नामाचा अभ्यास का साधणार नाही, हे सांगताना मग जीव देहाच्या क्षमतांच्या मर्यादेकडे बोट दाखवतो. तसंच साधनेसाठी, व्रत, दान, उद्यापनं यासाठी शारीरिक श्रम तर करावे लागतातंच, पण पैशाचंही बळ लागतं, याकडे बोट दाखवायचा प्रयत्न करतो. त्यावर समर्थ सांगतात- देहेदंडणेचें महादु:ख आहे। महां दु:ख तें नाम घेतां न राहे। सदाशीव चिंतीतसे देवदेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।। ७३।। बहुतांपरी संकटें साधनाचीं। व्रतें दान उद्यापनें तीं धनाचीं। दिनाचा दयाळू मनीं आठवावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।। ७४।। अरे बाबा, देहाचे कष्ट या जगात चुकलेत का? देह तर नेहमीच कष्टांतून जात आहे. देहाला होणारा त्रास हे माणसाला महादु:खं वाटतं कारण हा त्रास देहापेक्षा मनाला अधिक होत असतो! डोळ्यांनी नीट दिसत नाही, याचा त्रास देहाला नसतो तर मनालाच अधिक असतो! कारण पाहाण्याची आस मनाला असते, डोळ्यांना नसते! ताप आला, व्याधी जडली, रोग झाला की देहापेक्षा मनाला कष्ट होतात. बरेचदा विश्रांतीसाठी देह ताप ओढवतो, पण एका जागी आठ-दहा दिवस पडून राहाणं मनाला आवडत नाही! समर्थ या नामानं साधल्या जाणाऱ्या स्थितीचं गुपित उघड करताना सांगतात की, दु:खाची जाणीव बोथट करीत ती नष्ट करण्याचं काम हे नाम करतं! परिस्थितीनं खचून न जाता त्या परिस्थितीचा स्वीकार करीत त्यातून मार्ग काढण्याची उमेद ही साधना देते. भगवान शंकरांनी हलाहलासारखं महाविष प्राशन केलं आणि त्यानं होणारी शब्दातीत, वर्णनातीत अशी शरीराची आग एका नामात लय साधून शमवली, हा दाखला समर्थ देतात. त्याचा अर्थ असा की त्या हलाहलापुढे आपल्या सामान्यशा प्रपंचातली विषपरीक्षा ती काय! आपली दु:खं, आपल्या यातना, आपली संकटं, आपल्या अडचणी त्या काय! जर त्या हलाहलाची जाणीवही नामानं लोपली तर आपल्या यातनांची जाणीवही लोपेल ना? बरं नुसती यातनांची, कष्टांची जाणीव असून काय उपयोग? त्या जाणिवेनं किंवा चिंता करून करून काही परिस्थिती बदलत नाही. उलट मन अधिकच खचून जातं. त्यापेक्षा मन जर स्थिर राहीलं तर त्या परिस्थितीला ते समर्थपणे तोंड देऊ शकतं. त्यामुळे जर नामानं मनाचा समतोल निर्माण होत असेल, मन स्थिर राहात असेल तरच ते संकटांना तोंड देऊ शकेल ना? एकदा एक स्वामीजी म्हणाले, ‘‘समोरचा दगडाचा छोटासा कणही मुंगीला मोठय़ा पर्वतासारखा वाटतो, पण मोठा पर्वत ती रस्ता समजून उल्लंघून जाते!’’ जाणिव आणि आकलनामुळे असं होतं! लहानशा संकटालाही आपण घाबरतो आणि त्या संकटासमोर हतबल होऊन बसतो. जशी ती मुंगी लहानशा दगडासमोर हताश झाली. पण मोठय़ा संकटातूनही या नामबळानं सहज वाट निघते! मग व्रतं, दान-उद्यापनं याबाबत समर्थ सांगतात की बाबा रे, वाजत गाजत केले जाणारे साधन, व्रते, दिली जाणारी दाने, साजरी होणारी उद्यापने हा सारा पैशाचा खेळ आहे! व्रत पूर्ण केल्यानंतर जर पैशाचं प्रदर्शन करावंसं वाटत असेल, तर त्या व्रताला तरी काय अर्थ? तेव्हा पैशासाठी, मोठेपणासाठी, लौकिकासाठी म्हणून जे काही धार्मिक कृत्यं केलं जातं ते धर्माचरणासाठी नसतंच. त्यापेक्षा त्या परमात्म्याचं मनातल्या मनात स्मरण कर. कारण तो दिनांचा दयाळू आहे! त्याला पैशाची, दिखाऊ भक्तीची, डामडौलाची चीडच आहे. पैशापेक्षा भावश्रीमंतीला तो महत्त्व देतो. ती भावश्रीमंती मिळवण्याचा प्रयत्न कर. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, ‘‘सोन्याची मंदिरं उभारण्यापेक्षा उपासनेचं मंदिर उभारा!’’ कारण तेच खरं टिकणारं असतं! -चैतन्य प्रेम