशोधन करून शास्त्रज्ञ विविध प्रयोगांद्वारे, अभ्यासाद्वारे विविध तंत्र विकसित करत असतात. विश्वाची माहिती व मानवी आयुष्य सुखाचे जावे यासाठी हे योगदान असते. अशा संशोधनातील काही प्रयोग फसतात, तर काही वरदान ठरतात. मात्र शास्त्रज्ञ अद्याप संशोधन करत आहेत. त्या बाबी प्राथमिक अवस्थेत असताना शालेय अभ्यासक्रमात आणल्या जात नाहीत. तसेच विकसित देशांतील काही नागरिकांना रुची निर्माण झाली त्या अर्थी हे नक्कीच महान शास्त्र आहे अशा समजुतीत राहून त्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यापूर्वी र्सवकष विचार व्हावा. आजच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शालेय अभ्यासक्रमाचे माध्यम वापरून कालचक्र मागे फिरवून त्याला बरेच जुने काही शिकविताना उपयुक्ततेला प्राधान्य द्यावे. अन्यथा नाही अपाय, नाही उपाय, होईल कालापव्यय त्याचे काय, अशी गत होईल.
रजनी अशोक देवधर, ठाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे अनेक भुजबळ सापडतील
राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीचा सारा माहितीपट ‘लोकसत्ता’ने पहिल्याच पानावर (१७ जून)मांडला आहे .
मी भुजबळांना भेटलो होतो. चिंचपोकळी-लालबाग परिसरात टाटांच्या व्होल्टास कंपनीत मी कामाला असताना चिंचपोकळी गल्लीत रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याबद्दल,  ते मुंबईचे महापौर असताना त्यांना महापालिकेच्या कार्यालयात आम्ही भेटलो होतो. त्यांनी भेट दिली, एवढेच नव्हे तर त्यांच्या एका अधिकाऱ्याला आमच्याबरोबर पाठविले. त्या काळापासून ती गल्ली आजही स्वच्छ ठेवली जाते. त्यांची गरिबी तेव्हा दिसत होती. भायखळा परिसरात एका छोटय़ा खोलीत ते राहात असत.
आताची त्यांची मालमत्ता पाहून मला कार्ल मार्क्‍सच्या ‘अतिश्रीमंती ही आíथक शोषणाने येते’ या प्रतिपादनाची आठवण होते.
‘मी निर्दोष आहे,’ असे भुजबळ सांगत आहेत; पण प्रश्न उरतोच. तो असा, भाजी मार्केटमध्ये फिरणारा हा एवढा श्रीमंत होतोच कसा? ..अर्थात आतापर्यंत असे अनेक भुजबळ आपण पाहिले आहेत.
सरकारने पक्षपात न करता शोध घेतला तर असे अनेक भुजबळ आपल्या आजूबाजूला सापडतील. बारामतीचे पवारही गर्भश्रीमंत नव्हते, ते आज श्रीमंतांत गणले जातात. तेव्हा एक भुजबळ – भुजबळ म्हणून ओरडण्यात तसा काहीही अर्थ नाही. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आपण विसरू शकत नाही!
मार्कुस डाबरे, पापडी, वसई  

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letters to the editor
First published on: 18-06-2015 at 12:42 IST