अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह यांनी अंतर्बाह्य़ समत्व प्राप्त होतं, असं गेल्या भागात म्हटलं. म्हणजे काय? या सर्व गोष्टींत आंतरिक धारणाच महत्त्वाची आहे, हे खरं. पण तरी या धारणेतून काही गोष्टींची जाणीव आचरणातून होते, तर काही गोष्टींना सामोरं जाताना आपल्या आंतरिक प्रतिक्रियांमधला किंवा पडसादातला पालट स्वत:ला उमगतो. अहिंसेचं तत्त्व खऱ्या अर्थानं रुजलं असेल तर दुसऱ्याला काया-वाचा आणि मनानं दुखावणारी कृती तर घडत नाहीच, पण दुसऱ्याविषयी हिंसक विचारही मनात येत नाहीत. नकारात्मक, प्रतिकूल आणि द्वेषपूर्ण विचारांनी मनाचं सततचं हिंदकळणं थांबतं. मग जगण्यातलं सत्य काय आहे, खरं महत्त्व कशाला आहे, हे समजू लागतं. सत्याचं मनानं होणारं हे ग्रहण आपलं आपल्यालाच जाणवतं आणि इतरांशी आपला व्यवहार प्रामाणिक होऊ  लागतो.

अस्तेय आणि अपरिग्रह या दोन्ही तत्त्वांचं बीज खऱ्या अर्थानं रुजत गेलं आणि फुलत गेलं तर जीवनात खरं मूल्यांकन वस्तू आणि व्यक्तींच्या आसक्तीयुक्त संग्रहात आहे, की तत्त्वाशी एकनिष्ठ होऊन जगण्यात आहे, हे उमगतं. मग आपण जसे अपूर्ण आहोत, तसाच प्रत्येक जण अपूर्ण आहे, हे जाणवतं. आपण अपूर्ण आहोत, म्हणजे काय? तर सुखासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीवर, वस्तूंवर आणि परिस्थितीवर आत्यंतिक अवलंबून आहोत. विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती हीच आपल्या सुखाचं किंवा दु:खाचं कारण आहे, अशी आपली दृढ समजूत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीमुळे मला सुख लाभेल, असं मला वाटत असतं ती कायम माझीच असावी यासाठी मी धडपडतो. ज्या व्यक्ती माझ्या दु:खाचं कारण आहेत, असं वाटतं त्या व्यक्तीशी संबंध तोडण्यासाठी मी धडपडत असतो. हीच गत वस्तू आणि परिस्थितीबाबतही आहे. सुखाच्या वाटणाऱ्या वस्तू मिळविण्यासाठी आणि दु:खकारक भासणाऱ्या वस्तू फेकून देण्यासाठी मी धडपडत असतो. सुखदायक वाटणारी परिस्थिती टिकवण्यासाठी आणि दु:खकारक वाटणारी परिस्थिती टाळण्यासाठी मी धडपडतो आणि या सर्वात गमतीचा भाग असा की, खरं सुख कोणतं आणि खरं दु:ख कोणतं, हेच मला नेमकं माहीत नसतं! त्यामुळे सुख म्हणता म्हणता मी दु:खाच्याच कचाटय़ात सापडतो. हीच गत माझ्या अवतीभवतीच्या प्रत्येकाचीच असते. प्रत्येक जण अपूर्ण आहे. म्हणजे सुखासाठी बाह्य़ कारणावर अवलंबून आहे. त्यामुळे सुखासाठीचा प्रत्येक आधार तकलादू आहे. जो ‘सुखा’साठी दुसऱ्या व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीवर अवलंबून आहे तो मला अखंड सुख कसं देणार? जो अपूर्ण आहे तो पूर्ण समाधान देऊ  शकत नाही. ज्याचं सुख खण्डित आहे तो अखंड समाधान देऊ  शकत नाही; पण हे वास्तव नामाशिवाय उमगत नाही. जे मला सुखाचं वाटतं ते प्रत्यक्षात दु:खकारक आहे, हे फार नंतर उमगतं आणि जे दु:खाचं वाटत होतं तेच खरं सुख मिळवून देणारं ठरलं, हेही उमगतं; पण ही प्रक्रिया फार दीर्घ आणि सूक्ष्म असते. या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? तर बहुतांश वेळा ‘दु:खा’च्या अनुभवानं.. खरं सुख आहे तरी काय, हा विचार मनात आल्यावर!

Tirgrahi Yog In Mesh
१०० वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूची होणार युती! त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल आनंदी आनंद
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश

श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘सुख तुम्हाला झोपवतं, तर दु:ख जागवतं!’’ जे सुखाचं भासतं ते मिळालं की माणूस भ्रम-मोहाच्या साखरझोपेत रममाण होऊन जातो. मग आसक्तीनं ते ‘सुख’ कायमचं आपल्या ताब्यात ठेवण्याची स्वप्न पाहात वास्तव विसरतो. जीवन असंच व्यतीत होत असताना सुखाच्या झोपेत ‘अचानक’ पडलेल्या दु:स्वप्नानं प्रथम जाग येते! पण जाग आली एवढय़ानं काही वास्तवाची जाण येत नाही. इथं नामाचं कार्य सुरू होतं!